Friday, 29 April 2016

भाषणाचे अष्टादशअवधान
अर्थात उत्तम भाषणाची अठरा सूत्रे
ह. भ. प. दीपक महाराज जेवणे


भाषण रंगविताना वक्ता सर्वांसमोर एक आभासी कल्पनाचित्र साकार करीत असतो. हे करताना त्याच्याकडे केवळ एकच प्रमुख साधन असते, ते म्हणजे त्याचा आवाज. याला पूरक साधन असते अभिनयाचे. पण व्यासपीठावर समोर ध्वनिवर्धक ठेवून बोलत असल्यामुळे शारीरिक हालचालींवर फारच मर्यादा येतात. त्यामुळे त्याला मुद्राभिनय, हावभाव, हातवारे यांच्यावरच वेळ मारून न्यावी लागते. जर प्रेक्षकांची संख्या जास्त असल्यास व पुरेसा प्रकाश नसल्यास मुद्राभिनय लोकांना दिसत नाही. त्यामुळे आवाज हेच वक्त्याचे प्रमुख साधन होय! केवळ आवाजाच्या माध्यमातून कल्पनाचित्र कसे साकार करता येते हे आपण आवाज जोपासना शास्त्राच्या माध्यमातून जाणून घेऊया.
आवाज जोपासना म्हणजे काय?
पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाला आवाज ही गोष्ट जन्मतःच मिळालेली असते. आवाज निर्मितीची निसर्गदत्त यंत्रणा आपापल्या शरीरात असते. पण ही यंत्रणा कार्यक्षमपणे कशी वापरावी? त्याचे कोणते तंत्र आहे? कमीत कमी प्रयासाने आपल्याला तिचा कसा चांगला वापर करता येईल? या गोष्टी जाणून घेण्यासाठी आवाज जोपासना शास्त्राचा उपयोग होतो.
हे शास्त्र शिकून घेताना काही पथ्ये पाळली पाहिजे तर काही तत्त्वे  समजून घेतली पाहिजेत.
1. अनुकरण टाळा.
बरेचदा भाषणाच्या बाबतीत माणूस कोणाला तरी आपला आदर्श मानून त्याचे अनुकरण करीत असतो. असे अनुकरण करणे चुकीचे असते. प्रत्येकाचा आवाज आणि आवाजनिर्मितीची पध्दत वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्याची नक्कल करणे योग्य नसते. तसेच दुसऱ्याची नक्कल करून आपले वेगळे व्यक्तिमत्त्व कधीच तयार होणार नाही. परिणामी समाजावर आपला प्रभाव पडणार नाही.
2. चुकीच्या संकल्पना मनाशी धरू नका.
कोणती भाषणशैली चांगली आणि कोणती वाईट याबाबत आपणच काही कल्पना निश्चित केल्या असतात. त्या बऱ्याचदा चुकीच्या असतात. दूरचित्रवाणी व अन्य माध्यमातून आपल्याला जे भाषणशैलीचे नमुने दृष्टीस पडतात ते बऱ्याचदा बटबटीत असतात. मात्र त्यांचा प्रभाव पडत असल्यामुळे आपण त्याकडे आकर्षित होत असतो. भाषणाच्या गुणवत्तेचे भान नसल्यामुळे मग आपण अशा नमुन्यांचे अनुकरण करू लागतो. हे चूक आहे.
3. कृत्रिम आवाजनिर्मिती टाळा.
दुसऱ्याच्या अनुकरणातून आपल्याला आवाज वापरण्याच्या निरनिराळया कृत्रिम सवयी जडतात. मात्र यामुळे आवाज आणि भाषण यांच्या विविध समस्या निर्माण होतात. तसेच यामुळे आपण श्वासोच्छवास, हावभाव, हातवारे, आवाजाचा पोत, उच्चारशैली याबाबतीत  अनेक माणसे स्वतःचा ठसा गमावून बसतो.
4. दुसऱ्यांच्या प्रभावातून मुक्त व्हा.
चुकीचे आदर्श मनात बाळगू नका. अशा प्रभावातून मुक्त व्हा आणि आपल्या आवाजाला स्वतंत्र करा. आपला स्वतंत्र ठसा निर्माण करा. दुभंग व्यक्तिमत्त्वापासून बचाव करा.
खाजगी संभाषणात वेगळा आणि सार्वजनिक भाषणात वेगळा असे दोन प्रकारचे आवाज वापरणे धोक्याचे आहे. कारण हे दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे. आवाज हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा असतो. आवाज व भाषण यांच्यात एकात्मता, एकसंधता आणल्यावर व्यक्ती मूलभूत पातळीवर बदलू लागते. आवाज व भाषण सुधारले की व्यक्तिमत्त्वात आपोआप सुधारणा होऊ लागते.
5. आवाज आणि भाषण याविषयी दक्ष राहा.
भाषण आपोआपच येत असते असे गृहित धरल्यामुळे आपण बोलणे हरवून बसलो आहोत. कसे व काय बोलावे याविषयी दक्ष राहण्याकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. आपल्याला काय म्हणावयाचे आहे ते नेमकेपणे व नीटपणे सांगता आले पाहिजे, आपला आशय दुसऱ्यापर्यंत विकृत न होता पोहोचला पाहिजे. कारण त्याशिवाय मानवी व्यवहार सफल होऊ शकत नाही.
6. शारीरिक आणि मानसिक यंत्रणांवर ताबा मिळवा.
शारीर-मानस यंत्रणांवर ताबा मिळविण्याइतपत लोकांची तयारी नसल्यामुळे आवाज चढविणे, लांब वाक्ये सहजपणे व पूर्णपणे उच्चारणे, भाषणात हवी तेव्हा हवी तितकी भावव्यक्ती राहणे याबाबतीत लोक कमी पडतात. आशय अभिव्यक्तीसाठी आवाज व भाषण सक्षम झाले पाहिजे. विशिष्ट प्रसंग, मनोवस्था आणि परिस्थितीस आवाज व भाषणाद्वारे प्रतिसाद देऊ पाहणाऱ्या संवेदनशील मनाला आवश्यक ती कौशल्ये कंठगत असली पाहिजेत.
7. प्रेक्षक आणि श्रोते यांचे मन आकर्षित करून घ्या.
कलाकाराचे पहिले उद्दिष्ट म्हणजे प्रेक्षकांचे मन आकर्षून घेणे. भाषण अथवा सादरीकरण करताना आपण प्रेक्षकांचे मन आकर्षित करण्याकडे लक्ष पुरविले पाहिजे.
8. प्रेक्षक आणि श्रोते यांना मूल्यात्मक अनुभव द्यावा.
आपल्याकडे आकर्षित झालेल्या प्रेक्षकांना काही मूल्यात्मक अनुभव देणे हे कलाकाराचे दुसरे उद्दिष्ट असते. हा अनुभव त्यांच्या मनात ठसला पाहिजे. तसेच हा अनुभव त्यांच्या आपापल्या व्यक्तिमत्त्वाचा एक अपरिहार्य घटक बनावा हे वक्त्याचे मुख्य ध्येयच असते. असे झाले म्हणजे वक्त्याचा श्रोत्यांवर प्रभाव पडला असे मानण्यास मुळीच हरकत नाही.
9. चिंतन करा.
वरील सर्व बाबी जेव्हा बोलणारा अर्थात भाषण करणारा मनुष्य लक्षात घेतो, तेव्हा त्याला आपण कशी वाटचाल केली पाहिजे हे उमगत जाते. आपल्या भाषणाच्या खटाटोपातून आपण काय साध्य करणार आहोत, याबाबतची सुस्पष्ट कल्पना मनुष्याच्या मनात साकार होते. ही उत्तम भाषणाची आवश्यक बाब आणि प्रारंभ असतो. निरुद्देश बोलणे अथवा भाषणातून काहीही साध्य होत नसते, मग वक् त्याचा प्रभाव तरी कसा पडावा? हे लक्षात घेतले पाहिजे.
10. आपला कणा ताठ ठेवा.
आवाज निर्मिती करताना बोलण्यासाठी व गाण्यासाठी आवश्यक त्या प्रकारची श्वसनक्रिया सुलभपणे व क्षमतेने करावयाची असल्यास श्वसनपटलाच्या हालचालींना अडथळा होता कामा नये यासाठी ताठ बसणे व ताठ उभे राहणे अत्यंत आवश्यक असते. या आरामखुर्चीत बसून करण्याच्या क्रिया मुळीच नव्हेत!
11. एकसुरीपणा टाळा.
काही वक्ते एकसुरी आवाजात भाषण करतात. हा दोष समजला पाहिजे. पण दोषभूत एकसुरीपणा म्हणजे काय? तर श्रोत्यांच्या सहज ध्यानात न येण्यासारखे चढउतार आपल्या भाषणात करणे होय. भाषण परिणामकारक होण्याकरिता जितक्या प्रमाणात चढउतार असावे लागतात त्यापेक्षा कमी असणे म्हणजे एकसुरीपणाचा दोष.
12. भाषण आणि गायन यातील फरक लक्षात घ्या.
गायन आणि भाषण या दोन वेगळया गोष्टी आहेत. कारण निश्चित स्वरांतरावर विसंबून राहणारे संगीतातील चढउतार भाषणातील चढउतारापेक्षा संख्येने अल्प असतात पण ते नेमके असतात, तर भाषणातील चढउतार संख्येने जास्त व ढोबळ असतात.
13. सूर पकडण्याचा अभ्यास करा.
एखादा स्वर निश्चित करून त्याच्या वरखाली न जाता भाषण करणे एक महत्त्वाचा अभ्यास आहे. एक सूर पकडायचा असेल तर तारतेची एक निश्चित पातळी (पट्टी) पकडून ध्वनी निर्माण करावा लागतो. एकच सूर उमटविण्यासाठी आपल्या उच्छवासावर चांगले नियंत्रण ठेवावे लागते. हे तर अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शक्य होत असते, तेव्हा हा दोष नव्हे! शिवाय एकापाठोपाठ चढत्या व उतरत्या निरनिराळया स्वरांवर भाषण म्हणण्याचा सराव ठेवल्यास श्वासाचा उपयोग व तारता पातळीवर नियंत्रण ठेवता येते.
14. भाषणाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
काही वक्ते भरभर बोलतात तर काही वक्ते अडखळत बोलतात. काही वक्ते तर या दोन्ही गोष्टींचे आपल्या भाषणात मिश्रण करतात. वेगात बोलणे म्हणजे द्रुत भाषण होय. पण या भाषणाचासुध्दा एक वेग ठरलेला असतो. आपले बोलणे ऐकणाऱ्याला कळले पाहिजे ही अट पाळून एका सेकंदात किमान पाच अक्षरे उच्चारली तर त्या भाषणाला द्रुत भाषण म्हणायला हवे. यासाठी पुकारे, ललकारी व दवंडी यांचा अभ्यास करता येतो. आपली उच्चारगती द्रुत असून घंटानादाप्रमाणे ऐकणाऱ्याच्या कानावर एकापाठोपाठ शब्द आदळले पाहिजेत. बोलावयाचा मजकूर दीर्घ असल्यास त्याचे खंड पाडून आवाजाची फेक करावी. म्हणजे हे द्रुत भाषणही श्रोत्यांना ऐकण्याजोगे होते.
15. धावत्या वर्णनाचा अभ्यास हवा.
समोर घडणाऱ्या घटनेचे भाषणकर्त्याने तत्काल व अखंड शब्दांकन करत जाणे म्हणजे धावते वर्णन होय. आपल्यासमोर  घडणाऱ्या घटनेतील बारीकसारीक तपशील टिपत त्यातील गतिमानतेत खंड पडणार नाही, असे भाषण यावेळी करावे लागते. मात्र धावते वर्णन करण्यासाठी चांगली कल्पनाशक्ती आवश्यक असते.
16. ध्वनिवर्धकाचे भान पाळा.
आता सर्वत्र ध्वनिवर्धकांचा वापर वाढला आहे. यामुळे सूक्ष्म ध्वनिपरिणांमावर भर देणे हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. अनेक चांगल्या वक्त्यांना हे साधता येत नाही आणि त्यांचे भाषण पडते. यासाठी ध्वनिक्षेपकातून बाहेर पडणारा आपला आवाज आपण नीट ऐकणे आवश्यक असते. हा आवाज परिणामकारक व्हावा यासाठी भाषणाच्या गतीत बदल करणे आवश्यक असते. कारण भाषणगतीचे बदल भाषणास वेधक बनवितात. म्हणून आशय, भाषेचा स्तर, वगैरेंना अनुसरून उचित, अल्पावधीचे पण लक्षणीय बदल भाषणगतीत पेरले पाहिजेत. आपली भाषणगती म्हणजे अशा  विरामांचे योग्य नियंत्रण होय.
17. शब्दांचा ठसा उमटवा.
भाषण करताना श्रोत्यांच्या मनावर आपल्या शब्दांचे महत्त्व ठसविणे आवश्यक असते. वाक्यातील जो महत्त्वाचा शब्द असतो त्याची तारता आजूबाजूंच्या शब्दांपेक्षा बरीच वरची अथवा खालची ठेवून हा परिणाम साधता येतो. या शब्दाचा विशेष प्रकारे उच्चार करता येतो. वाक्याच्या आरंभी अथवा शेवटी येणारा शब्द सामान्यपणे लक्ष आकर्षून घेतो. शब्दाच्या उच्चारासाठी लागणारा कालावधी बदलून त्याचे महत्त्व ठसविता येते. शब्दाच्या उच्चारासोबत हालचाली, हावभाव अथवा हातवारे यांची जोड देता येते. शब्दाच्या पुनरावृत्तीतूनही हा परिणाम साधता येतो. भाषणाचा परिणाम वाढविण्यासाठी योग्य त्या ठिकाणी योग्य तितका आघात देणे म्हणजे बलाघात व कोणतेही खास आघात न देता बोलणे म्हणजे समाघात होय.
18. नियमित सराव आणि अभ्यास करा.
वर सांगितल्याप्रमाणे भाषणगुण साध्य होण्यासाठी नियमित अभ्यास आणि सराव करणे म्हणजेच आवाज जोपासना शास्त्र होय. आपल्या आवाजाची जोपासना केल्यास आपण चांगले वक्ता म्हणून श्रोत्यांवर प्रभाव पाडू शकतो.
हरिकीर्तन प्रबोधिनीच्या अभ्यासक्रमात आवश्यक सराव आणि अभ्यासाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी जाणून घेऊन आपला विकास घडवावा.




Monday, 18 April 2016

हार्मोनिअम वादनातील बारकावे


ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)




माझा मागचा लेख वाचून माझी पध्दत कोणती आहे हे विचारणारे बरेच दूरध्वनी आले. माझी काही जगावेगळी पध्दत नाही, पण हार्मोनिअम वादनातील जे बारकावे सहसा कोणी लक्षात आणून देत नाहीत अथवा सांगत नाहीत आणि विद्यार्थी अज्ञानातून सराव करीत राहतात ते बारकावे सांगून वादनाच्या पायऱ्या मी समजावून देतो, हीच माझी पध्दत होय. येथे काही बारकावे सांगत आहे.
काही लोक हार्मोनिअमच्या पट्टयांवर स्वरांची नावे चिकटवतात आणि ती वाचत वादनाचा सराव करतात. मी नम्रपणे सांगू इच्छितो. ही चुकीची पध्दत आहे. मी तर सांगेन आपल्या इष्टदेवतेचे छायाचित्र समोर ठेवा आणि त्याच्याकडे पाहात सराव करा. लवकर पेटी वाजवता येईल. कोणीही वादक पेटीच्या पट्टयांकडे पाहात पेटी वाजवित नाही. चुकीची सवय लावून घेऊ नका.
माझे एक मित्र मन लावून हामोंनिअमचा सराव करीत असत. पण आजही त्यांना हार्मोनिअम नीट वाजविता येत नाही. त्यांनी अलंकार वादनाचा सराव तबल्याच्या तालांशिवायच केला आहे. ताल त्यांच्या डोक्यात कधीच बसला नाही. गायकाला अथवा वादकाला तालाची समज असायलाच हवी.
यासाठी मी तर सांगतो पहिल्या दिवसांपासून सताल अलंकार सराव झाला पाहिजे.
त्यासाठी तालाच्या मात्रा हातावर मोजत ताल डोक्यात भिनवायला हवा. तालाचे बोल ऐकत या मात्रा मोजाव्यात. कोणत्या मात्रेवर कोणता बोल आहे व सम आणि काल कोठे आहे ते लक्षात घ्यावे.
भजन कीर्तनासाठी हार्मोनिअम शिकणाऱ्यांनी त्रिताल, कीर्तनी धुमाळी आणि भजनी धुमाळी या किमान तालांचा सुरुवातीला सराव करायलाच हवा.
या तालांची दुगुन, तिगुन व चौगुन कशी होते याचा सराव करायला हवा.
आपण नोटेशन्सची अनेक पुस्तके पाहतो. त्यात सम आणि मात्रांसहित स्वरलिपी दिली असते. पण त्यांचे गणित आपल्याला माहीत नसल्यामुळे त्यावरून वादन करता येत नाही.
केवळ तालांतच दुगुन, चौगुन नसते. स्वरांचीही दुगुन, चौगुन वाजविता यावी लागते.
एकाच मात्रेत स्वर दोनदा, तीनदा, चारदा वाजला तर स्वराची दुगुन, तिगुन आणि चौगुन होते.
आता आपण उदाहरणच घेऊ.
दुर्गा रागातील कीर्तनी धुमाळी तालातील नमनाचे पद आहे.
१  २  ३ ४  ५  ६ ७  ८   १ २ ३ ४ ५ ६  ७  ८
रा ऽम कृ ष्ण ह री जय जय रा ऽ ऽ म  रा जा रा म ।
म धध प  प म रे मम पप  ध - - सां  प प म म ।
वर शब्द आणि खाली त्याला अनुसरून स्वर दिले आहेत.
येथे धध, मम, पप ही स्वरांची दुगुन आहे. म्हणजे एकाच मात्रेत स्वर दोनदा वाजला आहे. तर रा ऽ ऽ म असे म्हणताना ध - - सां यामध्ये ध हा स्वर तीन मात्रा लांबला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
एका मात्रेत एकापेक्षा जास्त स्वर वाजविणे आणि एकच स्वर एकापेक्षा जास्त मात्रेत लांबविणे हा सरावाचा भाग असायला हवा.
अजूनही बरेच बारकावे आहेत, किंबहुना वर दिलेले बारकावेसुध्दा मी थोडक्यात सांगितले आहेत. त्यावर अधिक तपशीलात विवरण केले जाऊ शकते.
माझी पध्दत विचारण्यासाठी दूरध्वनी आल्यामुळे ही हे बारकावे दिलेले आहेत. पायरी-पायरीने संगीत म्हणजे वादन शिकावे ही माझी पध्दत आहे व त्या पायऱ्या मी व्यवस्थित समजावून देतो. त्यामुळे हार्मोनिअम वादन सुलभपणे शिकता येते, एवढेच मी सांगू इच्छितो. योग्य मार्गाने उचित सराव केला तर आपण लवकर वादन शिकू शकतो हेच मला सांगायचे आहे.


Wednesday, 13 April 2016

एका तासात शिका हार्मोनिअम!

ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)



हरिकीर्तन प्रबोधिनीच्या संकेतस्थळावर हार्मोनिअम कसा वाजवावा याबाबत माहिती दिलेली आहे. तरी काही विद्यार्थ्यांना अजूनही हार्मोनिअम वाजविणे जमलेले नाही. याविषयी चिंतन केले असता जी गोष्ट उमगली ती येथे मांडत आहे.
मी हार्मोनिअम कसा शिकलो, याचा मी मागोवा घेतला. गायन, वादन आणि नर्तन या तीन गोष्टी संगीतात मोडतात हे गायन शिकण्यास सुरुवात केली असता माझ्या लक्षात आले.  नर्तनासाशी माझा फारसा संबंध नव्हता. पण वादनाशी संबंध येणारच होता. स्वरज्ञान होण्यास हार्मोनिअम उपयोगी ठरते म्हणून मी हार्मोनिअम शिकण्यास सुरुवात केली. हार्मोनिअम या विषयात माझे चार गुरू आहेत. याशिवाय ग्रंथ आणि इंटरनेट हे दोन अधिकचे गुरू म्हणावे लागतील.
माझ्या सर्व गुरुंबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्यांच्याबद्दल पूज्य भावना बाळगूनच येथे विवेचन केलेआहे हे लक्षात घ्यावे. एका शिक्षकांनी स्वरांचा परिचय करून दिल्यावर बोटे कशी वापरायची, स्वर कसे वाजवायचे इत्यादी समजावून अलंकार लिहून दिले. या अलंकार वादनाचा सराव करण्यास सांगितले. आठवडयातून दोनदा शिकवणी असे आणि माझ्याकडे हार्मोनिअम नव्हती. तीन महिन्यात अलंकारांचाच सराव चालला. सरांचे सांगणे होते की, आपली बोटे चपळाईने पट्टयांवर फिरायला हवीत. त्यासाठी तेज गतीने बोटे फिरविण्याचा सराव हवा. पण बोटे चुकणे, आरोह व अवरोह एकसमान वेळेत न होणे, पटकन कळ लागून बोटे दुखणे या गोष्टी सुरू झाल्या. तीन महिन्यात मला हार्मोनिअम वादन काही जमले नाही. शिवाय सर माझी शिकवणी घेतात की हार्मोनिअमचे भाडे अाकारतात तेही समजेना. यावर उपाय म्हणून क्लास बंद केला व हार्मोनिअम विकत आणली.
मग मी इंटरनेटचा आधार घेतला. विविध कलाकारांचे वादन पाहिले आणि ऐकलेही. त्याचप्रमाणे विविध ग्रंथांचे वाचन केले. हार्मोनिअम या विषयात बाजारात, ग्रंथालयांत आणि इंटरनेटवर जेवढी पुस्तके मिळतील ती सर्व वाचून काढली. एका वाचनात समजेना म्हणून परत परत वाचली.
या सर्व खटाटोपातून काही महत्त्वाच्या, काही आश्चर्यजनक आणि काही गंमतीदार गोष्टी कळल्या.
स्वरज्ञान - हार्मोनिअम वाजविण्यासाठी स्वरज्ञान आवश्यक आहे. पण ज्यांना स्वरांची नावे माहीत नाहीत किंवा रागांची काहीही माहिती नाही, असे लोक पेटी वाजविताना आणि साथ करताना मी पाहिले. थक्कच झालो. स्वर म्हणजे काय? तर आवाजाची एक विशिष्ट उंची. मग त्याला स्तर म्हणा की पातळी म्हणा... केवळ ते लक्षात घेऊन पेटी वाजविणारे लोकही मला दिसले. यांना संगीताबद्दल काही माहिती नव्हती. पण विविध गाणी मस्त वाजवित असत. याचा त्यांना अभिमानही होता.
तसेच नेटवरील काही वादक आपापल्या पध्दतीनेच वादन करताना दिसले. प्रत्यक्ष कार्यक्रमात वादकांच्या जवळ बसूनही निरीक्षण केले. तेव्हा ग्रंथात सांगितलेली शिस्त न पाळणारे वादक दिसले. काहींचे वादन सदोष म्हणता येईल असेही होते.
सुरुवातीच्या काळात सताल अलंकार या शब्दांचा अर्थही कळला नव्हता. एका गुरुने बऱ्याच दिवसांत तालांचा परिचयसुध्दा करून दिला नव्हता. किंबहुना हार्मोनिअम वाजविण्यासाठी तालांची समज लागते, ही गोष्ट बऱ्याच जणांना पटण्यासारखी वाटली नाही. हार्मोनिअम वादनासाठी ज्या गोष्टी मी केल्या त्या सर्व तबलावादनासाठीसुध्दा केल्या.  तबलावादन शिकताना हार्मोनिअम वादनाविषयी बऱ्याच गोष्टी समजत आणि कळत गेल्या.
या सर्व गोष्टींचा विचार करून एक समग्र चिंतन मनात सुरू झाले. या चिंतनाचे सूत्र होते - हार्मोनिअम वादन शिकण्यासाठी सर्वांत प्रथम कोणती गोष्ट करायला हवी? हार्मोनिअम वादनाची पहिली पायरी कोणती? त्याचप्रमाणे लवकरात लवकर हार्मोनिअम वादन कसे शिकता येणार? या बाबतही विचार सतत मनात रेंगाळत राहिला.
यासाठी हार्मोनिअमची बनावट, पट्टयांची रचना, पाश्चात्त्य व भारतीय संगीतातील साम्य व अंतर यावरही चिंतन सुरू झाले. हार्मोनिअम हे भारतीय वाद्य नाही, ही गोष्ट समजून घेतली. ते भारतीय संगीतात कसे बसविण्यात आले हेही उमगले.
यातूनच पहिली पायरी माझ्या लक्षात आली. त्यालाच जोडून दुसरी व तिसरी पायरी आपोआप तयार झाली. यातून आपण केवळ एका तासात हार्मोनिअम वादन कोणालाही शिकवू शकतो, हा विश्वास आला. तसेच एका दिवसात म्हणजेच आठ तासांत व्यवस्थित पध्दतीने सराव केला तर विद्यार्थी एक गाणेसुध्दा नीट वाजवून दाखवू शकतो, हेसुध्दा उमगले. मग तो सराव एक दिवसात आठ तासांत करा अथवा आठ दिवसांत एकेक तास करा. आपल्या वेळेनुसार आणि सुविधेनुसार हे करता येईल.
ही गोष्ट वाचून काही जणांना हसण्याचा आणि थट्टा करण्याचा मोह होईल, तर काहीजण आक्षेपही घेतील!
मी यावर एवढेच सांगू शकतो. मी हार्मोनिअम वाजविणे शिकता येईल आणि ते जलद गतीने शिकता येईल असे म्हटले आहे हे लक्षात घ्या. ही काही जादू नव्हे! हे मी विकसित केलेले शास्त्र आहे. हार्मोनिअम वादनात तरबेज होण्यासाठी फार मोठा सराव करावा लागतो हे मला मान्य आहे. मी केवळ त्याचे उचित मार्गदर्शन करणार आहे. माझा क्लास केल्यावरही आपल्याला वादनात तरबेज होण्यासाठी नियमित सराव आणि अभ्यास करावा लागणार आहेच! त्याला पर्याय नाही. मला समजलेल्या अनेक गोष्टी कोणताही गुरू सहजासहजी सांगत नाही आणि हार्मोनिअम वादनाच्या अनेक पुस्तकांत त्या आपल्याला आढळतही नाहीत.
मग मी आपणास काय शिकविणार आहे? तर चार-पाच वर्षे अखंड मेहनत घेऊन हार्मोनिअम वादनाचे जे सूत्र मला उमगले आहे आणि सहजासहजी लक्षात न येणाऱ्या ज्या गोष्टी समजल्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी जो आटापिटा करावा लागतो, ते आपले परिश्रम आणि तो आपला वेळ वाचणार आहे. यामुळे आपली हार्मोनिअम वादनात जलदगतीने प्रगती होणार आहे.
आपण म्हणाल-संपूर्ण लेखात हार्मोनिअम एका तासात कसा शिकावा हे सांगितलेले नाहीच! मित्रहो, त्यासाठी मला आपण संपर्क करू शकता कारण मी शुल्क घेऊन ते शिकवितो. धन्यवाद!



Monday, 11 April 2016

लवकर कीर्तन शिकण्याचा रामबाण उपाय


ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)

वर्ष उलटले तरी काही विद्यार्थ्यांना अजून कीर्तनाचा अभ्यास पूर्ण करता आला नाही. त्यांच्यासाठी येथे काही गोष्टी देत आहोत.

कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी खालील गोष्टी करणे आवश्यक आहे.
1. त्या गोष्टीसाठी दररोज वेळ दिला पाहिजे.
अ. नियमितपणा
एखादी गोष्ट नियमितपणे करण्याची सवय हवी. आज झाली नाही, तर उदया करू ही सवय घातक आहे. नियमितपणा नसल्यामुळे त्या गोष्टीचे विस्मरण होते. आपण किती दिवस या गोष्टीचा विचारही केला नाही हेसुध्दा आठवत नाही.

आ. सातत्य
सातत्यामुळे त्याच त्याच गोष्टी पुन्हा शिकाव्या लागत नाहीत. आधीच गोष्टी शिकून होतात व नव्या गोष्टीकडे वळता येते. अन्यथा जुन्या गोष्टी विसरून गेल्यामुळे त्याच शिकाव्या लागतात आणि विस्मरण चक्र सुरू राहते.

2. ती गोष्ट शिकण्याचा कालबध्द कार्यक्रम केला पाहिजे.
मी एक वर्षभरात कीर्तन शिकणार हे ठरविल्यावर, बारा महिन्यांचे नियोजन करायला हवे. प्रत्येक महिन्यात आपला किती भाग शिकून होणार आहे ते ठरवायला हवे. जर नागपूरहून नाशिकला महिन्याभरात चालत जायचे असेल तर प्रत्येक दिवसात किती अंतर कापावे लागेल ते ठरवायला हवे. त्यानुसार प्रत्येक दिवशी प्रवास करायला हवा. अन्यथा आपण जेथे आहोत तेथेच असू.

3. ती गोष्ट शिकण्याची पध्दत ठरविली पाहिजे.
ही गोष्ट आपण नेमकी कशी शिकणार आहोत, ते ठरविले पाहिजे. यात वाचन, लेखन आणि पाठांतर या गोष्टी येतात. काय आणि किती वाचणार? काय आणि किती लिहिणार? काय आणि किती पाठांतर करणार? याचा विचार करणे आवश्यक आहे.
अभ्यास कसा करावा? या विभागात या सर्व गोष्टीचे मार्गदर्शन केले आहे. ते नीट काळजीपूर्वक वाचायला हवे.

4. सराव - गायन आणि वादन हे सरावाशिवाय अशक्य आहे. विराट कोहलीने सराव केला नाही तर त्याला शून्यावरच समाधान मानावे लागणार. झांजेचे वादन, पेटीवादन आणि अभंगगायन याला नियमित सरावाची गरज आहे. या गोष्टी सहज करायच्या गोष्टी आहेत. त्या सरावानेच येतात. सराव न  करता या गोष्टी येतील अशी गैरसमजून करून घेऊ नये.

5. आपल्या मार्गदर्शकांना आपली अडचण वेळेवर सांगून ती सोडवून घेणे आवश्यक असते.


Wednesday, 6 April 2016

कीर्तनाचा पूर्वरंग

कीर्तनाचा पूर्वरंग

ह.भ.प. दीपक हनुमंत जेवणे (कीर्तन विशारद)

भक्ताची साकडी स्वयें सोसी देव । 

त्यापाशीं केशव सर्वकाळ ॥ 1

जये ठायीं कीर्तन वैष्णव करिती ।

तेथे हा श्रीपति उभा असे ॥ 2

तुका म्हणे देव सर्वाठायीं जाला ।

भरूनी उरला पांडुरंग ॥ 3


प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग हा संतशिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा आहे. संत तुकाराम महाराज हे केवळ संतश्रेष्ठच नव्हते, तर महान समाजसुधारक होते. त्यांनी आपले आचार-विचार आणि संस्कार यांतून सर्व मनुष्यमात्रांना सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दाखविला.
त्यांची थोरवी वर्णन करताना कविवर्य मोरोपंत म्हणतात -

मुकुटमणि संतांचा तुकया म्हणू नये वाणी ।
नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणूनिया वाणी ॥

मुकुटमणि म्हणजे अगदी कळसच. या वारकरी संप्रदायाचा 'ज्ञानदेवे रचिला पाया' हे आपण जाणतोच. पुढे असे सांगितले आहे की,
भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥
संत तुकाराम महाराज हे व्यवसायाने वाणी म्हणजे व्यापारी व सावकार होते. पण ही त्यांची खरी ओळख नाही. विठ्ठलनामाच्या स्मरणाने त्यांनी सदेह वैकुंठगमन केले, असा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे जगद्गुरू हीच त्यांची खरी ओळख आहे.
आधी आपण या अभंगाचा भावार्थ पाहू.
संत तुकोबाराय सांगतात की - देव आपल्या भक्तांची संकटे स्वत: सोसत असतो. हा केशव त्याच्या जवळच असतो. ज्या ठिकाणी वैष्णव कीर्तन करतात तेथे हा श्रीपती उभा राहतो. हा पांडुरंग सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे व सर्वत्र भरून उरला आहे.
पंढरीनाथ महाराज की जय!
आता या अभंगाचा आपण सूत्रमय विचार करूया.
अभंगात पहिले सूत्र काय सांगितले आहे?
1. देव आपल्या भक्तांची संकटे स्वत: सोसत असतो.
हे बाकी छान झालं! अहो, पाहुण्याच्या काठीनं साप मरत असेल तर बरं आहे की नाही! आपण फक्त देवाची भक्ती करत बसू, बाकी सर्व काही तोच पाहून घेईल. पण असे म्हणण्याआधी भक्त म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे.
भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास ।
गेले आशापाश निवारूनी ॥
विषय तो त्यांचा झाला नारायण ।
नावडें जन धन माता पिता ॥
निर्वाणी गोविंद असें मागेपुढें ।
काहीच साकडे पडों नेदी ॥
तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य ।
घातलिया भयें नरका जाणें ॥
म्हणजे, ज्यांचे सर्व आशापाश तुटलेले आहेत आणि आपल्या देहाविषयी जे उदास म्हणजे निरपेक्ष आहेत, ज्यांना  जन, धन, माता, पिता या ऐहिक गोष्टींची आवड उरलेली नाही. कारण केवळ 'नारायण' हाच त्यांचा विषय झाला आहे. तेच खरे भक्त होत. अशा भक्तांचे साकडे म्हणजे संकट देव स्वतः निवारण करतो. निर्वाणीचे संकट ओढवल्यावर तो सतत त्याच्या मागेपुढे उभा राहून त्याचा सांभाळ करतो.
संत तुकोबाराय सांगतात -
पडतां जडभारी । दासें आठवावा हरी ॥
मग तो होऊ नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥
मागेपुढे उभा राहे सांभाळीत ।
आलिया आघात निवारावे ॥
मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश ।
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ॥
ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥
उणें पडों नेदी त्याचें। वारें सोसी आघाताचें ॥
तयावीण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥
अंगा आपुले ओढूनी । त्यासी राखे जो निर्वाणीं ॥
ऐसा अंकित भक्तासीं । म्हणे नामयाची दासी ॥
जो हरीचा सखा म्हणजे भक्त आहे त्याच्यावर विश्व कृपाच करते. त्याला कधीच उणे पडत नाही. त्याच्यावर होणारे आघात देवच सहन करतो. त्याच्यापासून देव एक क्षण सुध्दा दूर होत नाही. निर्वाणीचे संकट कोसळल्यास तो त्याला पोटाशी धरून ठेवतो. एका प्रकारे देव त्याचा अंकित होऊन जातो. अंकित म्हणजे दास असा अर्थही आपण करू शकतो.
प्रमाण हे त्याच्या बोला । देव भक्ताचा अंकिला ॥
न पुसता जातां नये । खाली बैसताही भिये ॥
अवघा त्याचा होत । जीवभावेंही सहित ॥
वदे उपचाराची वाणी । काही माग म्हणवुनी ॥
उदासीनाच्या लागे । तुका म्हणे धांवे मागे ॥
देव भक्ताचा अंकित आहे हे कशावरून? याला काही पुरावा म्हणजे प्रमाण आहे का? हो, आहे! अहो, खुद्द देवानेच असे सांगितले आहे. मग ते ऐकायला नको का? अहो, अंकित पण कसा? तर बस म्हणता बसतो आणि उठ म्हणता उठतो! विचारल्याशिवाय कोठे जात नाही. जर उभा केला तर बसायलाही घाबरतो. यापेक्षा वेठबिगार परवडला कारण त्याचा जीवभाव तरी स्वतःचा असतो. पण देव जीवभावासहित भक्ताचा होऊन जातो. काय हवं? म्हणून तो स्वतःच वारंवार विचारतो. मालकाला कशाला त्रास? नाही का?
पण देव म्हणजे काही फुकटचा वॉचमन नाही. कधीही बोलवावे आणि काहीही काम सांगावे. त्यालासुध्दा दरमहा पगार आणि बोनस द्यावा लागतो. मग देव तरी ही फुकटची फौजदारी कशाला करील? नाही का!
याचे उत्तर तुकाराम महाराज देतात - उदासीनाच्या धावे मागे.... भक्त ऐसे जाणा जे देही उदास ॥
पुंडलिकवरदा हरी विठ्ठल!
मोरोपंत सांगतात -
भक्तिविना वश नोहे विण्याने वा मृदंगनादाने ।
कन्यादान फलाते कैसा पावे मृदंगनादाने ॥
देव केवळ भक्तीनेच वश होऊ शकतो. अन्यथा नाही! खरीखुरी कन्या जावयाला लग्नात दिली तरच ते कन्यादान! मातीची बाहुली दान करून ते पुण्य जोडता येणार नाही.
यासाठी भक्त आणि अभक्त यांच्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे.
भक्त म्हणजे भुंगा. तुकाराम महाराज सांगतात-
परिमळाची धाव भ्रमराशी ओढी ।
तैसी तुझी गोडी लागो मज ॥
तुम्ही तळं पाहिलं आहे का तळं? आता दुष्काळात तळं विचारणं हासुध्दा अपराधच म्हणावा लागेल. जेव्हा मनुष्य निसर्गाचा आदर करीत होता तेव्हा या देशात मोठमोठी तळी होती. पण माणसाने तळी बुजवून त्यावर इमारती बांधल्या इतका हा हुशार प्राणी. या तळयांत फुललेली कमळं पाहिली की, कोण समाधान माणसाला लाभतं. या निसर्गाचा आस्वादच घेतला पाहिजे. अहो, कमळाला साधं समजू नका. आता देशावर त्यांचंच राज्य आहे म्हणा. पण मी तळयातल्या कमळाची गोष्ट करतो आहे. देवी म्हटली की कमळ आलंच. लक्ष्मी म्हणा की सरस्वती नेहमी कमळावरच बसलेल्या असतात. देवेंद्रांना विचारून पाहा. म्हणजे स्वर्गातील इंद्राबद्दल बोलतोय मी. पण, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे सुध्दा खरंच म्हणा! बरं, असो. तर या तळयाची गंमत म्हणजे.
कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणुक एकेचि घरीं ।
परि परागु सेविजे भ्रमरीं । जवळिलां चिखलुचि उरे ॥ 58
कमळ आणि बेडूक एकाच ठिकाणी म्हणजे नदीच्या चिखलात असतात. पण बेडूक कधीही मकरंदाचे सेवन करीत नाही. भुंगा मात्र अत्यंत दूरवरून येतो आणि मकरंदाचे सेवन करून जातो.
घेई छंद, मकरंद । प्रिय हा मिलिंद ॥
मधुसेवनानंद । स्वच्छंद ॥
बरं तर एकाला चिखल मिळतो आणि एकाला मध मिळतो.
दृष्टान्तः दोन मित्र होते. एकजण दुसऱ्याला म्हणाला - अरे, मी काल रात्री एक स्वप्न पाहिलं. आपण जंगलातून जात होतो. तेवढयात पाय घसरून पडलो. पण मी पडलो मधाच्या हौदात आणि तू पडलास चिखलात. दुसरा मित्र हुशार होता. तो म्हणाला - मित्रा, अरे मला सुध्दा हेच स्वप्न पडलं. पण पुढे काय झालं माहीत आहे का?
पहिला म्हणाला - पुढे काय होणार?
दुसरा म्हणाला - मी सांगतो ना! आपण ठरवलं की एकमेकांना चाटून साफ करूया. झालं, मी तुला चाटतोय आणि तू मला... मी मध चाटतोय आणि तू....
पुंडलिकवरदे हरि विठ्ठल... असो.
बरं, जुन्या काळी बँका नव्हत्या... तेव्हा लोक आपला पैसा जमिनीत पुरून ठेवत होते...
धनश्च भूमौ, पशवश्च गोष्ठे ।
भार्या गृहद्वारे जनः स्मशाने ।
देहश्चितायां परलोक मार्गे ।
कर्मानुगो गच्छति जीव एक ॥
धन जमिनीत, जनावरे गोठयात, आवडती बायको घराच्या दरवाज्यात, लोक स्मशानापर्यंत आणि पुढे सगळा प्रवास जीवाला एकटयालाच करावा लागतो.
पण कल्पना करा. जमिनीत पुरून ठेवलेल्या धनाचा पत्ता न सांगता जर कुणी राम म्हटला तर, त्यांच्या वंशजांचे ते दुर्भाग्यच म्हणायला हवे, नाही का?
नातरी निदैवाचां परिवरीं ।
लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं ।
परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥ 59
एखादा दुर्भागी मनुष्य घरात बसून उपवास काढत असतो कारण तेथे जमिनीत मोहोरांचा हंडा पुरलेला आहे याची त्याला कल्पना नसते.
तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु ।
कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ॥ 60
 त्याचप्रमाणे सर्व सुखाचे मूळ असलेला भगवंत सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात आहे, पण श्रध्दा नसलेल्यांना त्याची प्राप्ती होऊ शकत नाही.
तैसीं अहंममतेचिये लवडसवडी ।
मातें न पवतीचि बापुडीं ।
म्हणोनि जन्ममरणाची दुथडी । डहुळितें ठेलीं ॥ 62
याच कारणाने भगवंतांनी गीतेत सांगितले आहे.
    अश्रद्दधाना: पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।
    अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ 3
अभक्तांना देवाची प्राप्ती होणे अवघड आहे. देवाचे भक्त देवाला जाणू शकतात. त्याला आपलासा करू शकतात.ज्यांनी दैवी गुणांची प्राप्ती करून घेतली आहे अशा भाग्यवान मनुष्यांनाच माझे खरे दर्शन घडते. या दैवी गुणांची प्राप्ती भगवंताच्या नामसंकीर्तनाने होते. पण भगवंताचे नाव एकदा मुखातून येण्यासाठी हजारो जन्माचे पुण्य गाठीस असावे लागते ही गोष्ट खरी आहे. असे मनुष्य दुर्लभ असल्यामुळे कीर्तनाची आवड नसणारे अनेक लोक आपल्याला नेहमी अवतीभवती दिसतात.
याच कारणाने भगवंतांनी गीतेत सांगितले आहे.
    महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता: ।
    भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ 13
अनन्यभावाने शरण आलेल्या भक्तांची सेवा प्रत्यक्ष परमात्मा करतो व त्यांची सतत काळजी वाहतो.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ 22
नामसंकीर्तनात रमलेल्या भक्तांची काळजी भगवंतालाच घ्यावी लागते. लहान बाळाला हवे-नको ते ज्याप्रमाणे त्याची आईच बघत असते, पंख न फुटलेल्या पिलांना जशी पक्षिणच चारा आणून त्यांच्या चोचीत देत असते, त्याप्रमाणे अशा भक्तांची काळजी भगवंत घेत असतो.
आपुली तहानभूक नेणे । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें ।
तैसे अनुसरले जे मजप्राणें। तयांचेन काइसेनिहि नलजें मी॥ 340
हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा ।
जयांचियां सर्वभावां । आश्रयो मी ॥ 343
खरा भक्त कृष्णार्पणमस्तु भावनेनेच सर्व काही करीत असतो. हे सर्वकाही भगवंतच करीत आहे आणि मी केवळ निमित्तमात्र आहे, अशी त्याची खरीखुरी पराकोटीची भावना असते. ही गोष्ट भगवंताच्या लक्षात आलेली असते. त्यामुळे खरी भक्ती करायची असेल तर आपल्यालाही याच मार्गाने जावे लागेल.
आता दुसऱ्या चरणाचा विचार करूया. या चरणात संत तुकोबाराय यांनी दुसरे सूत्र सांगितले आहे.
2. ज्या ठिकाणी वैष्णव कीर्तन करतात तेथे हा श्रीपती उभा राहतो.
जेथे माझे भक्त कीर्तन करतात तेथेच माझा निवास असतो.
    सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: ॥
    नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ 14
भगवंताच्या नामसंकीर्तनात अशी जादू आहे की कुठेही असलेला भगवंत कीर्तनात आपोआप आकर्षित होतो. भगवंताचे नाम हे देवाला खेचून आणण्याचे साधन आहे. आपण हाक मारलेला माणूस '' देऊन जसा आपल्याकडे धावत येतो; त्याचप्रमाणे भगवंताचे नाम घेतल्यावर तोसुध्दा आपल्याकडे धावत येतो.
निजल्याने गातां उभा नारायण ।
बैसल्या कीर्तन करिता डोले ॥
उभा राहोनियां मुखी नाम वदे ।
नाचे हा गाविंद नाना छंदे ॥
मारगी चालता मुखी नाम वाणी ।
उभा चक्रपाणी मागेपुढें ॥
तुका म्हणें यासी कीर्तनाची गोडी ।
प्रेमे घाली उडी नामासाठी ॥
अहो, झोपल्या झोपल्या जरी देवाचे नाव घेतले तर हा नारायण सेवकाप्रमाणे उभा राहतो. बसून नाव घेतले तर तो डोलायलाच लागतो. उभे राहून त्याचे नाव घेतले तर तो चक्क नाचायलाच लागतो. चालता चालता भक्ताने नामस्मरण केले तर भगवंत मागेपुढे उभा राहून त्याला सांभाळतो. या देवाला कीर्तनाची इतकी गोडी आहे की तो चक्क उडया मारत कीर्तनात येऊन उभा राहतो.
यामुळे नामस्मरण कधी करावे या प्रश्नाचे उत्तर असे आहे - नामस्मरण कधीही करावे...
संत जनाबाई सांगतात -
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥
न विसंबे क्षणभरी । तुझे नाम गा मुरारी ॥
जनाबाईला घरी कामे करावी लागत. कारण ती दासी होती. त्यामुळे दळणकांडण करतानाच ती नामस्मरण करायची आणि बाकीच्या वेळी... नामस्मरणच करायची. कारण नाम घेण्याला एक क्षणसुध्दा विसंबू नये असे तिला वाटत असे.
संत सेना महाराज सांगतात -
गुणदोष याति न विचारी काही ।
धावे लवलाही भक्तकाजा ॥
अवघें काळीं वाचे म्हणा नारायण ।
सेना म्हणे क्षण जाऊं न द्यावा ॥
वेळ अमूल्य आहे, असे सर्वच सांगतात. तो वाया घालवू नये असे सर्व म्हणतात. म्हणून एक क्षणसुध्दा वाया न दवडता  नामस्मरण केले पाहिजे. तर मग वेळ न लावता भगवंत धावून येतो.
संत रामदास सांगतात -
देव असता पाठीराखा । त्रैलोक्याचा कोण लेखा ।
रामदास म्हणे भावे । भजन देवाचें करावे ॥
पुढे सांगतात -
टाळ वाजे मंद मंद । मुखी हरिनामाचा छंद ॥
उभे हरिदास अंगणीं । रामदास लोटांगणी ॥
संत निळोबाराय सांगतात -
जो जो काळ कीर्तनी जाय । तो तो होय सार्थक ॥
निळा म्हणे ऐसा निका । उपाय नेटका सकळासी ॥
नामसंकीर्तनात जेवढा काळ जातो तो सर्व सार्थक होतो. सर्वांनी हाच एक उपाय करायला हवा.
तरी कीर्तनाचेनि नटनाचें । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे ।
जे नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥ 197
नामस्मरणामुळे पापाची नावनिशाणीही उरत नाही. त्यामुळे प्रयाश्चित घेण्याची गरज भासत नाही. नामजपापुढे तीर्थांचेही महत्त्व उरत नाही.
त्रिवेणीसंगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥
नामामुळे पापाचे पर्वत नष्ट झाले. यमलोकच ओसाड पडला.
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें र्ठायावरुनि उठविली ।
यमलोकीं खुंटिली । राहाटी आघवी ॥ 198
भगवंतांच्या नामामुळे अवघ्या जगातील दुःखे नाहीशी झाली. सगळीकडे सुखच सुख निर्माण झाले.
ऐसे माझेनि नामघोषें । नाहीं करिती विश्वाचीं दु:खें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ 199
मनुष्य वारला की आपण म्हणतो वैकुंठाला गेला. पण त्याचीही गरज उरली नाही. हरिभक्तांनी हे जगच वैकुंठमय बनवून टाकले आहे.
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें ।
तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें ।
ऐसें नामघोषगौरवें। धवळलें विश्व ॥ 203
बरे! भक्त वैकुंठालाही जाऊन काय करणार. जर मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावरच नाहीत. तर तेथे जाऊन काय करावे? हा भगवंत इतका चपळ आहे की योगियांच्या ध्यानातही तो येत नाही. मग तो सापडणार कसा आणि कोठे?
तो मी वैकुंठीं नसें । एक वेळ भानुबिंबींही न दिसें ।
वरी योगियांचींही मानसें । उमरडोनि जाय ॥ 207
तुकोबाराय सांगतात -
नामसंकीर्तन साधन पै सोपें ।
जळतील पापें जन्मांतरीची ।
न लगती सायास जावे वनांतरा ।
सुखें येतो घरा नारायण ॥
अहो, आपण कशाला वणवण करायची. फक्त नामसंकीर्तन करा. तो भगवंत तुमच्या घरी पत्ता विचारत येतो.
परि तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।
जेथ नामघोषु बरवा । करिती ते माझे ॥ 208
माऊली ज्ञानोबाराय सांगतात -
एकतत्त्व नाम दृढ धरी मना ।
हरीसी करुणा येईल तुझी ॥
ते नाम सोपे रे रामकृष्णगोविंद ।
वाचेसी सद्गद् जप आधी ॥
सर्वांत मोठा दृष्टांत आहे सावता माळी महाराजांचा.
त्यांनी सांगितले -
सावता म्हणे केला मळा ।
विठ्ठल देखियला डोळा ॥
सावता माळी महाराज सदैव मळयाच्या कामात गुंतलेले. त्यांना पंढरीची वारी करायलाही वेळ नाही.
पण मळा कसा करायचे.
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी ॥
असा काही त्यांनी भक्तीचा मळा फुलवला की शेवटी भगवंत सावता महाराजांना भेटायला चक्क त्यांच्या मळयात आले.
संत सावता महाराज सांगतात -
वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी ।
विठ्ठल गाऊनि नाचू रंगी ॥
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा ।
तेणे मुक्ति द्वारां ओळंगती ॥
लोक म्हणाले - महाराज पंढरीला विठोबाच्या दर्शनाला का येत नाही.
महाराज म्हणाले - तो विठोबाच माझ्या मळयात येतो. त्याला सोडून मी पंढरीला कसा येणार? मळयातच काय तो विठोबा सर्व ठिकाणी आहे.
आता तिसऱ्या चरणाकडे वळूया. अभंगातील तिसरे सूत्र म्हणजे,
3. हा पांडुरंग सर्व ठिकाणी व्यापून राहिलेला आहे व सर्वत्र भरून उरला आहे.
मोरोपंत सांगतात -
भू जल तेज समीर ख, काष्ठादिकी असे भरला ।
स्थिरचर व्यापुनि तो परमात्मा, दशांगुळे उरला ॥
जनाबाईला विचारले, ''देव कोठे आहे?''
तेव्हा जनाबाई म्हणाल्या -
देव खातें, देव पिते । देवावरी मी निजते ॥
देव देते, देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥
देव येथे देव तेथे । देवाविण नाही रितें ॥
जनी म्हणे विठाबाई । भरुनि उरले अंतरबाही ॥
तुम्ही म्हणता - मी बटाटावडा खातो.
जनाबाई म्हणतात - मी देव खाते.
तुम्ही म्हणता - मी लिम्का पितो.
जनाबाई म्हणतात - मी देव पिते.
तुम्ही म्हणता - मी पैसे देतो
जनाबाई म्हणतात - मी देव देते.
तुम्ही म्हणता - मी खाऊ घेतो.
जनाबाई म्हणतात - मी देव घेते.
तुम्ही म्हणता - मी बेडवर झोपतो.
जनाबाई म्हणतात - मी देवावरच झोपते.
तुम्ही म्हणता - जनाबाई तुम्हाला वेड लागले आहे कातो बेड आहे का देव आहे?
जनाबाई म्हणतात - अहो, देव वर आहे आणि खालीसुध्दा आहे. देवाशिवाय काहीच रिकामी जागा शिल्लक नाही. आता तुम्हाला सांगितलं की, तेथे देव आहे बसू नका. मग बसाल तरी कुठे. शेवटी देवावरच बसाल ना! मग तशीच मी देवावरच झोपते. माझ्याकडे कुठला आला आहे पलंग?
जरा व्यावहारिक दृष्टान्त देतो.
एका सावकाराचा धंदा बुडाला. तेव्हा तो विजय मल्ल्यासारखा परदेशी नाही उडाला. बिचारा हे जगच सोडून गेला. त्या काळी थोडी शिल्लक होती. जनाची नाही तर मनाची तरी... बरं असो. तेव्हा त्याचा मुलगा घरातील काही सोन्याच्या वस्तू विकायला सोनाराच्या दुकानात गेला.
मुलगा - मामा, हे पाहा. मी तुमच्याकडे सोन्याचा गणपती, सोन्याचा उंदीर आणि सोन्याची एक लगड आणली आहे. मला याच्या बदल्यात काही पैसे द्या.
सोनाराने त्या तिन्ही वस्तू तराजूत घालून तोलल्या आणि म्हणाला - दीड किलो झाले. किलोच्या हिशेबाने इतके पैसे झाले.
सोनार पैसे देऊ लागला, पण मुलगा घेईना.
मुलगा - मामा, अहो, गणपती, उंदीर आणि लगड यांचे वेगळे वजन करा.
सोनार - वेगळे वजन केले तरी तेवढेच पैसे मिळतील. एकच भाव आहे.
मुलगा - कायतरीच काय? गणपती आणि उंदराचा एकच भाव. तुम्हाला अक्कल आहे का?
सोनार - माझं सोड, तू आपली अक्कल तपासून घे. अरे वेडया, गणपती असो की उंदीर असो. शेवटी सोने ते सोनेच त्यामुळे दोघांचाही भाव एकच.
हा सर्व दृष्टीकोनाचा गोंधळ आहे. दोघांची दृष्टी वेगळी म्हणून दोघांचा अनुभव वेगळा... पंढरीनाथ महाराज की जय!
माऊली ज्ञानोबाराय सांगतात -
अधिक देखणे तरी निरंजन पाहणें ।
योगिराज विनवणें मना आले वो माये ॥
चंदन जेवि भरला अश्वत्थ फुलला ।
तैसा म्या देखिला निराकार वो माये ॥
ऐसा ज्ञानसागरू रखुमादेवीवरू ।
विठ्ठलु निर्धारू म्यां देखिला वो माये ॥
तृण अग्निमेळे समरस झाले ।
तैसे नामे केले जपता हरि ॥
कापूराची वाती उजळली ज्योती ।
ठायीच समाप्ती झाली जैसी ॥
संत तुकोबाराय सांगतात -
लवण मेळविता जळे । काय उरलें निराळे ॥
तैसा समरस झालो। तुजमाजी हरपलो ॥
अग्निकर्पुराच्या मेळी ।
काय उरली काजळी ॥
तुका म्हणे होती ।
तुझी माझी एक ज्योती ॥
माऊली सांगतात -
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले ।
अवघेचि झाले देह ब्रह्म ॥
बापरखुमादेवीवरू सहज नीटु झाला ।
हृदयी निटावला ब्रह्माकारे ॥
सर्वत्र देव भरून राहिलेला आहे असा अनुभव भक्ताला आला म्हणजे त्याला आत्मज्ञान झाले. त्याचा मानवजन्म सफळ झाला. संतांचा जन्म असा सफळ झाला. तसाच तो तुमचा आमचाही होवो, हेच देवाकडे मागणे आहे.
पुंडलिकवरदे हरि विठ्ठल ॥