Wednesday, 6 April 2016

कीर्तनाचा पूर्वरंग

कीर्तनाचा पूर्वरंग

ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)

भक्ताची साकडी स्वयें सोसी देव । 

त्यापाशीं केशव सर्वकाळ ॥ 1

जये ठायीं कीर्तन वैष्णव करिती ।

तेथे हा श्रीपति उभा असे ॥ 2

तुका म्हणे देव सर्वाठायीं जाला ।

भरूनी उरला पांडुरंग ॥ 3


प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग हा संतशिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा आहे. संत तुकाराम महाराज हे केवळ संतश्रेष्ठच नव्हते, तर महान समाजसुधारक होते. त्यांनी आपले आचार-विचार आणि संस्कार यांतून सर्व मनुष्यमात्रांना सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दाखविला.
त्यांची थोरवी वर्णन करताना कविवर्य मोरोपंत म्हणतात -

मुकुटमणि संतांचा तुकया म्हणू नये वाणी ।
नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणूनिया वाणी ॥

मुकुटमणि म्हणजे अगदी कळसच. या वारकरी संप्रदायाचा 'ज्ञानदेवे रचिला पाया' हे आपण जाणतोच. पुढे असे सांगितले आहे की,
भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥
संत तुकाराम महाराज हे व्यवसायाने वाणी म्हणजे व्यापारी व सावकार होते. पण ही त्यांची खरी ओळख नाही. विठ्ठलनामाच्या स्मरणाने त्यांनी सदेह वैकुंठगमन केले, असा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे जगद्गुरू हीच त्यांची खरी ओळख आहे.
आधी आपण या अभंगाचा भावार्थ पाहू.
संत तुकोबाराय सांगतात की - देव आपल्या भक्तांची संकटे स्वत: सोसत असतो. हा केशव त्याच्या जवळच असतो. ज्या ठिकाणी वैष्णव कीर्तन करतात तेथे हा श्रीपती उभा राहतो. हा पांडुरंग सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे व सर्वत्र भरून उरला आहे.
पंढरीनाथ महाराज की जय!
आता या अभंगाचा आपण सूत्रमय विचार करूया.
अभंगात पहिले सूत्र काय सांगितले आहे?
1. देव आपल्या भक्तांची संकटे स्वत: सोसत असतो.
हे बाकी छान झालं! अहो, पाहुण्याच्या काठीनं साप मरत असेल तर बरं आहे की नाही! आपण फक्त देवाची भक्ती करत बसू, बाकी सर्व काही तोच पाहून घेईल. पण असे म्हणण्याआधी भक्त म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.
भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास ।
गेले आशापाश निवारूनी ॥
विषय तो त्यांचा झाला नारायण ।
नावडें जन धन माता पिता ॥
निर्वाणी गोविंद असें मागेपुढें ।
काहीच साकडे पडों नेदी ॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य ।
घातलिया भयें नरका जाणें ॥
म्हणजे, ज्यांचे सर्व आशापाश तुटलेले आहेत आणि आपल्या देहाविषयी जे उदास म्हणजे निरपेक्ष आहेत, ज्यांना  जन, धन, माता, पिता या ऐहिक गोष्टींची आवड उरलेली नाही. कारण केवळ 'नारायण' हाच त्यांचा विषय झाला आहे. तेच खरे भक्त होत. अशा भक्तांचे साकडे म्हणजे संकट देव स्वतः निवारण करतो. निर्वाणीचे संकट ओढवल्यावर तो सतत त्याच्या मागेपुढे उभा राहून त्याचा सांभाळ करतो.
संत तुकोबाराय सांगतात -
पडतां जडभारी । दासें आठवावा हरी ॥
मग तो होऊ नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥
मागेपुढे उभा राहे सांभाळीत ।
आलिया आघात निवारावे ॥
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश ।
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ॥
ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥
उणें पडों नेदी त्याचें। वारें सोसी आघाताचें ॥
तयावीण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥
अंगा आपुले ओढूनी । त्यासी राखे जो निर्वाणीं ॥
ऐसा अंकित भक्तासीं । म्हणे नामयाची दासी ॥
जो हरीचा सखा म्हणजे भक्त आहे त्याच्यावर विश्व कृपाच करते. त्याला कधीच उणे पडत नाही. त्याच्यावर होणारे आघात देवच सहन करतो. त्याच्यापासून देव एक क्षण सुध्दा दूर होत नाही. निर्वाणीचे संकट कोसळल्यास तो त्याला पोटाशी धरून ठेवतो. एका प्रकारे देव त्याचा अंकित होऊन जातो. अंकित म्हणजे दास असा अर्थही आपण करू शकतो.
प्रमाण हे त्याच्या बोला । देव भक्ताचा अंकिला ॥
न पुसता जातां नये । खाली बैसताही भिये ॥
अवघा त्याचा होत । जीवभावेंही सहित ॥
वदे उपचाराची वाणी । काही माग म्हणवुनी ॥
उदासीनाच्या लागे । तुका म्हणे धांवे मागे ॥
देव भक्ताचा अंकित आहे हे कशावरून? याला काही पुरावा म्हणजे प्रमाण आहे का? हो, आहे! अहो, खुद्द देवानेच असे सांगितले आहे. मग ते ऐकायला नको का? अहो, अंकित पण कसा? तर बस म्हणता बसतो आणि उठ म्हणता उठतो! विचारल्याशिवाय कोठे जात नाही. जर उभा केला तर बसायलाही घाबरतो. यापेक्षा वेठबिगार परवडला कारण त्याचा जीवभाव तरी स्वतःचा असतो. पण देव जीवभावासहित भक्ताचा होऊन जातो. काय हवं? म्हणून तो स्वतःच वारंवार विचारतो. मालकाला कशाला त्रास? नाही का?
पण देव म्हणजे काही फुकटचा वॉचमन नाही. कधीही बोलवावे आणि काहीही काम सांगावे. त्यालासुध्दा दरमहा पगार आणि बोनस द्यावा लागतो. मग देव तरी ही फुकटची फौजदारी कशाला करील? नाही का!
याचे उत्तर तुकाराम महाराज देतात - उदासीनाच्या धावे मागे.... भक्त ऐसे जाणा जे देही उदास ॥
पुंडलिकवरदा हरी विठ्ठल!
मोरोपंत सांगतात -
भक्तिविना वश नोहे विण्याने वा मृदंगनादाने ।
कन्यादान फलाते कैसा पावे मृदंगनादाने ॥
देव केवळ भक्तीनेच वश होऊ शकतो. अन्यथा नाही! खरीखुरी कन्या जावयाला लग्नात दिली तरच ते कन्यादान! मातीची बाहुली दान करून ते पुण्य जोडता येणार नाही.
यासाठी भक्त आणि अभक्त यांच्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे.
भक्त म्हणजे भुंगा. तुकाराम महाराज सांगतात-
परिमळाची धाव भ्रमराशी ओढी ।
तैसी तुझी गोडी लागो मज ॥
तुम्ही तळं पाहिलं आहे का तळं? आता दुष्काळात तळं विचारणं हासुध्दा अपराधच म्हणावा लागेल. जेव्हा मनुष्य निसर्गाचा आदर करीत होता तेव्हा या देशात मोठमोठी तळी होती. पण माणसाने तळी बुजवून त्यावर इमारती बांधल्या इतका हा हुशार प्राणी. या तळयांत फुललेली कमळं पाहिली की, कोण समाधान माणसाला लाभतं. या निसर्गाचा आस्वादच घेतला पाहिजे. अहो, कमळाला साधं समजू नका. आता देशावर त्यांचंच राज्य आहे म्हणा. पण मी तळयातल्या कमळाची गोष्ट करतो आहे. देवी म्हटली की कमळ आलंच. लक्ष्मी म्हणा की सरस्वती नेहमी कमळावरच बसलेल्या असतात. देवेंद्रांना विचारून पाहा. म्हणजे स्वर्गातील इंद्राबद्दल बोलतोय मी. पण, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे सुध्दा खरंच म्हणा! बरं, असो. तर या तळयाची गंमत म्हणजे.
कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणुक एकेचि घरीं ।
परि परागु सेविजे भ्रमरीं । जवळिलां चिखलुचि उरे ॥ 58
कमळ आणि बेडूक एकाच ठिकाणी म्हणजे नदीच्या चिखलात असतात. पण बेडूक कधीही मकरंदाचे सेवन करीत नाही. भुंगा मात्र अत्यंत दूरवरून येतो आणि मकरंदाचे सेवन करून जातो.
घेई छंद, मकरंद । प्रिय हा मिलिंद ॥
मधुसेवनानंद । स्वच्छंद ॥
बरं तर एकाला चिखल मिळतो आणि एकाला मध मिळतो.
दृष्टान्तः दोन मित्र होते. एकजण दुसऱ्याला म्हणाला - अरे, मी काल रात्री एक स्वप्न पाहिलं. आपण जंगलातून जात होतो. तेवढयात पाय घसरून पडलो. पण मी पडलो मधाच्या हौदात आणि तू पडलास चिखलात. दुसरा मित्र हुशार होता. तो म्हणाला - मित्रा, अरे मला सुध्दा हेच स्वप्न पडलं. पण पुढे काय झालं माहीत आहे का?
पहिला म्हणाला - पुढे काय होणार?
दुसरा म्हणाला - मी सांगतो ना! आपण ठरवलं की एकमेकांना चाटून साफ करूया. झालं, मी तुला चाटतोय आणि तू मला... मी मध चाटतोय आणि तू....
पुंडलिकवरदे हरि विठ्ठल... असो.
बरं, जुन्या काळी बँका नव्हत्या... तेव्हा लोक आपला पैसा जमिनीत पुरून ठेवत होते...
धनश्च भूमौ, पशवश्च गोष्ठे ।
भार्या गृहद्वारे जनः स्मशाने ।
देहश्चितायां परलोक मार्गे ।
कर्मानुगो गच्छति जीव एक ॥
धन जमिनीत, जनावरे गोठयात, आवडती बायको घराच्या दरवाज्यात, लोक स्मशानापर्यंत आणि पुढे सगळा प्रवास जीवाला एकटयालाच करावा लागतो.
पण कल्पना करा. जमिनीत पुरून ठेवलेल्या धनाचा पत्ता न सांगता जर कुणी राम म्हटला तर, त्यांच्या वंशजांचे ते दुर्भाग्यच म्हणायला हवे, नाही का?
नातरी निदैवाचां परिवरीं ।
लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं ।
परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥ 59
एखादा दुर्भागी मनुष्य घरात बसून उपवास काढत असतो कारण तेथे जमिनीत मोहोरांचा हंडा पुरलेला आहे याची त्याला कल्पना नसते.
तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु ।
कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ॥ 60
 त्याचप्रमाणे सर्व सुखाचे मूळ असलेला भगवंत सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात आहे, पण श्रध्दा नसलेल्यांना त्याची प्राप्ती होऊ शकत नाही.
तैसीं अहंममतेचिये लवडसवडी ।
मातें न पवतीचि बापुडीं ।
म्हणोनि जन्ममरणाची दुथडी । डहुळितें ठेलीं ॥ 62
याच कारणाने भगवंतांनी गीतेत सांगितले आहे.
    अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।
    अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ 3
अभक्तांना देवाची प्राप्ती होणे अवघड आहे. देवाचे भक्त देवाला जाणू शकतात. त्याला आपलासा करू शकतात.ज्यांनी दैवी गुणांची प्राप्ती करून घेतली आहे अशा भाग्यवान मनुष्यांनाच माझे खरे दर्शन घडते. या दैवी गुणांची प्राप्ती भगवंताच्या नामसंकीर्तनाने होते. पण भगवंताचे नाव एकदा मुखातून येण्यासाठी हजारो जन्माचे पुण्य गाठीस असावे लागते ही गोष्ट खरी आहे. असे मनुष्य दुर्लभ असल्यामुळे कीर्तनाची आवड नसणारे अनेक लोक आपल्याला नेहमी अवतीभवती दिसतात.
याच कारणाने भगवंतांनी गीतेत सांगितले आहे.
    महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता: ।
    भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ 13
अनन्यभावाने शरण आलेल्या भक्तांची सेवा प्रत्यक्ष परमात्मा करतो व त्यांची सतत काळजी वाहतो.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ 22
नामसंकीर्तनात रमलेल्या भक्तांची काळजी भगवंतालाच घ्यावी लागते. लहान बाळाला हवे-नको ते ज्याप्रमाणे त्याची आईच बघत असते, पंख न फुटलेल्या पिलांना जशी पक्षिणच चारा आणून त्यांच्या चोचीत देत असते, त्याप्रमाणे अशा भक्तांची काळजी भगवंत घेत असतो.
आपुली तहानभूक नेणे । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें ।
तैसे अनुसरले जे मजप्राणें। तयांचेन काइसेनिहि नलजें मी॥ 340
हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा ।
जयांचियां सर्वभावां । आश्रयो मी ॥ 343
खरा भक्त कृष्णार्पणमस्तु भावनेनेच सर्व काही करीत असतो. हे सर्वकाही भगवंतच करीत आहे आणि मी केवळ निमित्तमात्र आहे, अशी त्याची खरीखुरी पराकोटीची भावना असते. ही गोष्ट भगवंताच्या लक्षात आलेली असते. त्यामुळे खरी भक्ती करायची असेल तर आपल्यालाही याच मार्गाने जावे लागेल.
आता दुसऱ्या चरणाचा विचार करूया. या चरणात संत तुकोबाराय यांनी दुसरे सूत्र सांगितले आहे.
2. ज्या ठिकाणी वैष्णव कीर्तन करतात तेथे हा श्रीपती उभा राहतो.
जेथे माझे भक्त कीर्तन करतात तेथेच माझा निवास असतो.
    सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: ॥
    नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ 14
भगवंताच्या नामसंकीर्तनात अशी जादू आहे की कुठेही असलेला भगवंत कीर्तनात आपोआप आकर्षित होतो. भगवंताचे नाम हे देवाला खेचून आणण्याचे साधन आहे. आपण हाक मारलेला माणूस '' देऊन जसा आपल्याकडे धावत येतो; त्याचप्रमाणे भगवंताचे नाम घेतल्यावर तोसुध्दा आपल्याकडे धावत येतो.
निजल्याने गातां उभा नारायण ।
बैसल्या कीर्तन करिता डोले ॥
उभा राहोनियां मुखी नाम वदे ।
नाचे हा गाविंद नाना छंदे ॥
मारगी चालता मुखी नाम वाणी ।
उभा चक्रपाणी मागेपुढें ॥
तुका म्हणें यासी कीर्तनाची गोडी ।
प्रेमे घाली उडी नामासाठी ॥
अहो, झोपल्या झोपल्या जरी देवाचे नाव घेतले तर हा नारायण सेवकाप्रमाणे उभा राहतो. बसून नाव घेतले तर तो डोलायलाच लागतो. उभे राहून त्याचे नाव घेतले तर तो चक्क नाचायलाच लागतो. चालता चालता भक्ताने नामस्मरण केले तर भगवंत मागेपुढे उभा राहून त्याला सांभाळतो. या देवाला कीर्तनाची इतकी गोडी आहे की तो चक्क उडया मारत कीर्तनात येऊन उभा राहतो.
यामुळे नामस्मरण कधी करावे या प्रश्नाचे उत्तर असे आहे - नामस्मरण कधीही करावे...
संत जनाबाई सांगतात -
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥
न विसंबे क्षणभरी । तुझे नाम गा मुरारी ॥
जनाबाईला घरी कामे करावी लागत. कारण ती दासी होती. त्यामुळे दळणकांडण करतानाच ती नामस्मरण करायची आणि बाकीच्या वेळी... नामस्मरणच करायची. कारण नाम घेण्याला एक क्षणसुध्दा विसंबू नये असे तिला वाटत असे.
संत सेना महाराज सांगतात -
गुणदोष याति न विचारी काही ।
धावे लवलाही भक्तकाजा ॥
अवघें काळीं वाचे म्हणा नारायण ।
सेना म्हणे क्षण जाऊं न द्यावा ॥
वेळ अमूल्य आहे, असे सर्वच सांगतात. तो वाया घालवू नये असे सर्व म्हणतात. म्हणून एक क्षणसुध्दा वाया न दवडता  नामस्मरण केले पाहिजे. तर मग वेळ न लावता भगवंत धावून येतो.
संत रामदास सांगतात -
देव असता पाठीराखा । त्रैलोक्याचा कोण लेखा ।
रामदास म्हणे भावे । भजन देवाचें करावे ॥
पुढे सांगतात -
टाळ वाजे मंद मंद । मुखी हरिनामाचा छंद ॥
उभे हरिदास अंगणीं । रामदास लोटांगणी ॥
संत निळोबाराय सांगतात -
जो जो काळ कीर्तनी जाय । तो तो होय सार्थक ॥
निळा म्हणे ऐसा निका । उपाय नेटका सकळासी ॥
नामसंकीर्तनात जेवढा काळ जातो तो सर्व सार्थक होतो. सर्वांनी हाच एक उपाय करायला हवा.
तरी कीर्तनाचेनि नटनाचें । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे ।
जे नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥ 197
नामस्मरणामुळे पापाची नावनिशाणीही उरत नाही. त्यामुळे प्रयाश्चित घेण्याची गरज भासत नाही. नामजपापुढे तीर्थांचेही महत्त्व उरत नाही.
त्रिवेणीसंगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥
नामामुळे पापाचे पर्वत नष्ट झाले. यमलोकच ओसाड पडला.
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें र्ठायावरुनि उठविली ।
यमलोकीं खुंटिली । राहाटी आघवी ॥ 198
भगवंतांच्या नामामुळे अवघ्या जगातील दुःखे नाहीशी झाली. सगळीकडे सुखच सुख निर्माण झाले.
ऐसे माझेनि नामघोषें । नाहीं करिती विश्वाचीं दु:खें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ 199
मनुष्य वारला की आपण म्हणतो वैकुंठाला गेला. पण त्याचीही गरज उरली नाही. हरिभक्तांनी हे जगच वैकुंठमय बनवून टाकले आहे.
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें ।
तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें ।
ऐसें नामघोषगौरवें। धवळलें विश्व ॥ 203
बरे! भक्त वैकुंठालाही जाऊन काय करणार. जर मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरच नाहीत. तर तेथे जाऊन काय करावे? हा भगवंत इतका चपळ आहे की योगियांच्या ध्यानातही तो येत नाही. मग तो सापडणार कसा आणि कोठे?
तो मी वैकुंठीं नसें । एक वेळ भानुबिंबींही न दिसें ।
वरी योगियांचींही मानसें । उमरडोनि जाय ॥ 207
तुकोबाराय सांगतात -
नामसंकीर्तन साधन पै सोपें ।
जळतील पापें जन्मांतरीची ।
न लगती सायास जावे वनांतरा ।
सुखें येतो घरा नारायण ॥
अहो, आपण कशाला वणवण करायची. फक्त नामसंकीर्तन करा. तो भगवंत तुमच्या घरी पत्ता विचारत येतो.
परि तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।
जेथ नामघोषु बरवा । करिती ते माझे ॥ 208
माऊली ज्ञानोबाराय सांगतात -
एकतत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरीसी करुणा येईल तुझी ॥
ते नाम सोपे रे रामकृष्णगोविंद ।
वाचेसी सद्गद् जप आधी ॥
सर्वांत मोठा दृष्टांत आहे सावता माळी महाराजांचा.
त्यांनी सांगितले -
सावता म्हणे केला मळा ।
विठ्ठल देखियला डोळा ॥
सावता माळी महाराज सदैव मळयाच्या कामात गुंतलेले. त्यांना पंढरीची वारी करायलाही वेळ नाही.
पण मळा कसा करायचे.
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥
असा काही त्यांनी भक्तीचा मळा फुलवला की शेवटी भगवंत सावता महाराजांना भेटायला चक्क त्यांच्या मळयात आले.
संत सावता महाराज सांगतात -
वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी ।
विठ्ठल गाऊनि नाचू रंगी ॥
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा ।
तेणे मुक्ति द्वारां ओळंगती ॥
लोक म्हणाले - महाराज पंढरीला विठोबाच्या दर्शनाला का येत नाही.
महाराज म्हणाले - तो विठोबाच माझ्या मळयात येतो. त्याला सोडून मी पंढरीला कसा येणार? मळयातच काय तो विठोबा सर्व ठिकाणी आहे.
आता तिसऱ्या चरणाकडे वळूया. अभंगातील तिसरे सूत्र म्हणजे,
3. हा पांडुरंग सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे व सर्वत्र भरून उरला आहे.
मोरोपंत सांगतात -
भू जल तेज समीर ख, काष्ठादिकी असे भरला ।
स्थिरचर व्यापुनि तो परमात्मा, दशांगुळे उरला ॥
जनाबाईला विचारले, ''देव कोठे आहे?''
तेव्हा जनाबाई म्हणाल्या -
देव खातें, देव पिते । देवावरी मी निजते ॥
देव देते, देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥
देव येथे देव तेथे । देवाविण नाही रितें ॥
जनी म्हणे विठाबाई । भरुनि उरले अंतरबाही ॥
तुम्ही म्हणता - मी बटाटावडा खातो.
जनाबाई म्हणतात - मी देव खाते.
तुम्ही म्हणता - मी लिम्का पितो.
जनाबाई म्हणतात - मी देव पिते.
तुम्ही म्हणता - मी पैसे देतो
जनाबाई म्हणतात - मी देव देते.
तुम्ही म्हणता - मी खाऊ घेतो.
जनाबाई म्हणतात - मी देव घेते.
तुम्ही म्हणता - मी बेडवर झोपतो.
जनाबाई म्हणतात - मी देवावरच झोपते.
तुम्ही म्हणता - जनाबाई तुम्हाला वेड लागले आहे कातो बेड आहे का देव आहे?
जनाबाई म्हणतात - अहो, देव वर आहे आणि खालीसुध्दा आहे. देवाशिवाय काहीच रिकामी जागा शिल्लक नाही. आता तुम्हाला सांगितलं की, तेथे देव आहे बसू नका. मग बसाल तरी कुठे. शेवटी देवावरच बसाल ना! मग तशीच मी देवावरच झोपते. माझ्याकडे कुठला आला आहे पलंग?
जरा व्यावहारिक दृष्टान्त देतो.
एका सावकाराचा धंदा बुडाला. तेव्हा तो विजय मल्ल्यासारखा परदेशी नाही उडाला. बिचारा हे जगच सोडून गेला. त्या काळी थोडी शिल्लक होती. जनाची नाही तर मनाची तरी... बरं असो. तेव्हा त्याचा मुलगा घरातील काही सोन्याच्या वस्तू विकायला सोनाराच्या दुकानात गेला.
मुलगा - मामा, हे पाहा. मी तुमच्याकडे सोन्याचा गणपती, सोन्याचा उंदीर आणि सोन्याची एक लगड आणली आहे. मला याच्या बदल्यात काही पैसे द्या.
सोनाराने त्या तिन्ही वस्तू तराजूत घालून तोलल्या आणि म्हणाला - दीड किलो झाले. किलोच्या हिशेबाने इतके पैसे झाले.
सोनार पैसे देऊ लागला, पण मुलगा घेईना.
मुलगा - मामा, अहो, गणपती, उंदीर आणि लगड यांचे वेगळे वजन करा.
सोनार - वेगळे वजन केले तरी तेवढेच पैसे मिळतील. एकच भाव आहे.
मुलगा - कायतरीच काय? गणपती आणि उंदराचा एकच भाव. तुम्हाला अक्कल आहे का?
सोनार - माझं सोड, तू आपली अक्कल तपासून घे. अरे वेडया, गणपती असो की उंदीर असो. शेवटी सोने ते सोनेच त्यामुळे दोघांचाही भाव एकच.
हा सर्व दृष्टीकोनाचा गोंधळ आहे. दोघांची दृष्टी वेगळी म्हणून दोघांचा अनुभव वेगळा... पंढरीनाथ महाराज की जय!
माऊली ज्ञानोबाराय सांगतात -
अधिक देखणे तरी निरंजन पाहणें ।
योगिराज विनवणें मना आले वो माये ॥
चंदन जेवि भरला अश्वत्थ फुलला ।
तैसा म्या देखिला निराकार वो माये ॥
ऐसा ज्ञानसागरू रखुमादेवीवरू ।
विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥
तृण अग्निमेळे समरस झाले ।
तैसे नामे केले जपता हरि ॥
कापूराची वाती उजळली ज्योती ।
ठायीच समाप्ती झाली जैसी ॥
संत तुकोबाराय सांगतात -
लवण मेळविता जळे । काय उरलें निराळे ॥
तैसा समरस झालो। तुजमाजी हरपलो ॥
अग्निकर्पुराच्या मेळी ।
काय उरली काजळी ॥
तुका म्हणे होती ।
तुझी माझी एक ज्योती ॥
माऊली सांगतात -
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले ।
अवघेचि झाले देह ब्रह्म ॥
बापरखुमादेवीवरू सहज नीटु झाला ।
हृदयी निटावला ब्रह्माकारे ॥
सर्वत्र देव भरून राहिलेला आहे असा अनुभव भक्ताला आला म्हणजे त्याला आत्मज्ञान झाले. त्याचा मानवजन्म सफळ झाला. संतांचा जन्म असा सफळ झाला. तसाच तो तुमचा आमचाही होवो, हेच देवाकडे मागणे आहे.
पुंडलिकवरदे हरि विठ्ठल ॥





3 comments:

  1. राम कृष्ण हरी माऊली
    फोन नंबर पाठवा माऊली
    फोन करा
    9880232787
    हो.भ.प.नाथ महाराज बोराडे लातूरकर किल्ले सिंधुदुर्ग

    ReplyDelete
  2. राम कृष्णा हरी

    ReplyDelete
  3. Mala kirtan shikayache aahe me 17 varshacha aahe 7972674301 ha maza what. Number aahe yavar 2/3 kirtane vastarane pathava please

    ReplyDelete