गिरिजा-नाथाचा 'गृहयोग'
- ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)
'ज्ञानदेवे रचिला पाया...तुका झालासे कळस' असे वारकरी संप्रदायाबद्दल म्हटले जाते. या संप्रदायात यांच्याच तोडीचे योगदान
आहे श्री संत एकनाथ महाराज यांचे. यामुळे वरील अभंगातच 'जनार्दन
एकनाथ। खांब दिला भागवत।' असा उल्लेख केला आहे. एकनाथ महाराजांचे चरित्र पाहिल्यास आपल्याला यांच्यात
ज्ञानदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांचा जणू समन्वयच झाल्याचे दिसते. ज्ञानदेव महाराज
हे ब्रह्मचर्य आश्रमातच राहिले आणि तुकाराम महाराज हे गृहस्थाश्रम अंगीकारूनही शेवटी
वैराग्यमूर्तीच राहिले. मात्र संत एकनाथ महाराजांचा गृहस्थाश्रम खरोखरच थोर म्हणावा
लागतो, आदर्श म्हणावा लागतो. गुरुंच्या आज्ञेवरून गृहस्थाश्रमात
प्रवेश केल्यावर अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी या आश्रमाचा त्याग न करता गृहस्थाश्रम
कसा धन्य करता येतो व प्रपंचातच राहून परमार्थ कसा साधता येतो याचा उत्तम वस्तुपाठ
घालून दिला. नाथांचा गृहस्थाश्रम खरोखरच हेवा वाटावा असा आहे.
गृहस्थाश्रमाबाबत संत एकनाथ आपल्या भागवतात सतराव्या अध्यायात म्हणतात -
मजमाजीं रंगली चित्तवृत्ती। यालागी विसरला गृहासक्ती।
त्यासी गृहाश्रमीं माझी प्राप्ती। सुखसंपत्ती निजबोधु॥431॥
जरी जाहली स्त्रीपुत्रगृहस्थिती। परी न धरावी त्यांची आसक्ती।
सावध राखावी चित्तवृत्ती। परमात्मयुक्तिसाधने॥493॥
नाथांच्या धर्मपत्नीचे नाव होते गिरिजाबाई. नाथांचे गुरू जनार्दनस्वामी यांनीच
नाथांना विवाह करून गृहस्थाश्रम चालविण्याची आज्ञा केली होती. त्यांनी सांगितले होते, 'गृहस्थाश्रम
सर्व आश्रमात उत्तम आहे. सर्वांभूती भगवद्भाव ठेवून स्वधर्म आणि भूतदया यांचा परिपोष
करावा म्हणजे झाले.'
एकनाथ आणि गिरिजाबाई म्हणजे विवेक आणि शांती यांचेच ऐक्य होय, असे या गृहस्थाश्रमाबाबत
सांगावे लागते. बऱ्याच संतांचा गृहस्थाश्रमाचा त्याग करण्याकडेच कल असतो. यामुळे सामान्यजनांच्या
मनातही परमार्थ साधनेसाठी तसेच केले पाहिजे, असा समज निर्माण
होतो. तो कितपत बरोबर आहे वा गैर आहे, याची चर्चा फारशी उपयुक्त
ठरणारी नाही. पण नाथांच्या गृहस्थाश्रमाच्या रूपाने आपण परमार्थ साधनेचा मुद्दा स्पष्ट
करू शकतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतांचे भौतिक गोष्टींकडे, ऐहिक गोष्टींकडे,
प्रपंचाकडे व संसाराकडे दुर्लक्ष झालेले आहे, अशी
सतत हाकाटी बुध्दिमान माणसे करीत असतात. यांच्यात सुशिक्षित व्यक्तींचा आणि विचारवंतांचाही
भरणा असतो. त्यामुळे नाथांचा गृहस्थाश्रम आणि सध्याच्या काळातील सामान्य जनांचा गृहस्थाश्रम
यांची तुलना होऊ शकत आहे, असेही म्हणता येते. त्या काळातील आव्हाने
आणि वर्तमानकाळातील आव्हाने वेगळी असल्यामुळे येथे नाथांच्या गृहस्थाश्रमाचे गोडवे
गाऊन भागणार नाही, असेही त्यांना वाटू शकते.
आज नवराबायको हे दोघेही काम करणारे आणि कमवते असतात. बाहेरच्या जगात वावरताना बरीचशी
समान आव्हाने त्यांच्यासमोर असतात. किंबहुना आपल्यासमोरची आव्हाने ही अधिक गडद आहेत
असा दावा दोन्ही पक्ष करू शकतो. त्यामुळे गिरिजाबाईंनी जसा नाथांचा संसार सांभाळला
त्या पध्दतीची अपेक्षा नव्या जमान्यातील महिलांकडून करणे योग्य होणार नाही, असेही वाटण्याचा
संभव आहे.
शेवटी सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतांच्या चरित्राबाबत ऐतिहासिक साधनांतून
फारशी माहिती मिळत नाही. संतकवींनी ग्रंथादिकांत जी चरित्रे वर्णिली आहेत त्यातूनच
ही माहिती घ्यावी लागते. मात्र या चरित्रांचा उद्देश संतांचे अलौकिकत्व आणि चमत्कार
व भक्तीसामर्थ्य लोकांच्या मनावर ठसविणे हाच असल्यामुळे आपल्या चरित्रात्मक अपेक्षा
फारशा पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्यामुळे नाथांच्या चरित्रकथांमधूनच आपल्याला गिरिजाबाईंसोबतच्या
त्यांच्या गृहस्थाश्रमाचे मर्म उलगडावे लागणार आहे. या लेखाची ही मर्यादा आहे.
संसार म्हटला की काही कामांची विभागणी आलीच. आजही अमुक कामे पुरुषांची व अमुक कामे
बायकांची असा समज मोठया प्रमाणात समाजात आढळतो. ही कार्यविभागणी चूक वा बरोबर हे ठरविता
येणार नाही. मात्र गिरिजाबाई महिलांची समजली जाणारी कामे नाथांचा संसार चालविताना करीत
होत्या हे मात्र खरे! मात्र बऱ्याचदा गृहकृत्यांवरून आताच्या छोटया नवराबायको आणि अपत्य
अशा कुटुंबात वादविवाद नसतात, हे मात्र खरे म्हणता येणार नाही. हे वादविवाद विकोपाला जाऊन संसार
तुटण्यापर्यंत मजल जाताना आपण पाहतो. त्यामुळे नाथांच्या गृहस्थाश्रमाचे मूल्यमापन
करताना आपण त्या काळातील आव्हाने पाहून व त्या काळातील साधारण लोकमानसिकता पाहून त्या प्रसंगात नाथ व गिरिजाबाईंनी
एकमेकांना कशी साथ दिली व प्रत्येक प्रसंगातून कसे निभावून नेले याचा आढावा घेतला पाहिजे.
नाथ हे संत होते तसे आजच्या भाषेत समाजसुधारकही होते. गेल्या शतकातील समाजसुधारकांना
ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागले त्या प्रसंगांचा सामना नाथांनाही करावा लागला होता.
अशा प्रसंगात आपण स्वीकारलेल्या मूल्यांशी तडजोड न करताना, वेळप्रसंगी ती
मूल्ये स्थापित करताना नाथांनी जो लढा दिला तो अभूतपूर्व म्हटला पाहिजे. नाथांनी जे
काही करून दाखविले तसे कार्य त्यांच्या अगोदरच्या काळात घडलेले फारसे आढळत नाही. नाथ
हे तथाकथित उच्च वर्णातील असल्यामुळे त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्याला अंगभूत मर्यादा
होत्या. मात्र येथे असे नमूद करायला हवे की, प्रसंगी या मर्यादा
ठोकरून लावूनही नाथ हे खरे मर्यादापुरुषोत्तम ठरले आहेत आणि यातच त्यांच्या कार्याची
यशस्वीता आहे.
अशा समाजसुधारक पुरुषाला खरे म्हणजे कोणत्याही बाह्य शत्रूशी लढा द्यावा लागत नाही.
त्याचा खरा लढा हा स्वकियांशी आणि आप्त जनांशीच असतो. तसा लढा नाथांनी दिला आहे. हा
लढा सर्वांत कठीण असतो. कारण या आंतरिक मानसिक पातळीवर जेव्हा उतरतो तेव्हा लढा देणाऱ्याला
मोठया प्रमाणात मनस्ताप भोगावा लागतो. अशा प्रसंगात त्याचे मनोधैर्य कायम राहावे म्हणून
सहधर्मचारिणीची खंबीर साथ आवश्यक असते. ही साथ हिमालयाच्या सावलीप्रमाणे असते. येथे
उल्लेख करायला हवा की, गिरिजाबाईंनी आपल्या पतीला त्याच्या 'वेडया'
कार्यात सतत साथ दिली. त्याची कोणत्याही प्रकारे संभावना केली नाही.
यांची तुलनाच करायची झाली तर महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
या जोडप्याशीच करायला हवी. ही तुलनाही याचसाठी की हे जोडपे अलीकडच्या काळातील असल्यामुळे
व त्यांच्या जीवनचरित्राशी आपण थोडयाफार प्रमाणात परिचित असल्याने गिरिजाबाई व नाथ
यांच्या आयुष्यात डोकावण्यासाठी थोडाफार झरोका यांच्याच चरित्रातून आपल्याला लाभू शकतो.
ही प्रस्तावना पुरेशी असून आता आपण या जोडप्याच्या चरित्राकडे वळूया.
नाथांच्या घरी सदावर्त अर्थात अन्नछत्र होते आणि सर्वांना अन्नदान केले जात असे.
रात्री नाथांच्या घरातील टाळमृदंगांचा ध्वनी ऐकून सारे गाव कीर्तनाला गोळा होत असे.
येथे तथाकथित अस्पृश्य समाजाला देखील मनाई नव्हती. 'सकळांसी येथे आहे अधिकार' ही उक्ती नाथांनी सार्थ करून दाखविली होती. नाथांचा एक नातेवाईक उध्दव हा नाथांच्या
गृहप्रपंचाची व्यवस्था सांभाळत असे. नाथांना त्याकडे फारसे लक्ष द्यावे लागत नसे. त्यांच्या
हातून जी विपुल साहित्यरचना व ग्रंथरचना घडून आली, याचे रहस्य
अगदी असे उघड आहे. नाथांचे महत्त्व जाणून हा उध्दव नाथांच्या शिष्याच्या रूपाने त्यांच्या
सेवेत दंग झाला होता.
नाथांचे लग्न झाले तेव्हा त्यांच्या पत्नीचे वय फारसे नव्हते, पण तरीही तिने
घरप्रपंच सांभाळला होता. गृहस्थाश्रमाविषयी नाथांचीच उक्ती अशी आहे, 'प्रीति व्हावया पतिमानसी। कुळवधू मानी सासुसासऱ्यांशी॥' गिरिजाबाई आपल्या (आजे)सासुसासऱ्यांचा मान अगदी आपल्या आईवडिलांप्रमाणे ठेवत
असे. यामुळे नाथांची विशेष प्रीती त्यांना लाभली होती. तसे पाहता, लग्नानंतर काही वर्षांनी नाथांची आजी वारली व पाठोपाठ काही दिवसांनी आजोबाही
निवर्तले. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रपंचाचा भार गिरिजाबाईंवर पडला.
आपल्या पतीची महत्ता गिरिजाबाई जाणून असे. असा पती आपल्याला लाभल्याबद्दल त्यांना
धन्यताच वाटत असे. पण विशेष गोष्ट म्हणजे 'दोन देहांत एकच आत्मा' नांदत असल्याप्रमाणे या दोघांची अवस्था होती. परोपकार करण्यात व आबालवृध्दांशी
समप्रेमाने वागण्यात गिरिजाबाई नाथांहून कांकणभरही कमी नव्हत्या. एकाला झाकावे आणि
दुसऱ्याला समोर करावे ही उक्ती त्यांच्याबाबती सार्थ ठरावी. नाथांप्रमाणे गिरिजाबाई
या दीन-अनाथांच्या माऊली होत्या. दारात आलेला अतिथी विन्मुख जाणार नाही अशी नाथांची
इच्छा होती आणि तीच गृहिणीच्या रूपाने प्रत्यक्ष त्यांच्या घरात नांदत होती,
हेच खरे! रात्री-अपरात्री कोणी भुकेला आला तर तेव्हाही चूल पेटवून त्याला
जेऊ घालण्यात या माऊलीने कधी कंटाळा केला नाही. आपला संसार सांभाळून गिरिजाबाईसुध्दा
नाथांप्रमाणेच हरिचिंतनात सर्वकाळ निमग्न असत. नाथांचा प्रपंच आणि परमार्थ एकरूप होण्यास
गिरिजाबाई यांचे मोठेच साह्य झालेले आहे. कधी तर असे वाटते की नाथांनी गृहस्थाश्रमाचे
जे आपल्या साहित्यात आदर्श म्हणून चित्रण केले आहे ते त्यांच्या प्रापंचिक वास्तवावरच
आधारित असावे.
त्यांनीच एकनाथी भागवतात असे म्हटले आहे,
'स्त्रीपुरुषांची
चित्तवृत्ति। अनुकूल वर्ते धर्मप्रवृत्तीं।
तरीच परलोक साधिती। इतरां प्राप्ति ते नाही॥'
(अध्याय 7-612)
पती आणि पत्नी या दोघांच्याही चित्तवृत्ति धर्मानुकूल असतील तरच प्रपंचात परमार्थ
साधतो, ही नाथांची
उक्ती पूर्णतः स्वानुभवाचीच होती. प्रपंचाचा अंतरंग गिरिजाबाई यांनी व बहिरंग उध्दवाने
सांभाळल्यामुळे नाथांचा गृहस्थाश्रम हा खऱ्या अर्थाने सफल ठरला.
गृहिणीचे चित्त किती उदार आणि विशाल असावे असे सांगताना नाथ म्हणतात -
'अतिथि आणि पतिपुत्रासी।
भोजनी समता नित्य जिसी।
धनलोभ नाही मानसी। परमार्थी तिसी अधिकारू॥' (नाथभागवत, अ. 29-584.)
नाथांचा संसार सुखाचा होण्यास गिरिजाबाईंचे अनेक सद् गुण कारणीभूत ठरले आहेत. पतीपत्नी
इतक्या एकचित्ताने वागल्याचा दाखला अपवादानेच दिसेल. काही संतांनी तर संसार केलाच नाही.
काहींनी विवाह करून प्रपंच चालवित परमार्थ केलाही पण त्यात ते फार सफल झाले असे दाखले
आढळणार नाहीत. नाथांचा प्रपंच खरोखरच सर्वोत्कृष्ट म्हणायला हवा. भगवंताचे भजन आणि
अन्नदान यामुळे नाथांच्या वाडयाला मंदिराची शोभा येत असे. या मंदिरात एक आदर्श जोडपे
जणू लक्ष्मीनारायणाच्या रूपाने वावरत आहेत असेच भाविकांना वाटत होते. लोकमान्य पुरुषरत्नांत अग्रेसर असा नाथांसारखा पुरुष
आणि सत्क्रियेची साक्षात मूर्ती म्हणजे गिरिजाबाई यांच्यासारखी स्त्री अशा तुल्यगुण
वधुवरांना एकत्र आणल्यामुळे ब्रह्मदेवसुध्दा कधीकाळी मिळणाऱ्या धन्यवादास पात्र झाला
असावा. कलियुगात नाथांसारखा प्रपंच नाथांचाच झाला, अशी भावना संतसाहित्याचे अभ्यासक ल.
रा. पांगारकर यांच्यासारख्यांनी व्यक्त केली आहे.
सर्व दानांत श्रेष्ठ अन्नदान होय. नाथांनी ते व्रत जन्मभर चालविले. तसेच त्यांच्याकडे
ज्ञानदानाचे सत्रही होते. नाथांच्या पुराणकीर्तनाचा जो परिणाम लोकांवर व्हावयाचा तो
झालाच, पण त्याहून
उत्तम परिणाम त्यांच्या सदाचाराचा झाला. शेकडो व्याख्यानांनी व भाषणांनी होत नाही एवढे
कार्य सत्पुरुषाच्या आचरणाच्या माध्यमातून घडून येते. मोठमोठया गोष्टी सांगून त्याचा
परिणाम लोकांच्या मनावर अजिबात होत नाही. पण बोले तैसा चाले असे उदाहरण पाहायला मिळाले
की त्याचे लोक आपोआप अनुकरण करण्याचा प्रयास करतात. संत एकनाथ म्हणजे क्षमा,
शांती, भूतदया, निरहंकार,
निःसंगता, हरिभक्ती, परोपकार
व इंद्रियदमन या दैवी संपदेचे साक्षात पुतळे होते. ते क्रियावान पंडित होते. नाथांनी
साहित्यरचना केली व मोठमोठे ग्रंथ लिहिले म्हणून समाजावर त्यांची छाप बसली या पेक्षा
त्यांच्या सदाचरणाने ती हजारोपटीने समाजमानसावर प्रतिबिंबित झाली हीच गोष्ट खरी म्हणायला
हवी.
जेव्हा नाथांच्या सदाचरणामुळे समाज प्रभावित होऊन कर्मकांडांपेक्षा सदाचरणाला महत्त्व
देऊन नाथांचे अनुकरण करू लागला तेव्हा निस्तेज झालेले पैठणचे वैदिक, पंडित,
भिक्षुक अशी मंडळी नाथांचा द्वेष करू लागली. ते द्वेषाने इतके आंधळे
झाले की नाथांची निंदा करू लागली व पुढे त्यांचा छळ करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले
नाही. नाथ देववाणीचा उपमर्द करून प्राकृत ग्रंथ लिहितात, सकाम
व्रताचरणांचा उपहास करून भक्तिमार्गाचे स्तोम माजवितात, हीन वर्ण
व अंत्यजांना जवळ करतात, इत्यादी आक्षेप घेतले जाऊ लागले. खरे
तर नाथांना दंभधर्म नको होता, पण ज्यांनी दांभिकता माजविली होती
असेच लोक नाथांच्या विरोधात गेले. नाथ निर्भयपणे दंभ व दांभिक यांच्यावर प्रहार करीत
होते. नाथांचे 'बाह्य वेषधाऱ्यास उपदेशपर अभंग' पाहिल्यावर त्यांनी दंभस्फोट करण्याचे काम किती चोखपण केले हे दिसून येते.
त्यांचे हे क्रांतिकार्यच होते. हा काळ त्यांच्या आयुष्यातील अग्निपरीक्षेचा काळ होता.
दुराचारी, ढोंगी, लुच्चे व नास्तिक असे
केवळ ब्राह्मण आहेत म्हणून नाथ त्यांचा कैवार घेत नव्हते. उलट ते नास्तिक व दुराचारी
ब्राह्मणापेक्षा हरिभक्त महाराला अनंत पटीने श्रेष्ठ मानत होते व तसे वागवितही होते.
मनुष्याचा स्वभावच आत्मस्तुतिप्रिय आहे, त्याला निंदेचे वावडे
असते. दुसऱ्याची निंदा स्वतः करायची नाही, पण दुसऱ्याने केलेली
निंदा मोठया मनाने सोसायचे मेरूप्रमाणे धैर्य ज्यांच्या अंगी असते तेच पुरुष थोर कार्य
करू शकतात आणि थोर ठरतात. नाथांच्या मागे निंदकछलकांचा ससेमिरा अगदी जन्मभर लागला होता.
गृहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यापासून गोदातीरी देह ठेवीपर्यंत त्यांची निंदकांनी पाठ
पुरविली होती. पण नाथांनी समदृष्टीने निंदकांनाही गुरूच मानले. नाथांच्या साधुत्वाच्या
व चमत्काराच्या जितक्या गोष्टी महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत, तितक्या
बहुधा कुणाबाबत अपवादानेच आढळतील. नाथांना गृहस्थाश्रमात वागताना अनेक प्रकारच्या प्रसंगांचा
सामना करावा लागला. अशा प्रसंगी ते धैर्याने व शांतपणाने वागले. असे धैर्य व शांती
सामान्यतः कोणाच्याही आचरणात दिसत नाही. अशा
सर्व प्रसंगांत त्यांना आपल्या गृहस्वामिनीची पुरेपूर साथ लाभली. एक अत्यंत मासलेवाईक
प्रसंग येथे नमूद करायला हवा.
एक परगावाचा ब्राह्मण आपल्या मुलाच्या मुंजीसाठी शेदोनशे रूपयांच्या आशेने पैठणमध्ये
आला असताना तेथील कुटाळकंपूने त्याला सांगितले, ''येथील एकनाथ महाराजांना राग येत नाही असे
म्हणतात, पण त्यांना राग आणून दाखविलास तर तुला दोनशे रूपयांचे
बक्षीस देऊ.'' हा ब्राह्मण थेट नाथांच्या वाडयात शिरला. त्यावेळी
नाथ देवपूजा करीत होते. तो तसाच नाथांच्या मांडीवर जाऊन बसला. त्याचे विचित्र वागणे
पाहून नाथ हसतमुखाने म्हणाले, ''मला भेटायला अनेक जण येतात. पण
आपले प्रेम विलक्षणच आहे.'' आपल्या प्रयत्नाला अपयश आले तरी ब्राह्मणाने
आशा सोडली नाही. तो नाथांच्या घरात बसून राहिला. दुपारी जेवणाच्या वेळी त्या ब्राह्मणाचे
पान नाथांच्या पानाशेजारीच मांडण्यात आले.
जेव्हा गिरिजाबाई पानावर तूप वाढायला आल्या आणि वाकल्या तेव्हा त्या ब्राह्मणाने
टुणकन् त्यांच्या पाठीवरच उडी मारली. त्याबरोबर नाथ म्हणाले, ''जरा सांभाळ हो. हे बिचारे पडतील एखादेवेळेस!' गिरिजाबाई
म्हणजे नाथांच्या धर्मपत्नीच! त्यासुध्दा हसतमुखाने म्हणाल्या, ''अहो, हरिपंडिताला पाठीवर घेऊन मला काम करायची सवय आहे.
मी आपल्या बाळाला मुळीच पाडणार नाही.'' हे बोल ऐकून तो ब्राह्मण
अत्यंत ओशाळला व त्याने नाथांच्या पायांवरच डोके ठेवले.
नाथांना या माऊलीने जीवनभर अशीच साथ दिली. वडिलांच्या श्राध्दप्रसंगी, दारावरून जाणाऱ्या
महारांचा संवाद ऐकून हे श्राध्दाचे भोजन त्यांना देऊन टाकावे असे नाथांनी गिरिजाबाईंना
सांगितले. आपल्या पतीचे म्हणणे अत्यंत उल्हासाने गिरिजाबाईंनी ऐकले व त्या म्हणाल्या,
''आपल्याकडे अन्न पुष्कळ आहे. या अंत्यजांच्या बायकांनाही मुलालेकरांसकट
बोलवा म्हणजे येथेच सर्वांना पंगतीत वाढता येईल.'' नाथांना ते
आवडले व त्यानुसार अंत्यज वर्गाचीच पहिली पंगत बसली. ते सर्वजण जेवून तृप्त झाले. यानंतर
ब्राह्मणांचा गर्वहरण करण्यासाठी थेट पितरांनाच श्राध्दाचे भोजन देण्याचा चमत्कार ग्रंथात
आलेला आहे. पण यापेक्षा मोठा चमत्कार म्हणजे जुन्या काळच्या संस्कारात वाढलेल्या गिरिजाबाईंनी
आपल्या पतीला जी साथ दिली तो मोठा चमत्कार होय. बऱ्याचदा समाजसुधारकांना घरून अशी साथ
मिळत नाही. जे काही करायचे ते घराबाहेर करा, अशी भूमिका घरच्या
मंडळींनी घेतल्यामुळे अनेक सुधारक मंडळींची
कुचंबणा झाली याला इतिहास साक्ष आहे. मात्र नाथांच्या क्रांतिकारक विचारांना त्यांच्या
घरातूनच पहिली साथ गिरिजाबाईंनी दिली आणि त्यामुळे नाथांना समाजपरिवर्तन करून दाखविता
आले व एक आदर्श प्रस्थापित करता आला. संत एकनाथांनी अगदी वेश्येच्या घरी जाऊन तिलाही
उपदेश दिला. लोकांनी त्यांच्यावर राळ उडविली असेल ती असो. पण आपल्या पत्नीचा आपल्यावर
असलेल्या विश्वासाच्या बळावरच हे साहस नाथांनी दाखविले हे नमूद करायला हवे. अंत्यजाचे
मूल वाळवंटातून उचलून थेट त्याच्या घरी पोहोचविणे, घरात चोरी
करण्यास शिरलेल्या चोरांनाही पोटभर भोजन घालणे, महारवाडयात जाऊन
राण्या महाराचा घरी भोजन करणे असे इतरही प्रसंग सांगता येतील.
नाथ व गिरिजाबाईंना एकूण तीन अपत्ये झाली. प्रथम गोदावरी ही कन्या, त्यानंतर हरिपंडित
हा पुत्र व शेवटी गंगा नावाची कन्या. याच गोदावरीच्या
पोटी मुक्तेश्वर नावाचा महाकवि जन्मला. नाथांचा पुत्र हरिपंडित हा सनातनी वृत्तीचा
विद्वान होता. नाथांचे वर्तन त्यालाही पसंत न पडल्यामुळे तो काशीला स्थायिक झाला होता.
पण नाथांनी मोठया मनाने त्याला परत पैठणला आणले. नंतर त्यालाही आपल्या पित्याचे महत्त्व
कळून आले. तो पितृभक्त होताच, पण नंतरच्या काळात त्यानेही वडिलांची
आज्ञा हीच शास्त्राज्ञा मानून कार्य केले. आपले वडील हे खरेच महात्मा आहेत असे हरिपंडितालाही
कळून चुकले. नाथांनी अतिशय संयमाने हे परिवर्तन हरिपंडितात घडवून आणले व आपला गृहस्थाश्रम
धन्यवत व आदर्श करून दाखविला.
नाथांच्या चरित्राचा बोध इतका घेतला पाहिजे की पतीच्या अंगीकृत कार्यात पत्नी जेव्हा
समरस होते, ते कार्य
हे लोकोत्तर आहे व आपले समजून करणीय आहे असे मानते तसेच त्यानुसार त्याला साथ देते
तेव्हा त्या कार्याच्या सफलतेची ती नांदीच असते असे समजावे. नाथांचा गृहस्थाश्रम धन्य
होण्यास गिरिजाबाईंची ही वृत्ती मोठया प्रमाणात कारणीभूत झाली, हे वास्तव लक्षात घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment