Friday, 11 March 2016


हरिपाठ व मनाचे श्लोक यांतील साम्यस्थळे -  उत्तरार्ध

हरिपाठ व मनाचे श्लोक यांतील साम्यस्थळे
ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)


समर्थ पुढे सांगतात -
भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त झाले ।
जिवा जन्मदारिद्रय ठाकूनि आले ॥
देहबुध्दीचा निश्चयो ज्या टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ 138
तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी असे म्हणतात बरे! कुठे तरी आपला ठेवा पुरून ठेवावा आणि ती जागा चुकल्यामुळे कपाळकरंटयाला तो ठेवा पुन्हा मुळीच सापडू नये; कारण असा जीव जन्मदारिद्रय भोगणाराच समजला पाहिजे.
जन्म म्हणजे उपजणे आणि करंटेपण म्हणजे दारिद्रय अर्थात जन्मदारिद्रय म्हणजे उपजत करंटेपण होय. हीच गोष्ट स्पष्ट करताना माउली सांगतात -
उपजोनि करंटा नेणे अद्वैत वाटा ।
रामकृष्णी पैठा कैसेनि होय ॥ 2 ॥  
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
तया कैसे कीर्तन घडे नामी  ॥ 3.9 ॥ 
द्वैताच्या झाडणीबद्दल समर्थ पुढे काय सांगतात ते पाहा -
भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत ते संत आनंत पाहे ॥
जया पाहता द्वैत काही दिसेना ।
भयो मानसी सर्वथाही असेना ॥ 136
भगवंताचा साक्षात्कार कसा घडून येतो याबाबत सांगताना समर्थ म्हणतात -
कळे आकळे रूप ते ज्ञान होता ।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ॥
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे ॥
तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥ 200
माउली सूत्ररूपाने असे सांगतात -
भावबळे आकळे एरव्ही नाकळे ।
करतळी आवळे जैसा हरि ॥ 2.12 ॥ 
तळहातावर घेतलेला आवळा जसा आपण सर्व बाजूने न्याहाळू शकतो तसे हरीचे दर्शन घडते; म्हणजेच तोचि तो राम सर्वत्र पाहे ! पण केव्हा 'भावबळे आकळे' अर्थात 'कळे आकळे रूप ते ज्ञान होता!'' आहे की नाही गंमत!
भगवंताचे नाम तेचि रूप आणि रूप तेचि नाम हे अभिन्नत्व ठसावणारे साम्य आपल्याला या दोन्ही संतांच्या रचनेमध्ये खालीलप्रमाणे दिसते-
समर्थ सांगतात -
नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे ।
रघूनायका उपमा ते न साहे ॥ 197
माऊली सांगतात -
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।
गगनाहूनी वाड नाम आहे ॥ 4.22
थोडक्यात सांगायचे तर, नभ म्हणजेच गगन होय! आकाशाने संपूर्ण सृष्टीला व्यापून टाकलेले असल्यामुळे भगवंताच्या रूपाला तशी उपमा देता येईल का? समर्थ सांगतात की, मुळीच नाही! भगवन्नाबाबतही गुरु निवृत्ती महाराज माउलींना तेच सांगतात की, गगनाहूनी वाड नाम आहे! एकूण काय - भगवंताचे नाम आणि रूप नभाहूनही 'पर' असे आहे!
रामनामाचे महत्त्व इतके मोठे आहे की, स्वतः भगवान शंकरसुध्दा रामनामाचा जप करतात असे मनाच्या श्लोकात पुढे समर्थ सांगतात -
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥31
बहू नाम या रामनामी तुळेना ।
अभाग्या नरा पामरा हे कळेना ॥
विषा औषधा घेतले पार्वतीशे ।
जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥82
जेणे जाळिला काम तो राम ध्यातो ।
उमेसी अती आदरे गूण गातो  ॥
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।
आत्मा जो शिवाचा रामजप  ॥ 2.8
राम नामाचा जप हा भगवान शिवाचा आत्मा म्हणजे जीव की प्राण आहे, असे माऊली ज्ञानोबाराय सांगतात आणि समर्थ रामदाससुध्दा भगवान शंकर रामनामाचा जप करतात हे सांगताना त्यांचे शूलपाणी, पार्वतीश आणि कामाला जाळणारा असे वर्णन करतात.
नारायण नामाचा जप हेच सर्व साधनांचे सार आहे या सिध्दान्ताला वेद, श्रुती, शास्त्रे व पुराणे यातील वचन प्रमाण आहे आणि वेदशास्त्रपुराणे हेसुध्दा हरिनामाचे गायन करतात असे माऊली सांगतात व  हाच भाव समर्थ व्यक्त करतात.
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
जयाचेनि योगे समाधान बाणे
तयालागि हे सर्व चांचल्य दीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे  ॥39
नेमके असेच वर्णन हरिपाठात माउली करतात-
वेद शास्त्र पुराण श्रुतीचे वचन ।
एक नारायण सार जप  ॥ 1 .19
चहू वेदी जाण षट्शास्त्री कारण ।
अठराही पुराणे हरिसी गाती ॥ 1.2 ॥  
ज्याचे भगवंताच्या नामाच्या ठिकाणी चित्त नाही, लक्ष नाही, प्रेम नाही, त्याने त्रिवेणी संगमादी नाना तीर्थयात्रा जरी केल्या तरी  त्या व्यर्थ आहेत. समर्थ हीच गोष्ट बहु हिंडता सुख मिळणार नाही असे म्हणून रामनामात आपल्या मनाला स्थिर करा असे सांगतात.
बहू हिंडता सौख्य होणार नाही ।
शिणावे परी नातुडे हीत काही
विचारे बरे अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥41॥  
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥ 1.10
समर्थ मौनमुद्रा सांगतात तर माऊली मौन जपमाळ अंतरी असे सांगतात.  तसेच नामस्मरणाशिवाय अन्य पंथाला जाऊ नकोस असे सांगताना राम नसेल ते धाम सोडून द्यावे असे समर्थ सांगतात. 
मना रे जनीं मौनमुद्रा धरावी ।
कथा आदरे राघवाची करावी
नसे रामे ते धाम सोडूनि द्यावे ।
सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥44
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
नामापरते तत्त्व नाही रे अन्यथा ।
वाया आणिका पंथा जाशी झणी ॥ 3
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी ।
धरोनी श्रीहरि जपे सदा ॥ 4.26 ॥ 
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ।
नामपाठे मौन प्रपंचाचे ॥ 4.9 ॥  
मानवाचे लक्ष भगवंताच्या नामाकडे लागत नाही असे सांगताना समर्थ म्हणतात -
अती मूढ त्या दृढ बुध्दी असेना ।
अती काम त्या राम चित्ती वसेना
अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥64
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
नामासी विन्मुख तो नर पापीया ।
हरिविण धावया न पावे कोणी ॥ 2.10 ॥  
पर्वताप्रमाणे पातक करणे ।
वज्रलेप होणे अभक्तांसी  ॥ 1 ॥ 
नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त ।
हरिसी न भजत दैवहत  ॥ 2.7
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण ।
जडजीवा तारण हरि एक  ॥ 2.21 ॥ 
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ॥2.1

समर्थ म्हणतात की, नामस्मरणाने महादोष जातात -
जयाचेनि नामे महादोष जाती ।
जयाचेनि नामे गती पाविजेती
जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥71
तर माऊली म्हणतात की, नामस्मरणाने सर्व दोष जातात. तसेच समर्थ सकाळी रामनामाचे स्मरण करा म्हणून सांगतात तेथे माऊली हरि मुखे म्हणा असे सांगतात. याचे फळ म्हणजे आपल्याला ज्याची गणना करता येणार नाही असा पुण्यठेवा जोडला जाणार आहे याबाबत दोन्ही संतांचे एकमत आहे. त्याचप्रमाणे हरिनामाने जडजीवांचे तारण होणार आहे त्याचप्रमाणे रामनामाने उत्तम गती प्राप्त होणार आहे. म्हणजे वेगळया शब्दांत एकच अर्थ सांगितला गेला आहे.
भगवंताच्या नामस्मरणाबाबत रामदास सांगतात-
नव्हे कर्म ना धर्म ना योग काही ।
नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही
म्हणे दास विश्वास नामी धरावा ।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥76
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वाघटी राम भाव शुध्द  ॥ 1 ॥ 
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्णी टाहो नित्य फोडी ॥ 2.24
जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म आदि उपासनेचे जे अनेक प्रकार आहेत त्यांचा अंतिम हेतू साधकांच्या ठिकाणी 'सर्वांघटी राम' या शुध्द भावाचा आविर्भाव होण्यासाठीच असतो. यासाठी हा भाव मनातून जाऊ देऊ नका, याचा विसर पडू देऊ नका. अंतःकरणातून सर्व प्रकारच्या संशयाला हद्दपार करा आणि शुध्द भावाचा जीवनात साक्षात्कार होण्यासाठी रामकृष्णहरी असा भगवंताच्या नावाचा टाहो फोडून नित्य धावा कर, असा उपदेश माऊली हरिपाठातून करतात. समर्थ रामदाससुध्दा अन्य सर्व मार्गांपेक्षा भगवंताच्या नामाबाबत मनात विश्वास धरावा आणि सतत रामनाचे चिंतन करावे असेच सांगतात.
समर्थ रामदास पुढे सांगतात -
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे रामनामावळी नित्यकाळी
पता पापरूपी तया देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥96
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला ।
उध्दवा लाधला कृष्ण दाता ॥ 5 ॥  
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।
सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ 6.8 ॥  
भक्त आणि भक्ती याचे उदाहरण देताना समर्थ रामदास आणि माऊली दोघेही भक्त प्रल्हादाचे उदाहरण देतात. माऊली सांगतात - नामस्मरणामुळे अमृत तत्त्वाची प्राप्ती होते त्यामुळे लहानपणापासून अतिशय त्वरेने भक्त प्रल्हादाने भगवंताच्या नामस्मरणाची आवडी धरली. त्याचप्रमाणे उध्दवालाही भगवंताच्या कृपेने हा ठेवा लाभला. ज्याने आपला उध्दार घडून येतो ते नामस्मरण हे सुलभ असे साधन आहे, पण त्याचे महात्म्य जाणणारे दुर्लभ म्हणजे विरळाच आढळतात. प्रत्यक्ष भक्त प्रल्हादाचा पिता हा भगवन्नामस्मरणाचा विरोध करीत होता. हीच गोष्ट समर्थ आपल्या मनाच्या श्लोकातून सांगतात.
समर्थ रामदास हेच सांगतात की, ज्या मनुष्याला भगवन्नाम आवडत नाही त्याला यमराज नाना प्रकारे जाच करतो, यासाठी मनुष्याने रामनामाची आवडी धरावी आणि सतत नामाचेच स्मरण करावे.
जया नावडे नाम त्या यम जाची ।
ल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥
म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे ।
मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥ 101
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
हरिविण जन्म तो नर्कचि पै जाणा ।
यमाचा पाहुणा प्राणी होय ॥ 3 ॥    
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।
गगनाहूनि वाड नाम आहे ॥ 4 .22॥ 
 माऊली सांगतात की, हरिनामस्मरणावाचून जन्म गेला म्हणजे नरकच प्राप्त होणार. जो नामस्मरण करीत नाही असा मनुष्य यमराजाच्या घरी पाहुणचार भोगण्यास अर्थात तेथे आपले हाल करून घेण्यासाठी जाणार. त्याला शिक्षा करण्यासाठी यमराज परलोकात घेऊन जातो. यासाठी माऊली मोठया प्रेमाने आणि आस्थेने गुरुदेव निवृत्तिनाथांना नाममहिमा विचारतात तेव्हा गुरुदेव सांगतात की, नामाचा महिमा आकाशहूनही अगाध आहे.
समर्थ सांगतात - उत्तम गती मिळण्यासाठी म्हणजेच तरणोपाय होण्यासाठी सज्जनांची संगती आवश्यक आहे. कारण या संगतीने तर दुर्जनाच्या मतीतही पालट घडून येतो.
गतीकारणे संगती सज्जनाची ।
मती पालटे सूमती दुर्जनाची ॥
रतीनायिकेचा पती नष्ट आहे ।
म्हणोनी मनातीत होवोनी राहे ॥129
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
संतांचे संगती मनोमार्ग गती ।
आकळावा श्रीपती येणे पंथे ॥ 1 .8
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।
साधूचे संगती तरणोपाय ॥ 4.5
माऊली सांगतात की, संताच्या संगतीत मनोमार्गाला 'उलट गती' देणे हा श्रीपतीला प्राप्त करून घेण्याचा पंथराज आहे. समर्थ सांगतात की, मनातीत होऊन राहावे. या दोन्ही भूमिकांचा भावार्थ एकच आहे - 'मन हे रामरंगी रंगले'. जेव्हा मन रामरंगात तल्लीन होते तेव्हा ते मन उरत नाही. मनातीत अवस्था प्राप्त होते. माऊली अगदी दृष्टान्त देऊन असे सांगतात की, साधूच्या संगतीवाचून साधकाला तरणोपाय नाही.
समर्थ रामदास सांगतात की, आपण सज्जनांची संगती धरली पाहिजे कारण यामुळे भाव बळावतो, चांगली बुध्दी लाभते आणि सन्मार्ग सापडतो. याच्या बळावर आपण महाक्रूर आणि विक्राळ अशा काळालाही टक्कर देऊ शकतो. कारण साधक हरिरूप झाल्यावर त्याला काळाचे भय उरतच नाही.
धरी रे मना संगती सज्जनाची ।
जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥
बळे भाव सद्बुध्दि सन्मार्ग लागे ।
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥135
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
साधुबोध झाला नुरोनिया ठेला ।
ठायीच मुराला अनुभवे ॥ 1 ॥       
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ।
हरि दिसे जनी वनी आत्मतत्त्वी ॥ 4 .6
संतांच्या उपदेशाचा बोध ज्याला झाला तो त्या अनुभवाने आपल्या ठायीच मुरतो. त्यामुळे साधुंचे अंकित होऊन त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण वागले पाहिजे. माऊली सांगतात की, आम्हाला संतसंगतीचीच मोठी गोडी वाटते, कारण यामुळे जनी, वनी व आत्मतत्त्वी अशा प्रकारे सर्वत्र हरि भरून राहिलेला आहे असा त्याला निश्चित अनुभव आपल्याला येतो.
लोकांनी एकबाणी, एकवचनी अशा भगवान रामाचे नामस्मरण सतत करावे असे समर्थ सांगतात. तर रामकृष्णगोविंद हे नाम आपल्या वाचेने जपावे असे माऊली सांगतात. भगवंताचे नाव हेच एक मुख्य तत्त्व आहे आणि त्यामुळे तेच एक आपल्या अंतःकरणात दृढपणे धारण केले पाहिजे. मग तुझी हरिला अवश्य करुणा येईलच!
भजावा जनीं पाहता राम एकू ।
करी बाण एकू मुखी शब्द एकू
क्रिया पाहता उध्दरे सर्व लोकू ।
धरा जानकीनायकाचा विवेकू  ॥131
हाच भाव व्यक्त करताना माऊली हरिपाठात सांगतात -
एक तत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरिसी करुणा येईल तूझी  ॥ 1 ॥ 
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद् जपे आधी ॥ 2.26
खरे पाहता, अशी अनेक साम्यस्थळे या दोन संतांच्या विचारांत आढळतील पण त्यासाठी दोन्ही विचारधारांचा सांगोपांग विचारधारांचा सखोल अभ्यास करावा लागेल. प्रस्तुत लेखकाने आपल्या अल्प अभ्यासाच्या आधारावर ही साम्याची तुलना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात, काही जणांना ही तुलना आवडेल अथवा आवडणारही नाही. पण डोळसपणे या साम्यस्थळांचा आनंद घेणे अधिक चांगले असे सांगावेसे वाटते.
----------------------------------------


No comments:

Post a Comment