Wednesday, 16 March 2016

कीर्तनास उपयुक्त टिपणे


कीर्तनास उपयुक्त टिपणे


खालील अभंगांपैकी कोणताही अभंग मूळपद म्हणून घेता येतो आणि अन्य अभंग पूरक म्हणून सांगता येतात. पूर्ण अभंगासाठी गाथा पाहावा.



1.जशी संगत तसे फळ
भावे तुका म्हणे सत्संग हा बरा ।
कुसंग तो फेरा चौऱ्याशीचा ॥ तु.म.॥

2. ब्रह्मज्ञान झटपट कळत नाही. त्यासाठी संतसेवा करावी लागते.
ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी।
तरी का हिंपुटी वेदशास्त्रे ॥
याचसाठी संतपाय हे सेवावे ।
तरीच तरावें तुका म्हणे ॥ तु.म.॥

3. तप, व्रत, दान करून एकवेळ देवसुध्दा भेटेल, पण भाग्य असल्याशिवाय संत भेटणार नाही. भवरोगापासून मुक्त होण्यासाठी संतसंग करावा.
तपे व्रतें दानें गोविंद पैं भेटे ।
परि साधु तंव न भेटे भाग्येविण ॥
नामा म्हणे केशवा बरा साधुसंग ।
यावेगळा भवरोग न तुटे न तुटे ॥ ना.म.॥

4. संत हे सुखाचे आगर असल्यामुळे अन्य कोणतीही गोष्ट करू नका. केवळ संतसंग करा.
करिसील तो करी संतांचा सांगात ।
आणिक ते मात नको मना ॥
तुका म्हणे संत सुखाचे सागर ।
मना निरंतर धणी घेई ॥ तु.म.॥

5. संतांची भेट होणे अवघड आहे.
बहु अवघड आहे संतभेटी ।
तरी जगजेठी करुणा केली ॥ तु.म.॥

6. पूर्वजन्मी पुण्य केले असल्यामुळेच आज संतांची भेट झाली आणि भवदुःखाचा अंत झाला.
पूर्वजन्मी सुकृते थोर केली ।
ती मज आजि फळासि आली ॥
बापरखुमादेवीवरु विठ्ठले ।
संत भेटता भवदुःख फिटले ॥ ज्ञा.म.॥

7. संतांचे दर्शन झाल्यामुळे भाग्य उजळले. सर्व चिंता नष्ट झाली. देव जोडला गेला.
उजळले भाग्य आता ।
अवघी चिंता वारिली ॥
संतदर्शने हा लाभ ।
पद्मनाभ जोडला ॥ तु.म.॥

8. नदीचा ओघ आपोआप सागरात मिळून जातो तसे संतांच्या संगतीने आपोआप देव भेटतो. इतके हे सोपे आहे.
सरिताओघ जाय सिंधूसि मिळून ।
तैसा भेटे नारायण संतसंगे ॥
नामा म्हणे केशवा देई संतसंग ॥
आणिक काही तुज न मागे बापा ॥ ना.म.॥

9. सूर्य, हिरा, दिवा या गोष्टी दृश्य वस्तूच दाखवितात. अदृश्य वस्तू दाखविण्याचे सामर्थ्य केवळ संतांपाशी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आपण न बोलावता गेलो पाहिजे.
रवि दीप हिरा दाविती देखणें ।
अदृश्य दर्शनें संतांचेनि ॥
तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे ।
संतचरणीं भावें रिघावया ॥ तु.म.॥

10. संतांचे दर्शन झाल्यामुळे आजचा दिवस धन्य आहे. संत आपल्या घरी येतील तीच दिवाळी आणि तोच खरा दसरा.
धन्य आजि दीन । झाले संतांचे दर्शन ॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा ॥ तु.म.॥

11. ज्याप्रमाणे गाय आपल्या वासराची काळजी घेते त्याप्रमाणे संत माझी काळजी घेतात आणि मला निरंतर जागवितात. त्यांचे उपकार काय सांगावे?
काय सांगो आतां संतांचे उपकार ।
मज निरंतर जागविती ॥
तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्तीं ।
तैसे मज येती सांभाळीत ॥ तु.म.॥

12. संतांचे दर्शन झाल्यामुळे आजचा दिवस धन्य आहे. अनंत जन्मीचा शीण गेला. आता त्यांचा वियोग व्हावा असे वाटत नाही.
धन्य आजिं दीन संतदर्शनाचा ।
अनंत जन्मीचा शीण गेला ॥
एकाजनार्दनी घडो त्यांचा संग ॥
न व्हावा वियोग माझ्या चित्ता ॥ ए.म.॥



Monday, 14 March 2016



हरिकीर्तन प्रबोधिनीचे प्रयोजन - एक संवाद



ऑनलाइन कीर्तनाच्या अभ्यासक्रमाविषयी अनेकांनी आम्हाला विविध शंका विचारल्या. त्या सर्वांच्या शंकांचा समावेश करून हा प्रातिनिधिक संवाद तयार केला आहे.
श्री. एनः नमस्कार, हे हरिकीर्तन प्रबोधिनीचे ऑफिस आहे ना?

श्री. डीः  हो, आपल्याला प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन हवंय का?

श्री. एनः मी येथे मार्गदर्शन घ्यायला नाही तर मार्गदर्शन करायला आलोय!

श्री. डीः  अरे वा! आम्हाला मार्गदर्शनाची गरजच आहे. बसा ना! आणि आपलं म्हणणं आरामात सांगा.

श्री. एनः अहो, ही हरिकीर्तन प्रबोधिनी चालवून तुम्ही समाजाला कोणत्या काळात घेऊन चालला आहात? अहो, जरा वर्तमानकाळात या. आजची परिस्थिती पाहा. सध्याच्या काय समस्या आहेत त्या जरा जाणून घ्या. या समस्यांवर काही उपाय सांगण्याऐवजी आणि मार्गदर्शन करण्याऐवजी तुम्ही हा काय कीर्तनाचा खेळ मांडलाय!

श्री. डीः  कीर्तनाचा खेळ? बरं, काय समस्या आहेत आजच्या काळातील? काही सांगाल का?

श्री. एनः मला अशीच अपेक्षा होती. अहो, समाजात अन्याय-अत्याचार-भ्रष्टाचार माजला आहे, देशात घोटाळे आणि बलात्कार होतायंत, कोवळी मुले आणि तरुण-तरुणी आत्महत्या करीत आहेत. याची काही कल्पना आहे का तुम्हाला?

श्री. डीः  या तक्रारी तर सर्वच जण करीत आहेत. पण हे चित्र मी पालटेन, हे चित्र पालटण्याची माझ्यात शक्ती आहे, असे कोणी म्हणत नाही. माझ्यासाठी दुसरा कोणी तरी पुढे येऊन हे चित्र बदलेल अशी वेडी आशा बाळगून सगळे नुसती तक्रार करीत आहेत...

श्री. एनः म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? हे चित्र बदलण्याची ताकद काय तुमच्या हरिकीर्तन प्रबोधिनीत आहे? अहो, यासाठी सर्व समाजाचे प्रबोधन करावे लागेल, समाज जागवावा लागेल. तुमच्या कीर्तन प्रशिक्षणातून हे घडणार आहे का? अहो, भ्रष्टाचाराच्या कीडीने सर्व समाज पोखरून टाकलाय, सर्व समाजच बिघडून गेला आहे. तुम्ही कुणाकुणाला सुधारणार?

श्री. डीः  एखादं मोठं यंत्र बिघडतं म्हणजे त्याचा एखादा किंवा जास्त भाग नादुरुस्त होतात... समजलं का? समाज हा माणसांनी मिळून बनलेला आहे. मनुष्य हा समाजाचा भाग आहे आणि तो बिघडला आहे... त्याला घडवायचं आहे. यासाठी आम्ही कीर्तनाचा मार्ग निवडला आहे.

श्री. एनः अहो, कीर्तन म्हणजे परमार्थ... अध्यात्म! देव-देव करून का आजच्या या समस्या सुटणार आहेत? हे सर्व वय झाल्यावर म्हातारपणी करायचं असतं.. आमच्यापुढे जगायला संपूर्ण जीवन पडलं आहे... त्याचं काय? ते कसं जगायचं ते सांगा!

श्री. डीः  अहो, भारतीयांचे अध्यात्मशास्त्र म्हणजे जीवन जगण्याची कला आहे हेच फारसे कुणी जाणत नाहीत. त्यामुळे अध्यात्म हा आयुष्याच्या अखेरचा विषय म्हणून सर्वांनी राखून ठेवला आहे. मला सांग, जीवनाचीच अखेर झाल्यावर जीवन जगण्याची कला शिकून काय करायचं? ही कला तर जीवनाच्या सुरुवातीला शिकायला हवी. तरच जीवन जगताना आपल्याला या कलेची मदत आणि मार्गदर्शन मिळेल आणि आपण सर्व अधिक चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगू शकू. यासाठी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, नोकरीपेशातील गृहस्थ-गृहिणी, ज्येष्ठ आणि प्रौढ या सर्वांनी ही कला शिकून घ्यायला हवी.



श्री. एनः मला सांगा, तुम्ही जीवन जगण्याची कला शिकविता की कीर्तन शिकविता?

श्री. डीः  अहो, ही जीवन जगण्याची कला शिकण्याचे आणि शिकविण्याचे माध्यम आहे कीर्तन! कीर्तन हीच सर्व कलांची जननी आहे. जरा, जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची यादी सांग बरं मला!

श्री. एनः जीवनात यशस्वी होण्यासाठी अनेक गुण अंगात असायला हवेत. जसे, कान्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास, पॉझिटिव्ह ऍटिटयूड म्हणजे सकारात्मक विचार, कान्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता, विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती, शार्प मेमरी म्हणजे स्मरणशक्ती, मॅनर्स म्हणजे शिष्टाचार, कल्चर म्हणजे सुसंस्कृतपणा, मोटिव्हेशन म्हणजे प्रेरणा, लीडरशिप स्कील म्हणजे नेतृत्वगुण, कम्युनिकेशन म्हणजे संभाषणकला, पब्लिक स्पीकिंग म्हणजे सभाधीटपणा आणि या जोडीला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे मानसिक ताणतणावांचं नियोजन, कान्फ्लिक्ट मॅनेजमेंट म्हणजे मानवी भावभावनांच्या संघर्षाचं नियोजन,टाइम मॅनेजमेंट म्हणजे वेळेच व्यवस्थापन असे अनेक गुण लागतात. यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकास साधण्याची गरज असते. समजलं का?

श्री. डीः  अहो, भारतीयांचा धर्मग्रंथ असलेल्या श्रीमद् भगवद्गीतेत व्यक्तिमत्त्वविकासाच्याच सर्व सूचना म्हणजे तुमच्या भाषेत टिप्स दिल्या आहेत. पण हा ग्रंथ वाचून म्हणजे नुसते पठण करून आपले जीवन यशस्वी, सुखी, समृध्द आणि समाधानी होणार नाही तर त्यासाठी या गोष्टी आचरणात आणण्याची खरी गरज आहे. त्याऐवजी हे ग्रंथ पठण करून बासनात बांधून ठेवणे म्हणजे नवीकोरी कार दारात पार्क करून विनाकारण पायपीट करत हिंडणे होय. अशा माणसाला लोक मूर्खच समजतील. पण अध्यात्म जाणून न घेता त्यावर टीका करणारा माणूस आधुनिक विचारसरणीचा, पुरोगामी आणि विचारवंत मानला जातो, हेच आपल्या समाजाचे दुर्भाग्य आहे. हे ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी साडेसातशे वर्षांपूर्वी साध्यासोप्या मराठीत आणले होते, पण आपण त्याच्याकडे पाठ फिरविली आणि परकीयांच्या गुलामीत अडकलो. बऱ्याच काळाने गुलामीतून मुक्त झालो, पण इंग्रजी शिक्षणपध्दतीला भुलून आपली मानसिक गुलामी सुरूच आहे. आपल्या अध्यात्मशास्त्राकडे असेच दुर्लक्ष करीत राहिलो तर आतापेक्षाही अधिक वेगाने आपण अधोगतीकडे जाऊ हे निश्चित! तेव्हा निवड आपल्याच हाती आहे, प्रगती का अधोगती? हा प्रगतीचा मार्ग हरिकीर्तन प्रबोधिनीने खुला केलेला आहे. या दरवाजातून आत येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे. तेव्हा तातडीने प्रवेश करा, मागाहून पश्चात्ताप नको.

श्री. एनः हे सगळं तुम्ही खरं सांगताय ना?

श्री. डीः  हो, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर या संकेतस्थळावरील संजीवन योग हे व्याख्यान ऐका. ते ऐकून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. ते आपण विनामूल्य ऐकू शकता!

श्री. एनः ते मी ऐकणारच, परंतु कीर्तन करण्यासाठी परमार्थाचं सखोल ज्ञान आणि दीर्घ अनुभव आवश्यक असतो ना! मग केवळ एका वर्षातच कीर्तनकार कसे होता येईल?

श्री. डीः तुमची शंका बरोबर आहे. पण एक जुनी म्हण आहे - जात्यावर बसलं की ओवी सुचते आणि पाण्यात पडल्यावर पोहायला येते. तुम्ही कीर्तन करायला सुरुवात केल्यावाचून कीर्तन करणं शिकू शकणार नाही. कीर्तनकार होण्यासाठी जे किमान गुण आणि पात्रता आवश्यक असते त्याचे शिक्षण आम्ही पहिल्या वर्षात आपल्याला देणार आहोत. आपल्याकडून योग्य अभ्यास आणि सराव करून घेणार आहोत. त्याच्या बळावर आपण कीर्तन करायला उभे राहू शकता. नंतर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर आपल्या ज्ञानात भर पडेल आणि अनुभवातही वाढ होईलच! आणि एक चांगले कीर्तनकार म्हणून आपण नाव कमवालं असा आम्हाला विश्वास वाटतो.

श्री. एनः कीर्तनासारखी विद्या गुरुसमोर बसून शिकावी लागते, मग इंटरनेटवरून आपण ते कशा प्रकारे शिकवणार आहात?

श्री. डीः हे पाहा, सध्याचा काळ बराच धावपळीचा झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना इच्छा असूनही कीर्तनकला शिकणे शक्य होत नाही. कारण कीर्तन संस्थाच्या ठराविक वेळेत वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेणे त्यांना शक्य नाही. अशा लोकांना त्यांच्या सोईने कोणत्याही वेळी आमच्या संकेतस्थळाला भेट देऊन कीर्तनकलेचा अभ्यास करता येईल व ही कला शिकून घेता येईल, हाच या अभ्यासक्रमाचा हेतू आहे. तुमची शंका रास्त आहे. पण कोणतीही विद्या शिकण्यासाठी दोन भागांकडे लक्ष दयावे. थिअरी आणि प्रॅक्टिकल. थिअरी म्हणजे एखाद्या कलेची अथवा शास्त्राची तात्त्वि बाजू. यात सैध्दान्तिक माहिती येते. प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारातील अनुभव. एखाद्या विषयाची तात्त्वि माहिती वाचन आणि चर्चेतून होऊ शकते. पण कीर्तन करण्यासाठी आवश्यक असलेली नेमकी माहिती घेतल्याशिवाय आणि कीर्तनविषयक आवश्यक गोष्टींचा उहापोह झाल्याशिवाय कीर्तन करता येणार नाही. ही सर्व माहिती आम्ही उपलब्ध करून देतो. विद्यार्थ्यांनी त्या माहितीचा नीट अभ्यास करावा. आपल्याला कीर्तने यू टयूबवर पाहता येतात. प्रत्यक्षही पाहायला मिळतात. 'तैसे कर्माचे डोळे ज्ञान। ते शुध्द होआवें॥' अशा रितीने त्यांना मार्गदर्शन मिळाल्यावर त्यांना कीर्तन करावयास शिकणे अवघड जाणार नाही. हरिकीर्तन प्रबोधिनीचे व्हिडियोजही यूटयूबवर पाहायला मिळतात.

 आपल्या संगणकासमोर बसून आमच्या संकेतस्थळावरून कीर्तन शिकताना आपल्याला अगदी गुरुकडून विद्या ग्रहण करीत आहोत असाच अनुभव येईल. आम्ही यासाठी आठ टप्प्यांचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. पहिल्या टप्प्यात आपल्याला नारदीय कीर्तनाची परंपरा आणि ते कसे सादर करतात याची आपल्याला माहिती देण्यात येईल, दुसरा टप्पा - कीर्तनाचा पूर्वरंग म्हणजे काय व तो कसा तयार करतात असे सांगून आपल्याला त्याचा एक नमुना देण्यात येईल, तिसरा टप्पा - कीर्तनाचा उत्तररंग म्हणजे आख्यान म्हणजे काय व ते कसे तयार करतात हे सांगून त्याचा एक नमुना देण्यात येईल. चौथ्या टप्प्यात भाषणकला आणि नाटय अभिनयकला शिकविण्यात येईल. पाचव्या टप्प्यात संगीतकलेची माहिती देण्यात येईल. सहाव्या टप्प्यात हार्मोनियम वादनाचे मार्गदर्शन, स्वर व अलंकारांचा परिचय करून देण्यात येईल. सातव्या टप्प्यात गायनकला म्हणजे वेगवेगळया रागांचा परिचय करून देण्यात येईल. आठव्या टप्प्यात ताल परिचय, तबलावादनाची प्राथमिक माहिती व झांजेचे वादन शिकविण्यात येईल. या आठ टप्प्यात अनेक पूरक विषयांचा अभ्यास करून घेतला जाईल. त्यासाठी आपण सर्व अभ्यासक्रम तपशीलात पाहून घ्यावा. सर्व विषयांच्या पीडीएफ फाईल्स आणि ऑडियो-व्हिडियो फाईल्स या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. त्या आपण डाऊनलोड करू शकता. तसेच पूरक वाचनासाठी उत्तम संदर्भग्रंथ आणि पुस्तकांची सूची देण्यात आलेली आहे. तसेच गायन व वादन संदर्भात इंटरनेटवरील वेबसाईटस् व यू टयूबच्या अनेक लिंक्स दिलेल्या आहेत. त्याचाही आपण लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर पाठांतरासाठी श्लोक, आर्या, साकी, दिंडी, अभंग, पदे इत्यादी साहित्यप्रकारही दिलेले आहे.

श्री. एनः कीर्तन तर मराठीतूनच करतात. मग हिंदी व इंग्रजी माध्यमाची गरज काय?

श्री. डीः कीर्तन हा कलाप्रकार महाराष्ट्रातील मंडळींचा असल्यामुळे त्याचे माध्यम मराठी ठेवणे हे उचित आहे. पण जागतिकीकरणाचे वारे वाहत असताना व संपूर्ण जग हे एका खेडयात रूपांतरित होत असताना, या मराठी कलाप्रकाराने भारतव्यापीसुध्दा होऊ नये. हे उचित वाटले नाही. आज मराठी मंडळी भारताच्या विविध भागांत जाऊन स्थायिक झाली आहेत व तेथे आपली मराठमोळी संस्कृती आणि परंपरा जपू पाहत आहेत. कीर्तनकला शिकविणाऱ्या संस्था अगदी मोजक्या असल्यामुळे आपले राहते गाव सोडून तेथे शिकायला जाणे या मंडळींना शक्य नाही. मराठी भाषा ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. उत्तर भारतात कीर्तनाचा प्रसार करायचा असेल तर हिंदीची मदत घेणे आवश्यक आहे. यामुळे हिंदी माध्यमाचाही समावेश झाला. दक्षिण भारतीय मंडळींना हिंदीपेक्षा इंग्रजी भाषा समजायला सोपी वाटते त्यामुळे मग इंग्रजी माध्यमाचाही समावेश करण्यात आला. सरतेशेवटी इंग्रजी माध्यम आपण स्वीकारले आहेच तर मग कीर्तनकलेने विश्वव्यापी रूप का धारण करू नये. या हेतूने भारताबाहेरच्या मंडळींसाठीही इंग्रजी भाषेत विशेष अभ्यासक्रमही समाविष्ट करण्यात आला.

श्री. एनः परीक्षाविधी कसा असेल?

श्री. डीः  एकूण तीन परीक्षा घेण्यात येतील.

1. लेखी परीक्षा - कीर्तनकाराला जी किमान माहिती असायला हवी, यावर आधारित प्रश्नावलीची उत्तरे पोस्टा द्वारे अथवा इ-मेलने पाठवावी लागतील. आपली उत्तरपत्रिका तपासून गुण देण्यात येतील.

2. कीर्तनलेखन परीक्षा - आपल्या कीर्तनातील पूर्वरंग व आख्यान कसे तयार करावे याचे मार्गदर्शन अभ्यासक्रमात केले जाईल. या मार्गदर्शनाच्या आधारे कीर्तन लिहून पाठवावे लागेल. ते तपासून गुण देण्यात येतील.

3. प्रात्यक्षिक परीक्षा - विद्यार्थीत्याला सांगितलेल्या परीक्षाकेंद्रावर जाऊन कीर्तन सादरीकरणाची परीक्षा देऊ शकतो. अथवा आपल्या कीर्तनाची दृकश्राव्य सीडी तयार करून पाठविली तरी चालेल. ती सीडी अथवा आपले प्रत्यक्ष सादरीकरण पाहून गुण दिले जातील.

श्री. एनः प्रमाणपत्र व गुणपत्रिका मिळेल का?

श्री. डीः  तिन्ही परीक्षातील गुणांची बेरीज करून विद्यार्थ्याला उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण घोषित करण्यात येईल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच कीर्तन सादरीकरणाची संधी देण्यात येईल. संस्थेच्या कीर्तनकार सूचीत नोंदणी केल्यास विविध ठिकाणी कीर्तन करण्याची संधी मिळू शकेल.
श्री. एनः अभ्यासक्रमाला प्रवेश कसा घ्यावा?

श्री. डीः  शिक्षण शुल्क एनइएफटी द्वारा ऑनलाईन ट्रान्सफरने भरून अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज डाऊनलोड करून घ्यावा व सोबत भरून पाठवावा. हा अर्ज ऑनलाईनही भरता येतो. आपला अर्ज आणि शुल्क मिळाल्यावर आपणास लॉगइन करण्यासाठी पासवर्ड देण्यात येईल. तो वापरून आपल्याला सर्व अभ्यासक्रमाचा घरबसल्या लाभ घेता येईल.

Saturday, 12 March 2016

गिरिजा-नाथाचा 'गृहयोग'
ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)


'ज्ञानदेवे रचिला पाया...तुका झालासे कळस' असे वारकरी संप्रदायाबद्दल म्हटले जाते. या संप्रदायात यांच्याच तोडीचे योगदान आहे श्री संत एकनाथ महाराज यांचे. यामुळे वरील अभंगातच 'जनार्दन एकनाथ। खांब दिला भागवत।' असा उल्लेख केला आहे.  एकनाथ महाराजांचे चरित्र पाहिल्यास आपल्याला यांच्यात ज्ञानदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांचा जणू समन्वयच झाल्याचे दिसते. ज्ञानदेव महाराज हे ब्रह्मचर्य आश्रमातच राहिले आणि तुकाराम महाराज हे गृहस्थाश्रम अंगीकारूनही शेवटी वैराग्यमूर्तीच राहिले. मात्र संत एकनाथ महाराजांचा गृहस्थाश्रम खरोखरच थोर म्हणावा लागतो, आदर्श म्हणावा लागतो. गुरुंच्या आज्ञेवरून गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यावर अगदी आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी या आश्रमाचा त्याग न करता गृहस्थाश्रम कसा धन्य करता येतो व प्रपंचातच राहून परमार्थ कसा साधता येतो याचा उत्तम वस्तुपाठ घालून दिला. नाथांचा गृहस्थाश्रम खरोखरच हेवा वाटावा असा आहे.
गृहस्थाश्रमाबाबत संत एकनाथ आपल्या भागवतात सतराव्या अध्यायात म्हणतात -
मजमाजीं रंगली चित्तवृत्ती। यालागी विसरला गृहासक्ती।
त्यासी गृहाश्रमीं माझी प्राप्ती। सुखसंपत्ती निजबोधु॥431
जरी जाहली स्त्रीपुत्रगृहस्थिती। परी न धरावी त्यांची आसक्ती।
सावध राखावी चित्तवृत्ती। परमात्मयुक्तिसाधने॥493
नाथांच्या धर्मपत्नीचे नाव होते गिरिजाबाई. नाथांचे गुरू जनार्दनस्वामी यांनीच नाथांना विवाह करून गृहस्थाश्रम चालविण्याची आज्ञा केली होती. त्यांनी सांगितले होते, 'गृहस्थाश्रम सर्व आश्रमात उत्तम आहे. सर्वांभूती भगवद्भाव ठेवून स्वधर्म आणि भूतदया यांचा परिपोष करावा म्हणजे झाले.'
एकनाथ आणि गिरिजाबाई म्हणजे विवेक आणि शांती यांचेच ऐक्य होय, असे या गृहस्थाश्रमाबाबत सांगावे लागते. बऱ्याच संतांचा गृहस्थाश्रमाचा त्याग करण्याकडेच कल असतो. यामुळे सामान्यजनांच्या मनातही परमार्थ साधनेसाठी तसेच केले पाहिजे, असा समज निर्माण होतो. तो कितपत बरोबर आहे वा गैर आहे, याची चर्चा फारशी उपयुक्त ठरणारी नाही. पण नाथांच्या गृहस्थाश्रमाच्या रूपाने आपण परमार्थ साधनेचा मुद्दा स्पष्ट करू शकतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतांचे भौतिक गोष्टींकडे, ऐहिक गोष्टींकडे, प्रपंचाकडे व संसाराकडे दुर्लक्ष झालेले आहे, अशी सतत हाकाटी बुध्दिमान माणसे करीत असतात. यांच्यात सुशिक्षित व्यक्तींचा आणि विचारवंतांचाही भरणा असतो. त्यामुळे नाथांचा गृहस्थाश्रम आणि सध्याच्या काळातील सामान्य जनांचा गृहस्थाश्रम यांची तुलना होऊ शकत आहे, असेही म्हणता येते. त्या काळातील आव्हाने आणि वर्तमानकाळातील आव्हाने वेगळी असल्यामुळे येथे नाथांच्या गृहस्थाश्रमाचे गोडवे गाऊन भागणार नाही, असेही त्यांना वाटू शकते.
आज नवराबायको हे दोघेही काम करणारे आणि कमवते असतात. बाहेरच्या जगात वावरताना बरीचशी समान आव्हाने त्यांच्यासमोर असतात. किंबहुना आपल्यासमोरची आव्हाने ही अधिक गडद आहेत असा दावा दोन्ही पक्ष करू शकतो. त्यामुळे गिरिजाबाईंनी जसा नाथांचा संसार सांभाळला त्या पध्दतीची अपेक्षा नव्या जमान्यातील महिलांकडून करणे योग्य होणार नाही, असेही वाटण्याचा संभव आहे.
शेवटी सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतांच्या चरित्राबाबत ऐतिहासिक साधनांतून फारशी माहिती मिळत नाही. संतकवींनी ग्रंथादिकांत जी चरित्रे वर्णिली आहेत त्यातूनच ही माहिती घ्यावी लागते. मात्र या चरित्रांचा उद्देश संतांचे अलौकिकत्व आणि चमत्कार व भक्तीसामर्थ्य लोकांच्या मनावर ठसविणे हाच असल्यामुळे आपल्या चरित्रात्मक अपेक्षा फारशा पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्यामुळे नाथांच्या चरित्रकथांमधूनच आपल्याला गिरिजाबाईंसोबतच्या त्यांच्या गृहस्थाश्रमाचे मर्म उलगडावे लागणार आहे. या लेखाची ही मर्यादा आहे.
संसार म्हटला की काही कामांची विभागणी आलीच. आजही अमुक कामे पुरुषांची व अमुक कामे बायकांची असा समज मोठया प्रमाणात समाजात आढळतो. ही कार्यविभागणी चूक वा बरोबर हे ठरविता येणार नाही. मात्र गिरिजाबाई महिलांची समजली जाणारी कामे नाथांचा संसार चालविताना करीत होत्या हे मात्र खरे! मात्र बऱ्याचदा गृहकृत्यांवरून आताच्या छोटया नवराबायको आणि अपत्य अशा कुटुंबात वादविवाद नसतात, हे मात्र खरे म्हणता येणार नाही. हे वादविवाद विकोपाला जाऊन संसार तुटण्यापर्यंत मजल जाताना आपण पाहतो. त्यामुळे नाथांच्या गृहस्थाश्रमाचे मूल्यमापन करताना आपण त्या काळातील आव्हाने पाहून व त्या काळातील  साधारण लोकमानसिकता पाहून त्या प्रसंगात नाथ व गिरिजाबाईंनी एकमेकांना कशी साथ दिली व प्रत्येक प्रसंगातून कसे निभावून नेले याचा आढावा घेतला पाहिजे.
नाथ हे संत होते तसे आजच्या भाषेत समाजसुधारकही होते. गेल्या शतकातील समाजसुधारकांना ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागले त्या प्रसंगांचा सामना नाथांनाही करावा लागला होता. अशा प्रसंगात आपण स्वीकारलेल्या मूल्यांशी तडजोड न करताना, वेळप्रसंगी ती मूल्ये स्थापित करताना नाथांनी जो लढा दिला तो अभूतपूर्व म्हटला पाहिजे. नाथांनी जे काही करून दाखविले तसे कार्य त्यांच्या अगोदरच्या काळात घडलेले फारसे आढळत नाही. नाथ हे तथाकथित उच्च वर्णातील असल्यामुळे त्यांच्या समाजसुधारणेच्या कार्याला अंगभूत मर्यादा होत्या. मात्र येथे असे नमूद करायला हवे की, प्रसंगी या मर्यादा ठोकरून लावूनही नाथ हे खरे मर्यादापुरुषोत्तम ठरले आहेत आणि यातच त्यांच्या कार्याची यशस्वीता आहे.
अशा समाजसुधारक पुरुषाला खरे म्हणजे कोणत्याही बाह्य शत्रूशी लढा द्यावा लागत नाही. त्याचा खरा लढा हा स्वकियांशी आणि आप्त जनांशीच असतो. तसा लढा नाथांनी दिला आहे. हा लढा सर्वांत कठीण असतो. कारण या आंतरिक मानसिक पातळीवर जेव्हा उतरतो तेव्हा लढा देणाऱ्याला मोठया प्रमाणात मनस्ताप भोगावा लागतो. अशा प्रसंगात त्याचे मनोधैर्य कायम राहावे म्हणून सहधर्मचारिणीची खंबीर साथ आवश्यक असते. ही साथ हिमालयाच्या सावलीप्रमाणे असते. येथे उल्लेख करायला हवा की, गिरिजाबाईंनी आपल्या पतीला त्याच्या 'वेडया' कार्यात सतत साथ दिली. त्याची कोणत्याही प्रकारे संभावना केली नाही. यांची तुलनाच करायची झाली तर महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या जोडप्याशीच करायला हवी. ही तुलनाही याचसाठी की हे जोडपे अलीकडच्या काळातील असल्यामुळे व त्यांच्या जीवनचरित्राशी आपण थोडयाफार प्रमाणात परिचित असल्याने गिरिजाबाई व नाथ यांच्या आयुष्यात डोकावण्यासाठी थोडाफार झरोका यांच्याच चरित्रातून आपल्याला लाभू शकतो. ही प्रस्तावना पुरेशी असून आता आपण या जोडप्याच्या चरित्राकडे वळूया.
नाथांच्या घरी सदावर्त अर्थात अन्नछत्र होते आणि सर्वांना अन्नदान केले जात असे. रात्री नाथांच्या घरातील टाळमृदंगांचा ध्वनी ऐकून सारे गाव कीर्तनाला गोळा होत असे. येथे तथाकथित अस्पृश्य समाजाला देखील मनाई नव्हती. 'सकळांसी येथे आहे अधिकार' ही उक्ती नाथांनी सार्थ करून दाखविली होती. नाथांचा एक नातेवाईक उध्दव हा नाथांच्या गृहप्रपंचाची व्यवस्था सांभाळत असे. नाथांना त्याकडे फारसे लक्ष द्यावे लागत नसे. त्यांच्या हातून जी विपुल साहित्यरचना व ग्रंथरचना घडून आली, याचे रहस्य अगदी असे उघड आहे. नाथांचे महत्त्व जाणून हा उध्दव नाथांच्या शिष्याच्या रूपाने त्यांच्या सेवेत दंग झाला होता.
नाथांचे लग्न झाले तेव्हा त्यांच्या पत्नीचे वय फारसे नव्हते, पण तरीही तिने घरप्रपंच सांभाळला होता. गृहस्थाश्रमाविषयी नाथांचीच उक्ती अशी आहे, 'प्रीति व्हावया पतिमानसी। कुळवधू मानी सासुसासऱ्यांशी॥' गिरिजाबाई आपल्या (आजे)सासुसासऱ्यांचा मान अगदी आपल्या आईवडिलांप्रमाणे ठेवत असे. यामुळे नाथांची विशेष प्रीती त्यांना लाभली होती. तसे पाहता, लग्नानंतर काही वर्षांनी नाथांची आजी वारली व पाठोपाठ काही दिवसांनी आजोबाही निवर्तले. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रपंचाचा भार गिरिजाबाईंवर पडला.
आपल्या पतीची महत्ता गिरिजाबाई जाणून असे. असा पती आपल्याला लाभल्याबद्दल त्यांना धन्यताच वाटत असे. पण विशेष गोष्ट म्हणजे 'दोन देहांत एकच आत्मा' नांदत असल्याप्रमाणे या दोघांची अवस्था होती. परोपकार करण्यात व आबालवृध्दांशी समप्रेमाने वागण्यात गिरिजाबाई नाथांहून कांकणभरही कमी नव्हत्या. एकाला झाकावे आणि दुसऱ्याला समोर करावे ही उक्ती त्यांच्याबाबती सार्थ ठरावी. नाथांप्रमाणे गिरिजाबाई या दीन-अनाथांच्या माऊली होत्या. दारात आलेला अतिथी विन्मुख जाणार नाही अशी नाथांची इच्छा होती आणि तीच गृहिणीच्या रूपाने प्रत्यक्ष त्यांच्या घरात नांदत होती, हेच खरे! रात्री-अपरात्री कोणी भुकेला आला तर तेव्हाही चूल पेटवून त्याला जेऊ घालण्यात या माऊलीने कधी कंटाळा केला नाही. आपला संसार सांभाळून गिरिजाबाईसुध्दा नाथांप्रमाणेच हरिचिंतनात सर्वकाळ निमग्न असत. नाथांचा प्रपंच आणि परमार्थ एकरूप होण्यास गिरिजाबाई यांचे मोठेच साह्य झालेले आहे. कधी तर असे वाटते की नाथांनी गृहस्थाश्रमाचे जे आपल्या साहित्यात आदर्श म्हणून चित्रण केले आहे ते त्यांच्या प्रापंचिक वास्तवावरच आधारित असावे. 
त्यांनीच एकनाथी भागवतात असे म्हटले आहे
'स्त्रीपुरुषांची चित्तवृत्ति। अनुकूल वर्ते धर्मप्रवृत्तीं। 
तरीच परलोक साधिती। इतरां प्राप्ति ते नाही॥' (अध्याय 7-612)
पती आणि पत्नी या दोघांच्याही चित्तवृत्ति धर्मानुकूल असतील तरच प्रपंचात परमार्थ साधतो, ही नाथांची उक्ती पूर्णतः स्वानुभवाचीच होती. प्रपंचाचा अंतरंग गिरिजाबाई यांनी व बहिरंग उध्दवाने सांभाळल्यामुळे नाथांचा गृहस्थाश्रम हा खऱ्या अर्थाने सफल ठरला.
गृहिणीचे चित्त किती उदार आणि विशाल असावे असे सांगताना नाथ म्हणतात - 
'अतिथि आणि पतिपुत्रासी। भोजनी समता नित्य जिसी। 
धनलोभ नाही मानसी। परमार्थी तिसी अधिकारू॥' (नाथभागवत, अ. 29-584.)
नाथांचा संसार सुखाचा होण्यास गिरिजाबाईंचे अनेक सद् गुण कारणीभूत ठरले आहेत. पतीपत्नी इतक्या एकचित्ताने वागल्याचा दाखला अपवादानेच दिसेल. काही संतांनी तर संसार केलाच नाही. काहींनी विवाह करून प्रपंच चालवित परमार्थ केलाही पण त्यात ते फार सफल झाले असे दाखले आढळणार नाहीत. नाथांचा प्रपंच खरोखरच सर्वोत्कृष्ट म्हणायला हवा. भगवंताचे भजन आणि अन्नदान यामुळे नाथांच्या वाडयाला मंदिराची शोभा येत असे. या मंदिरात एक आदर्श जोडपे जणू लक्ष्मीनारायणाच्या रूपाने वावरत आहेत असेच भाविकांना वाटत होते.  लोकमान्य पुरुषरत्नांत अग्रेसर असा नाथांसारखा पुरुष आणि सत्क्रियेची साक्षात मूर्ती म्हणजे गिरिजाबाई यांच्यासारखी स्त्री अशा तुल्यगुण वधुवरांना एकत्र आणल्यामुळे ब्रह्मदेवसुध्दा कधीकाळी मिळणाऱ्या धन्यवादास पात्र झाला असावा. कलियुगात नाथांसारखा प्रपंच नाथांचाच झाला, अशी भावना संतसाहित्याचे अभ्यासक ल. रा. पांगारकर यांच्यासारख्यांनी व्यक्त केली आहे.
सर्व दानांत श्रेष्ठ अन्नदान होय. नाथांनी ते व्रत जन्मभर चालविले. तसेच त्यांच्याकडे ज्ञानदानाचे सत्रही होते. नाथांच्या पुराणकीर्तनाचा जो परिणाम लोकांवर व्हावयाचा तो झालाच, पण त्याहून उत्तम परिणाम त्यांच्या सदाचाराचा झाला. शेकडो व्याख्यानांनी व भाषणांनी होत नाही एवढे कार्य सत्पुरुषाच्या आचरणाच्या माध्यमातून घडून येते. मोठमोठया गोष्टी सांगून त्याचा परिणाम लोकांच्या मनावर अजिबात होत नाही. पण बोले तैसा चाले असे उदाहरण पाहायला मिळाले की त्याचे लोक आपोआप अनुकरण करण्याचा प्रयास करतात. संत एकनाथ म्हणजे क्षमा, शांती, भूतदया, निरहंकार, निःसंगता, हरिभक्ती, परोपकार व इंद्रियदमन या दैवी संपदेचे साक्षात पुतळे होते. ते क्रियावान पंडित होते. नाथांनी साहित्यरचना केली व मोठमोठे ग्रंथ लिहिले म्हणून समाजावर त्यांची छाप बसली या पेक्षा त्यांच्या सदाचरणाने ती हजारोपटीने समाजमानसावर प्रतिबिंबित झाली हीच गोष्ट खरी म्हणायला हवी. 
जेव्हा नाथांच्या सदाचरणामुळे समाज प्रभावित होऊन कर्मकांडांपेक्षा सदाचरणाला महत्त्व देऊन नाथांचे अनुकरण करू लागला तेव्हा निस्तेज झालेले पैठणचे वैदिक, पंडित, भिक्षुक अशी मंडळी नाथांचा द्वेष करू लागली. ते द्वेषाने इतके आंधळे झाले की नाथांची निंदा करू लागली व पुढे त्यांचा छळ करण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. नाथ देववाणीचा उपमर्द करून प्राकृत ग्रंथ लिहितात, सकाम व्रताचरणांचा उपहास करून भक्तिमार्गाचे स्तोम माजवितात, हीन वर्ण व अंत्यजांना जवळ करतात, इत्यादी आक्षेप घेतले जाऊ लागले. खरे तर नाथांना दंभधर्म नको होता, पण ज्यांनी दांभिकता माजविली होती असेच लोक नाथांच्या विरोधात गेले. नाथ निर्भयपणे दंभ व दांभिक यांच्यावर प्रहार करीत होते. नाथांचे 'बाह्य वेषधाऱ्यास उपदेशपर अभंग' पाहिल्यावर त्यांनी दंभस्फोट करण्याचे काम किती चोखपण केले हे दिसून येते. त्यांचे हे क्रांतिकार्यच होते. हा काळ त्यांच्या आयुष्यातील अग्निपरीक्षेचा काळ होता. दुराचारी, ढोंगी, लुच्चे व नास्तिक असे केवळ ब्राह्मण आहेत म्हणून नाथ त्यांचा कैवार घेत नव्हते. उलट ते नास्तिक व दुराचारी ब्राह्मणापेक्षा हरिभक्त महाराला अनंत पटीने श्रेष्ठ मानत होते व तसे वागवितही होते. मनुष्याचा स्वभावच आत्मस्तुतिप्रिय आहे, त्याला निंदेचे वावडे असते. दुसऱ्याची निंदा स्वतः करायची नाही, पण दुसऱ्याने केलेली निंदा मोठया मनाने सोसायचे मेरूप्रमाणे धैर्य ज्यांच्या अंगी असते तेच पुरुष थोर कार्य करू शकतात आणि थोर ठरतात. नाथांच्या मागे निंदकछलकांचा ससेमिरा अगदी जन्मभर लागला होता. गृहस्थाश्रमाचा स्वीकार केल्यापासून गोदातीरी देह ठेवीपर्यंत त्यांची निंदकांनी पाठ पुरविली होती. पण नाथांनी समदृष्टीने निंदकांनाही गुरूच मानले. नाथांच्या साधुत्वाच्या व चमत्काराच्या जितक्या गोष्टी महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत, तितक्या बहुधा कुणाबाबत अपवादानेच आढळतील. नाथांना गृहस्थाश्रमात वागताना अनेक प्रकारच्या प्रसंगांचा सामना करावा लागला. अशा प्रसंगी ते धैर्याने व शांतपणाने वागले. असे धैर्य व शांती सामान्यतः  कोणाच्याही आचरणात दिसत नाही. अशा सर्व प्रसंगांत त्यांना आपल्या गृहस्वामिनीची पुरेपूर साथ लाभली. एक अत्यंत मासलेवाईक प्रसंग येथे नमूद करायला हवा.
एक परगावाचा ब्राह्मण आपल्या मुलाच्या मुंजीसाठी शेदोनशे रूपयांच्या आशेने पैठणमध्ये आला असताना तेथील कुटाळकंपूने त्याला सांगितले, ''येथील एकनाथ महाराजांना राग येत नाही असे म्हणतात, पण त्यांना राग आणून दाखविलास तर तुला दोनशे रूपयांचे बक्षीस देऊ.'' हा ब्राह्मण थेट नाथांच्या वाडयात शिरला. त्यावेळी नाथ देवपूजा करीत होते. तो तसाच नाथांच्या मांडीवर जाऊन बसला. त्याचे विचित्र वागणे पाहून नाथ हसतमुखाने म्हणाले, ''मला भेटायला अनेक जण येतात. पण आपले प्रेम विलक्षणच आहे.'' आपल्या प्रयत्नाला अपयश आले तरी ब्राह्मणाने आशा सोडली नाही. तो नाथांच्या घरात बसून राहिला. दुपारी जेवणाच्या वेळी त्या ब्राह्मणाचे पान नाथांच्या पानाशेजारीच मांडण्यात आले.  जेव्हा गिरिजाबाई पानावर तूप वाढायला आल्या आणि वाकल्या तेव्हा त्या ब्राह्मणाने टुणकन् त्यांच्या पाठीवरच उडी मारली. त्याबरोबर नाथ म्हणाले, ''जरा सांभाळ हो. हे बिचारे पडतील एखादेवेळेस!' गिरिजाबाई म्हणजे नाथांच्या धर्मपत्नीच! त्यासुध्दा हसतमुखाने म्हणाल्या, ''अहो, हरिपंडिताला पाठीवर घेऊन मला काम करायची सवय आहे. मी आपल्या बाळाला मुळीच पाडणार नाही.'' हे बोल ऐकून तो ब्राह्मण अत्यंत ओशाळला व त्याने नाथांच्या पायांवरच डोके ठेवले.
नाथांना या माऊलीने जीवनभर अशीच साथ दिली. वडिलांच्या श्राध्दप्रसंगी, दारावरून जाणाऱ्या महारांचा संवाद ऐकून हे श्राध्दाचे भोजन त्यांना देऊन टाकावे असे नाथांनी गिरिजाबाईंना सांगितले. आपल्या पतीचे म्हणणे अत्यंत उल्हासाने गिरिजाबाईंनी ऐकले व त्या म्हणाल्या, ''आपल्याकडे अन्न पुष्कळ आहे. या अंत्यजांच्या बायकांनाही मुलालेकरांसकट बोलवा म्हणजे येथेच सर्वांना पंगतीत वाढता येईल.'' नाथांना ते आवडले व त्यानुसार अंत्यज वर्गाचीच पहिली पंगत बसली. ते सर्वजण जेवून तृप्त झाले. यानंतर ब्राह्मणांचा गर्वहरण करण्यासाठी थेट पितरांनाच श्राध्दाचे भोजन देण्याचा चमत्कार ग्रंथात आलेला आहे. पण यापेक्षा मोठा चमत्कार म्हणजे जुन्या काळच्या संस्कारात वाढलेल्या गिरिजाबाईंनी आपल्या पतीला जी साथ दिली तो मोठा चमत्कार होय. बऱ्याचदा समाजसुधारकांना घरून अशी साथ मिळत नाही. जे काही करायचे ते घराबाहेर करा, अशी भूमिका घरच्या मंडळींनी घेतल्यामुळे अनेक  सुधारक मंडळींची कुचंबणा झाली याला इतिहास साक्ष आहे. मात्र नाथांच्या क्रांतिकारक विचारांना त्यांच्या घरातूनच पहिली साथ गिरिजाबाईंनी दिली आणि त्यामुळे नाथांना समाजपरिवर्तन करून दाखविता आले व एक आदर्श प्रस्थापित करता आला. संत एकनाथांनी अगदी वेश्येच्या घरी जाऊन तिलाही उपदेश दिला. लोकांनी त्यांच्यावर राळ उडविली असेल ती असो. पण आपल्या पत्नीचा आपल्यावर असलेल्या विश्वासाच्या बळावरच हे साहस नाथांनी दाखविले हे नमूद करायला हवे. अंत्यजाचे मूल वाळवंटातून उचलून थेट त्याच्या घरी पोहोचविणे, घरात चोरी करण्यास शिरलेल्या चोरांनाही पोटभर भोजन घालणे, महारवाडयात जाऊन राण्या महाराचा घरी भोजन करणे असे इतरही प्रसंग सांगता येतील.
नाथ व गिरिजाबाईंना एकूण तीन अपत्ये झाली. प्रथम गोदावरी ही कन्या, त्यानंतर हरिपंडित हा पुत्र व शेवटी गंगा नावाची कन्या.  याच गोदावरीच्या पोटी मुक्तेश्वर नावाचा महाकवि जन्मला. नाथांचा पुत्र हरिपंडित हा सनातनी वृत्तीचा विद्वान होता. नाथांचे वर्तन त्यालाही पसंत न पडल्यामुळे तो काशीला स्थायिक झाला होता. पण नाथांनी मोठया मनाने त्याला परत पैठणला आणले. नंतर त्यालाही आपल्या पित्याचे महत्त्व कळून आले. तो पितृभक्त होताच, पण नंतरच्या काळात त्यानेही वडिलांची आज्ञा हीच शास्त्राज्ञा मानून कार्य केले. आपले वडील हे खरेच महात्मा आहेत असे हरिपंडितालाही कळून चुकले. नाथांनी अतिशय संयमाने हे परिवर्तन हरिपंडितात घडवून आणले व आपला गृहस्थाश्रम धन्यवत व आदर्श करून दाखविला.
नाथांच्या चरित्राचा बोध इतका घेतला पाहिजे की पतीच्या अंगीकृत कार्यात पत्नी जेव्हा समरस होते, ते कार्य हे लोकोत्तर आहे व आपले समजून करणीय आहे असे मानते तसेच त्यानुसार त्याला साथ देते तेव्हा त्या कार्याच्या सफलतेची ती नांदीच असते असे समजावे. नाथांचा गृहस्थाश्रम धन्य होण्यास गिरिजाबाईंची ही वृत्ती मोठया प्रमाणात कारणीभूत झाली, हे वास्तव लक्षात घेणे आवश्यक आहे.