Friday, 6 January 2017

मूर्ती फोडा, मूर्ती तोडा इतिहासाला ध्वस्त करा!

मूर्ती फोडा, मूर्ती तोडा
इतिहासाला ध्वस्त करा!
- दीपक हनुमंत जेवणे



पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा काही जणांनी उखडून फेकला. गडकरी यांचे अपूर्ण नाटक 'राजसंन्यास' हे त्यासाठी कारणीभूत ठरलेले आहे. कलाकाराला आपल्या प्रतिभेच्या अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि ते तसेच राहिले पाहिजे, याबाबत काही दुमत असण्याची गरज नाही. सुबुध्द रसिक पे्रक्षक हा ललित साहित्यकृती अथवा नाटयकृतीला इतिहास समजण्याची गल्लत करीत नाही; तो केवळ त्या कृतीचा रसास्वाद घेतो. इतिहास आणि ललित साहित्यकृती या दोन गोष्टी भिन्न आहे, हे त्याला पटले असते.
ऐतिहासिक नाटकांवर टीका केली जाते याची पगडी यांना जाणीव असल्यामुळे ते या टीकेचे खरे मूळ शोधण्याचा प्रयास त्यांनी आपल्या परीने केला होता. ऐतिहासिक नाटकांवर टीका करणाऱ्या टीकाकारांची भूमिका इतिहास संशोधकाची नसते हे त्यांनी निखालसपणे दर्शवून दिले होते. मात्र त्यांनी रसिक आणि समाजनिरीक्षक अशी दोन प्रकारची भूमिका सांगितली होती. पगडी हे नाटकांच्या सेन्सार बोर्डाचेही अध्यक्ष होते, हे लक्षात घ्यावे. पण आता या टीकाकांरात आणखी भर पडली आले ती केवळ पुतळेच नव्हे तर इतिहासाची मोडतोड करण्यात धन्यता मांडणाऱ्या स्वयंघोषित इतिहासकारांची! आपण जो इतिहास सांगतो तोच खरा असून तो समाजावर थोपण्याचा प्रयास या विघ्नसंतोषी मंडळींनी चालविला आहे.
थोर इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी या नाटकाबाबत काय म्हणतात - 'या स्वातंत्र्यामुळेच भाऊबंदकी, सवाई माधवरावाचा मृत्यू, राजसंन्यास, इ. अप्रतिम नाटकांची मराठीला देणगी मिळाली. बखरीतील त्रोटक माहितीच्या आधारे व्यक्तींच्या मूळ प्रेरणेकडे धाव घेऊन गडकऱ्यांनी जो संभाजी उभा केला आहे, तेथपर्यंत इतिहाससंशोधकांनाही पोहोचता आले नाही. हे गडकऱ्यांच्या असामान्य प्रतिभेचे असामान्य यश आहे. मूळ इतिहासात संभाजीराजांना ज्या दिवशी म्हणजे 1689च्या पंधरा फेब्रुवारी रोजी मोगलांच्या छावणीत आणण्यात आले, त्याच दिवशी त्यांचे डोळे काढले आहेत, त्यामुळे सोडविण्याचा प्रयत्न होणे शक्यच नव्हते. तरी पण ती शक्यता कल्पून गडकऱ्यांनी संभाजीच्या तोंडून राजधर्माचे जे अप्रतिम निष्कर्ष काढले आहेत, त्यामुळे संभाजीराजांचे व्यक्तिमत्त्व एका दिव्य आणि भव्य पातळीवर जाऊन पोहोचले आहे.'

पगडींनी जाणवले होते की, विषयाची निवड, घटनांचे फेरफार, व्यक्तींच्या आयुष्यातील चढउतार, त्यांचे स्वभावविशेष इत्यादींवर लेखणी चालवीत असताना आपले अनेक ललित लेखक हे व्यक्तिगत संकोचाच्या पोटी समाजाला भिऊन लिहित आहेत की काय, असे वाटू लागते. जणू काय ते लिहीत असताना त्यांच्या पाठीमागून कोणीतरी त्यांच्या लेखनाकडे सतत लक्ष ठेवून आहे, कोणती अनामिक भीती त्यांना ग्रासते आहे, हे सांगता येत नाही. पण चिकित्सक रसिकांना ते समजण्यासारखे आहे. संभाजीराजांचे श्रेष्ठत्व आणि त्यांचे मराठयांच्या इतिहासातील अमर स्थान हे त्यांच्या अपूर्व साहसात आणि मोगलांशी त्यांनी जिद्दीने आणि बेडरपणे गाजविलेल्या निकराच्या संघर्षात आहे. पगडींनी आपल्या लेखनात दोन महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. संभाजीराजांच्या अपूर्व कामगिरीपुढे अन्य गोष्टी या क्षुद्र अगर नगण्य ठरतात किंवा अप्रस्तुत तरी ठरतात, असे असूनही कथाकार आणि नाटककार यांची लेखणी त्यांच्या व्यसनांकडे वारंवार का वळतेबाजीरावाच्या पराक्रमाकडे दुर्लक्ष, पण बाजीराव-मस्तानी प्रकरणावर पुन्हा पुन्हा लेखन, हा काय प्रकार आहे?
पगडी यांनी 23 फेब्रुवारी 1985 रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वार्षिकोत्सवात अध्यक्षीय भाषण करताना असे स्पष्ट केले आहे की, ऐतिहासिक नाटकात किंवा काव्यात काव्य आणि नाटक हे प्रमुख होत, इतिहासाचे स्थान दुय्यम. अशा वाङ्मयाचे वाङ्मयीन दृष्टीकोनातूनच परीक्षण झाले पाहिजे. इतिहासाचा अभ्यासक हाही त्याच दृष्टीकोनातून ललित वाङ्मयाकडे पाहतो.
मात्र सध्याची समाजातील परिस्थिती पाहता आपण ही दृष्टी गमावत चाललो आहे का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
पगडी यांनी पुढे सांगितले होते, 'महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, महाराष्ट्रातील बव्हंशी समाज हा ललित कृतीतूनच इतिहास शिकणारा दिसतो. तो स्वच्छ इतिहासाला रुक्ष समजतो. त्यामुळे ऐतिहासिक नाटकांतील अगर कादंबऱ्यांतील घटना या सत्याच असतील असे समजण्याची प्रवृत्ती सामान्यपणे दिसून येते. ती दूर करावयाची असेल तर सामाजिक प्रबोधन हाच एक मार्ग आहे. दमदाटी समाजाला फॅसिझमकडे नेणारी आहे. अशामुळे लेखकांचे स्वातंत्र्य संपुष्टात येईलच; समाजही असहिष्णू होत जाईल.
तीस वर्षांपूर्वी पगडी यांनी ही भीती व्यक्त केली होती. आज आपण ही गोष्ट अनुभवतो आहोत.  आपले दुर्दैव असे आहे की आम्ही समाजप्रबोधनाच्या मार्गाकडे पाठ फिरविली आहे आणि पुतळयांची मोडतोड करीत त्यातून इतिहासाची मोडतोड करण्याचा केविलवाणा मार्ग अंगीकारला आहे. यातून काय साध्य होणार आहे, हा प्रश्नच आहे. समाजात अशा घटना वारंवार घडणे ही समाजाच्या निकोप आरोग्याच्या दृष्टीने भयसूचक घंटा आहे. वेळीच सावध होऊन इतिहासाकडे त्याचप्रमाणे साहित्यकृतींकडे निकोष दृष्टीकोनातून पाहण्याचा समाजप्रबोधनकारी मार्ग स्वीकारणे अत्यंत निकडीचे आहे.

***


No comments:

Post a Comment