Thursday, 26 May 2016

दृष्टांताची मात 

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वैशिष्टय म्हणजे एखादा तात्त्वि मुद्दा समजावून सांगण्यासाठी ढिगभर सोपे सोपे दृष्टान्त त्यांनी दिले आहे. एवढा दृष्टान्तांचा खजिना ज्ञानेश्वरीत आहे की त्याचा स्वतंत्रपणे अभ्यासच करायला हवा. उदाहरणादाखल बाराव्या अध्यायातील काही दृष्टान्त येथे देत आहोत.

देवभक्त ऐक्य
सूर्यबिंब नाहीसे झाले की सूर्यकिरणेही त्याच्या मागोमाग नाहीशी होतात. अगदी त्याचप्रमाणे माझा भक्त माझ्यात सामावून जातो.

निराकाराची उपासना/निर्गुण भक्ती
पतिशिवाय रोज चितेवर बसून सती जाणे जसे अवघड आहे तसे निराकाराची उपासना करणे महाकठीण आहे.

निराकाराची प्राप्ती
पांगळया माणसाला वाऱ्याबरोबर धावण्याची शर्यत जिंकता येत नाही. त्याचप्रमाणे मी देह आहे ही भावना असलेल्या मनुष्याला निराकार ईश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही.

देवभक्त नाते
आपण जन्माला घातलेले मूल आईला जितके प्रिय असते तितका मला माझा भक्त प्रिय असतो.

देवभक्त नाते
आईच्या पोटातील गर्भ ज्याप्रमाणे आईचे स्वरूप जाणू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य भगवंताला जाणू शकत नाही.

देवभक्त नाते
राजाच्या राणीला हवी ती वस्तू मागितल्याबरोबर मिळते, त्यासाठी कोणाकडे याचना करावी लागत नाही. माझ्या भक्तांनाही कुणाकडे भीक मागावी लागत नाही.

प्राण व शरीर 
एकदा शरीरातून प्राण बाहेर पडला की सर्व इंद्रियांचा कारभार आपोआप थंडावतो, त्याचप्रमाणे भक्ताने आपले मन ईश्वराला अर्पण केले की त्याचा सर्व अहंकार नाहीसा होतो.

चंद्रबिंब 
पौर्णिमेचे चंद्रबिंब हळूहळू लहान होत शेवटी अमावस्येला पूर्णतः दिसेनासे होते. त्याचप्रमाणे मनुष्याने विषयभोगातून आपले मन हळूहळू काढून घेण्यास सुरुवात केल्यास तो ईश्वराच्या रूपात पूर्णतः लीन होऊन जातो.

अभिमान 
पाटाचे पाणी माळी नेईल तिकडे निमूटपणे जाते, त्याचप्रमाणे कर्तृत्वाचा अभिमान सोडून आपल्या हातून भगवंत जे काम करून घेणार आहे ते आपण करीत नाही याच भावनेने करावे.

चाले हे शरीर 
रस्ता सरळ आहे की वाकडा आहे याचा विचार रथ करीत नाही. सारथी चालविल तसा तो मुकाट चालत जातो. त्याचप्रमाणे आपल्या देहाचा रथ हा भगवंत चालवित नेत आहे अशी भावना बाळगावी.

कर्म फळ 
आपली कन्या कितीही सुंदर असली तरी पिता तिचा अभिलाष धरत नाही. फळे कितीही मधुर असली तरी झाड त्याचा अभिलाष धरत नाही. पिता कन्यादान करतो तर झाडे पिकलेली फळे खाली लोटून देतात. माणसाने कर्मफळाबाबत तसेच उदास झाले पाहिजे.

जन्म मरण नाही 
वेळूचे झाड एकदा व्याले की पुन्हा वीत नाही. कर्मफळाचा एकदा त्याग केला की मग जन्ममरण पुन्हा नाही.

गायन आणि कीर्तन

संगीत म्हणजे गायन आणि कीर्तन यांच्यातील एक वेगळाच संबंध परवा उमगला. राग गाताना स्वरविस्तार अथवा आलाप करण्याची पध्दत आहे. वेगवेगळया पुस्तकातून एकाच रागाचे स्वरविस्तार व आलाप वेगवेगळे दिलेले असतात. विद्यार्थ्याने नेमका कोणता स्वरविस्तार अथवा आलाप पाठ करावा? हा प्रश्न पडला. याचे उत्तर असे की, स्वरविस्तार अथवा आलाप पाठ कशाला करावा. पाठ केलेले आलाप घेण्याची सवय लागल्यास गायन ठोकळेबाज बनते व त्यात जिवंतपणा उरत नाही. एकदा राग आणि त्यातील स्वर कळले, स्वरसंगती कळली आणि अलंकारांचा अभ्यास चांगला जमलेला असला तर मग उत्स्फूर्त आलाप घेता येतात. गायनात जिवंतपणा येतो.
कीर्तनाचेही तसेच आहे. वेगवेगळे अभंग, श्लोक, आर्या, ओव्या यांचे पाठांतर यासाठीच करावे लागते. पण सेवेला घेतलेल्या अभंगाचा जेव्हा विस्तार करायचा असतो तेव्हा तो ठोकळेबाजपणे केल्यास त्यात जिवंतपणा उरत नाही. जिवंतपणा म्हणजे श्रोत्यांशी संवाद होय. कीर्तनाची मांडणी कशी करावी याचे पाठांतर केले जाते. पण आयत्यावेळी कीर्तन चालू असताना श्रोत्यांना काय रुचतेय काय पचतेय याचा विचार न करता केवळ पाठांतर केले आहे म्हणून आणि मुद्दयांचा क्रम लक्षात असल्यामुळे तशा पध्दतीने मुद्दे मांडत जाणे म्हणजे विचित्र प्रकार असतो. श्रोत्यांचा कल पाहून मुद्दयांचा क्रम उलटसुलट करता आला पाहिजे, त्याचप्रमाणे मुद्दयांचा संकोच अथवा विस्तार करणे या गोष्टी कीर्तनकाराला ऑन दी स्पॉट करता यायला हव्यात. त्यामुळेच कीर्तनात जिवंतपणा येतो.

मग पुस्तकात स्वरविस्तार व आलाप देण्याचे कारण काय? ते केवळ सरावासाठी असतात हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे कीर्तनातील मुद्दयांची मांडणी कशी करावी याचा सराव करण्यासाठी कीर्तनाचा अभ्यास करून घेतला जातो. प्रत्येक कलेत आणि क्रीडेतही वेगवेगळे सराव हे अभ्यास म्हणून केले जातात, पण सादरीकरणाच्या वेळी जशी परिस्थिती समोर येईल त्याला अनुसरून कामगिरी करणे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. ही उपजत बुध्दी शिकविता येत नाही. प्रत्येक कलेची हीच मर्यादा आहे. त्यातील शास्त्र केवळ शिकविता येते, कला ही अभ्यासाने म्हणजे सरावाने येत असते. मित्रांनो, कीर्तन शिकणारे कितीजण कीर्तनाचा सराव करतात? आपले केवळ शिक्षण सुरू आहे. सराव नाही! तेव्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की, कीर्तनाची सुरुवात म्हणून छोटयामोठया समारंभात दहापाच मिनिटांची भाषणे, एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कविता वा नाटयछटेचे सादरीकरण, एकपात्री प्रयोग, कथेचे अभिवाचन, प्रवचन व निरुपण हे उपक्रम आठवडयातून एकदा, पंधरवडयातून एकदा, किमान महिन्यातून एकदा तरी करायलाच हवे. असे करता आले नाही तर कीर्तनाचे शास्त्र कळेल, पण कीर्तन कधीच करता येणार नाही. हा धोक्याचा इशारा येथे द्यायलाच हवा. यासाठी आपल्या परिसरात असे उपक्रम करणाऱ्या संस्था शोधा, असे उपक्रम कोठे चालतात त्याचा शोध घ्या, अशा उपक्रमाच्या आयोजकांशी संपर्क करा, त्यांच्याकडून वरील जबाबदारी मागून घ्या. यामुळे आपला जनसंपर्कसुध्दा वाढेल. कीर्तनासाठी बोलावणे येण्यासाठी हा जनसंपर्क उपयोगी पडेलच! 

निरुपणातील मुद्दयांचा क्रम आणि आराखडा


1. देव आपल्या भक्तांची संकटे स्वत: सोसत असतो.

2. भक्त म्हणजे कोण? आपल्या देहाविषयी जे उदास म्हणजे निरपेक्ष आहेत, ज्यांचे सर्व आशापाश तुटलेले आहेत , ज्यांना  जन, धन, माता, पिता या ऐहिक गोष्टींची आवड उरलेली नाही. कारण केवळ 'नारायण' हाच त्यांचा विषय झाला आहे. तेच खरे भक्त होत.

3. देव संसाराविषयी उदासीन असलेल्या भक्ताच्याच मागे धावतो.

4. अभक्त म्हणजे कोण? कमळ आणि बेडूक एकाच ठिकाणी म्हणजे नदीच्या चिखलात असतात. पण बेडूक कधीही मकरंदाचे सेवन करीत नाही. भुंगा मात्र अत्यंत दूरवरून येतो आणि मकरंदाचे सेवन करून जातो.

5. दृष्टान्तः एकाला चिखल मिळतो आणि एकाला मध मिळतो.

6. सर्व सुखाचे मूळ असलेला भगवंत सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात आहे, पण श्रध्दा नसलेल्यांना त्याची प्राप्ती होऊ शकत नाही.

7. निर्वाणीचे संकट कोसळल्यास देव भक्ताला पोटाशी धरून ठेवतो. एका प्रकारे देव त्याचा अंकित होऊन जातो.

8. अनन्यभावाने शरण आलेल्या भक्तांची सेवा प्रत्यक्ष परमात्मा करतो व त्यांची सतत काळजी वाहतो.

9. ज्या ठिकाणी वैष्णव कीर्तन करतात तेथे हा श्रीपती उभा राहतो.
10. या देवाला कीर्तनाची इतकी गोडी आहे की तो चक्क उडया मारत कीर्तनात येऊन उभा राहतो.

11.एक क्षणसुध्दा वाया न दवडता  नामस्मरण केले पाहिजे. तर मग वेळ न लावता भगवंत धावून येतो.

12. भगवंतांच्या नामामुळे अवघ्या जगातील दुःखे नाहीशी झाली. सगळीकडे सुखच सुख निर्माण झाले.

13. फक्त नामसंकीर्तन करा. तो भगवंत तुमच्या घरी पत्ता विचारत येतो.

14. हा पांडुरंग सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे व सर्वत्र भरून उरला आहे.

15. जनाबाई म्हणतात - देवाशिवाय काहीच रिकामी जागा शिल्लक नाही.

16. दृष्टान्त - गणपती असो की उंदीर असो. शेवटी सोने ते सोनेच त्यामुळे दोघांचाही भाव एकच.


17. सर्वत्र देव भरून राहिलेला आहे असा अनुभव भक्ताला आला म्हणजे त्याला आत्मज्ञान झाले.