कीर्तनास उपयुक्त टिपणे
खालील अभंगांपैकी कोणताही अभंग मूळपद म्हणून घेता येतो आणि अन्य अभंग पूरक म्हणून
सांगता येतात. पूर्ण अभंगासाठी गाथा पाहावा.
1.जशी संगत तसे फळ
भावे तुका म्हणे सत्संग हा बरा ।
कुसंग तो फेरा चौऱ्याशीचा ॥ तु.म.॥
2. ब्रह्मज्ञान झटपट कळत नाही. त्यासाठी संतसेवा करावी लागते.
ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी।
तरी का हिंपुटी वेदशास्त्रे ॥
याचसाठी संतपाय हे सेवावे ।
तरीच तरावें तुका म्हणे ॥ तु.म.॥
3. तप, व्रत, दान करून
एकवेळ देवसुध्दा भेटेल, पण भाग्य असल्याशिवाय संत भेटणार नाही.
भवरोगापासून मुक्त होण्यासाठी संतसंग करावा.
तपे व्रतें दानें गोविंद पैं भेटे ।
परि साधु तंव न भेटे भाग्येविण ॥
नामा म्हणे केशवा बरा साधुसंग ।
यावेगळा भवरोग न तुटे न तुटे ॥ ना.म.॥
4. संत हे सुखाचे आगर असल्यामुळे अन्य कोणतीही गोष्ट करू नका. केवळ
संतसंग करा.
करिसील तो करी संतांचा सांगात ।
आणिक ते मात नको मना ॥
तुका म्हणे संत सुखाचे सागर ।
मना निरंतर धणी घेई ॥ तु.म.॥
5. संतांची भेट होणे अवघड आहे.
बहु अवघड आहे संतभेटी ।
तरी जगजेठी करुणा केली ॥ तु.म.॥
6. पूर्वजन्मी पुण्य केले असल्यामुळेच आज संतांची भेट झाली आणि भवदुःखाचा
अंत झाला.
पूर्वजन्मी सुकृते थोर केली ।
ती मज आजि फळासि आली ॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठले ।
संत भेटता भवदुःख फिटले ॥ ज्ञा.म.॥
7. संतांचे दर्शन झाल्यामुळे भाग्य उजळले. सर्व चिंता नष्ट झाली.
देव जोडला गेला.
उजळले भाग्य आता ।
अवघी चिंता वारिली ॥
संतदर्शने हा लाभ ।
पद्मनाभ जोडला ॥ तु.म.॥
8. नदीचा ओघ आपोआप सागरात मिळून जातो तसे संतांच्या संगतीने आपोआप
देव भेटतो. इतके हे सोपे आहे.
सरिताओघ जाय सिंधूसि मिळून ।
तैसा भेटे नारायण संतसंगे ॥
नामा म्हणे केशवा देई संतसंग ॥
आणिक काही तुज न मागे बापा ॥ ना.म.॥
9. सूर्य, हिरा, दिवा
या गोष्टी दृश्य वस्तूच दाखवितात. अदृश्य वस्तू दाखविण्याचे सामर्थ्य केवळ संतांपाशी
आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आपण न बोलावता गेलो पाहिजे.
रवि दीप हिरा दाविती देखणें ।
अदृश्य दर्शनें संतांचेनि ॥
तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे ।
संतचरणीं भावें रिघावया ॥ तु.म.॥
10. संतांचे दर्शन झाल्यामुळे आजचा दिवस धन्य आहे. संत आपल्या घरी
येतील तीच दिवाळी आणि तोच खरा दसरा.
धन्य आजि दीन । झाले संतांचे दर्शन ॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा ॥ तु.म.॥
11. ज्याप्रमाणे गाय आपल्या वासराची काळजी घेते त्याप्रमाणे संत
माझी काळजी घेतात आणि मला निरंतर जागवितात. त्यांचे उपकार काय सांगावे?
काय सांगो आतां संतांचे उपकार ।
मज निरंतर जागविती ॥
तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्तीं ।
तैसे मज येती सांभाळीत ॥ तु.म.॥
12. संतांचे दर्शन झाल्यामुळे आजचा दिवस धन्य आहे. अनंत जन्मीचा
शीण गेला. आता त्यांचा वियोग व्हावा असे वाटत नाही.
धन्य आजिं दीन संतदर्शनाचा ।
अनंत जन्मीचा शीण गेला ॥
एकाजनार्दनी घडो त्यांचा संग ॥
न व्हावा वियोग माझ्या चित्ता ॥ ए.म.॥
No comments:
Post a Comment