Thursday, 26 May 2016

दृष्टांताची मात 

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वैशिष्टय म्हणजे एखादा तात्त्वि मुद्दा समजावून सांगण्यासाठी ढिगभर सोपे सोपे दृष्टान्त त्यांनी दिले आहे. एवढा दृष्टान्तांचा खजिना ज्ञानेश्वरीत आहे की त्याचा स्वतंत्रपणे अभ्यासच करायला हवा. उदाहरणादाखल बाराव्या अध्यायातील काही दृष्टान्त येथे देत आहोत.

देवभक्त ऐक्य
सूर्यबिंब नाहीसे झाले की सूर्यकिरणेही त्याच्या मागोमाग नाहीशी होतात. अगदी त्याचप्रमाणे माझा भक्त माझ्यात सामावून जातो.

निराकाराची उपासना/निर्गुण भक्ती
पतिशिवाय रोज चितेवर बसून सती जाणे जसे अवघड आहे तसे निराकाराची उपासना करणे महाकठीण आहे.

निराकाराची प्राप्ती
पांगळया माणसाला वाऱ्याबरोबर धावण्याची शर्यत जिंकता येत नाही. त्याचप्रमाणे मी देह आहे ही भावना असलेल्या मनुष्याला निराकार ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही.

देवभक्त नाते
आपण जन्माला घातलेले मूल आईला जितके प्रिय असते तितका मला माझा भक्त प्रिय असतो.

देवभक्त नाते
आईच्या पोटातील गर्भ ज्याप्रमाणे आईचे स्वरूप जाणू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य भगवंताला जाणू शकत नाही.

देवभक्त नाते
राजाच्या राणीला हवी ती वस्तू मागितल्याबरोबर मिळते, त्यासाठी कोणाकडे याचना करावी लागत नाही. माझ्या भक्तांनाही कुणाकडे भीक मागावी लागत नाही.

प्राण व शरीर 
एकदा शरीरातून प्राण बाहेर पडला की सर्व इंद्रियांचा कारभार आपोआप थंडावतो, त्याचप्रमाणे भक्ताने आपले मन ईश्वराला अर्पण केले की त्याचा सर्व अहंकार नाहीसा होतो.

चंद्रबिंब 
पौर्णिमेचे चंद्रबिंब हळूहळू लहान होत शेवटी अमावस्येला पूर्णतः दिसेनासे होते. त्याचप्रमाणे मनुष्याने विषयभोगातून आपले मन हळूहळू काढून घेण्यास सुरुवात केल्यास तो ईश्वराच्या रूपात पूर्णतः लीन होऊन जातो.

अभिमान 
पाटाचे पाणी माळी नेईल तिकडे निमूटपणे जाते, त्याचप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान सोडून आपल्या हातून भगवंत जे काम करून घेणार आहे ते आपण करीत नाही याच भावनेने करावे.

चाले हे शरीर 
रस्ता सरळ आहे की वाकडा आहे याचा विचार रथ करीत नाही. सारथी चालविल तसा तो मुकाट चालत जातो. त्याचप्रमाणे आपल्या देहाचा रथ हा भगवंत चालवित नेत आहे अशी भावना बाळगावी.

कर्म फळ 
आपली कन्या कितीही सुंदर असली तरी पिता तिचा अभिलाष धरत नाही. फळे कितीही मधुर असली तरी झाड त्याचा अभिलाष धरत नाही. पिता कन्यादान करतो तर झाडे पिकलेली फळे खाली लोटून देतात. माणसाने कर्मफळाबाबत तसेच उदास झाले पाहिजे.

जन्म मरण नाही 
वेळूचे झाड एकदा व्याले की पुन्हा वीत नाही. कर्मफळाचा एकदा त्याग केला की मग जन्ममरण पुन्हा नाही.

No comments:

Post a Comment