तस्मादुत्तिष्ठ शिष्यवर... किर्तनाय कृतनिश्चयः।
शिष्यः कीर्तनास उभे राहताना कोणती भावना मनात बाळगावी?
गुरूः ही भगवान देवर्षी नारदमुनींची गादी आहे. सोप्या भाषेत हे विक्रमादित्याचे सिंहासन
आहे. यावर बसलेले गुराख्याचे पोरही सर्वोत्तम न्यायदान करील, असा पूर्ण विश्वास
बाळगावा. हा आत्मविश्वास आपल्या वागण्याबोलण्यातून दिसायला हवा. आपण केलेले पाठांतर
नीट आठवेल का? पदांचे गायन नीट करता येईल का? इत्यादी शंकाकुशंका मनातून हद्दपार करून टाकाव्यात. तुम्ही बृहस्पती नाहीत
की पं. भीमसेन जोशी नाहीत ही गोष्ट तुम्हाला आणि श्रोत्यांनाही माहीत आहे, त्यामुळे मुळीच घाबरू नका. कारण, तुम्ही हे तुम्हीच आहात.
आपला चेहरा प्रसन्न, शांत, उत्साही आणि
समाधानी असायला हवा. म्हणजे आपोआपच चेहऱ्यावर अलौकिक तेज झळकायला लागते.
शिष्यः पण हे कसे घडून येणार?
गुरूः अभ्यासक्रमात सांगितले आहे म्हणून देव, गुरू आणि शारदेचे स्मरण करू नका. तो
निव्वळ उपचार नाही. हे स्मरण केल्यामुळे, या सर्वांचे पाठबळ आणि
आशीर्वाद आपल्या पाठीशी उभे राहणार आहेत आणि त्यामुळेच आपण ही सभा गाजवणार आहोत,
अशी भावना हे मंगलाचरण आणि नमन करताना आपल्या मनात निर्माण होऊ द्या!
नमन आणि मंगलाचरण झाल्यानंतर आपल्या अंगात दहा हजार हत्तींचे बळ संचारले आहे, अशी भावना आपल्या
मनात निर्माण झाली पाहिजे.
त्यामुळे तुमचे हावभाव, हालचाली आणि आविर्भाव यांच्यात एक प्रकारचा रुबाब आणि डौल दिसून
यायला हवा. अगदीच अतिशयोक्ती करायची तर, नरेंद्र मोदींपेक्षा
रुबाबदार, अमिताभ बच्चनपेक्षा आकर्षक, आणि
बराक ओबामा यांच्यापेक्षा हुशार आहोत, असा समज करून घ्यायला हरकत
नाही. मात्र केवळ दोन तासांकरिताच! अन्यथा, नाटकात शिवाजी महाराजांची
भूमिका करणारा नट नाटक संपल्यावर भूमिकेतून बाहेर न येता तसाच वागायला लागला तर तो
चेष्टेचा आणि थट्टेचा विषय होतो हे लक्षात ठेवावे.
आपले तसे मुळीच होऊ नये. कीर्तन संपल्यानंतर आपण पूर्वीचा स्वभाव धारण करायला हरकत
नाही. पहिल्या वर्षी एवढे साधले तरी भरपूर आहे.
खरे तर दोन तास श्रोत्यांसमोर उभे राहता येणे ही प्रथम वर्षाची प्रबोधकाची खरी
परीक्षा आहे. प्रबोधक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच खरे कीर्तन शिकण्याचा प्रारंभ होणार
आहे हे लक्षात असू द्या.
त्यामुळे अतिशय संयमाने वागा. कोणतीही गोष्ट शिकून घेण्याचा उतावीळपणा करू नका.
कारण, हा एकूण
तीन वर्षांचा अभ्यासक्रम आहे. तो पूर्ण केल्यावरच आपण चांगले कीर्तनकार म्हणून उभे
ठाकणार आहोत.
शिष्यः मग पहिल्या वर्षी नेमके किती ज्ञान संपादन झाल्यावर मी कीर्तन करण्यास सुरुवात
करू शकतो?
गुरूः ज्ञान संपादन झाल्यावर कीर्तन करायचे नसते; तर ज्ञान संपादनासाठी कीर्तन करायचे असते. कीर्तन म्हणजे प्रकट अभ्यास होय.
शिष्यः प्रकट अभ्यास म्हणजे काय?
गुरूः कीर्तन ही अविरत चालणारी साधना आहे. कीर्तनासाठी आपण काही पाठांतर करतो.
ग्रंथांचे वाचन करतो. पारमार्थिक संज्ञा, व्याख्या, संकल्पना समजून
घेतो. हा अभ्यास चालू असताना कीर्तन करणे म्हणजे प्रकट चिंतन होय.
शिष्यः अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय कीर्तनाला उभे राहिल्यास लोक हसतील ना? आपल्यापेक्षा
ज्ञानी श्रोत्यांमध्ये असले तर मला अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला म्हणतील!
गुरूः अभ्यास कधीच पूर्ण होत नाही. तो नेहमीच अपूर्ण असतो. अपूर्णाकडून पूर्णत्वाला
जाण्यासाठीच ही कीर्तनसेवा करायची आहे. जे खरे ज्ञानी असतात ते साधकाला कधीच हसत नाहीत.
उलट त्याला ते प्रोत्साहन देतात. आशीर्वाद देतात आणि मार्गदर्शन करतात. कोणी मूढ मनुष्य
तुम्हाला हसलाच तर तो मूढ असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आपली साधना सुरू ठेवा.
शिष्यः पूर्णत्वाकडे जाण्याची साधना आहे म्हणजे काय?
गुरूः पूर्ण म्हणजे भगवंत. पण जीव भगवंताला पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही. माऊली
म्हणूनच भगवंताला 'स्वसंवेद्या' म्हणतात. भूतसृष्टी परमेश्वरात
सामावलेली असल्यामुळे जीव भगवंताला जाणू शकत नाही. आईच्या पोटातील गर्भ आईच्या वयाला
जाणू शकत नाही. माऊली म्हणतात, ''अगा उदरीचा गर्भु जैसा। न देखे
आपुलिये मातेची वयसा। मी आघवेया देवा तैसा। नेणवे कांहीं॥ (10-65)
शिष्यः मग जीव भगवंताला कसा जाणून घेऊ शकणार?
गुरूः याचे उत्तर माऊलीच देतात, ''आत्मरूपा.'' जे पिंडी
ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्याला जाणून घेण्याची शक्ती भगवंताने जीवालाही दिली आहे.
ती म्हणजे आत्मशक्ती आणि आत्मरूपाला जाणून घेणे म्हणजेच आत्मज्ञान.
शिष्यः आत्मशक्तीच्या आधाराने आत्मरूपाला कसे जाणून घेतात?
गुरूः सृष्टिनिर्मितीचे रहस्य समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ बिग बँग थिअरीचे प्रयोग
करत आहेत ना! अगदी त्याचप्रमाणे आत्मशक्ती जागविण्याचा प्रयोग म्हणजे कीर्तन होय.
शिष्यः म्हणजे कीर्तनाने आत्मज्ञान होते?
गुरूः संत सांगतात, 'ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी।' ते खोटे
नाही. आपण कीर्तन करतो म्हणजे आपल्यातील ईशतत्त्वाला जागृत करतो. तेच आपल्या मुखातून
बोलत असते. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात, ''आपुलिया बळे
नाही मी बोलत।''
शिष्यः पण ते तर महाराज होते. आम्ही साधारण मनुष्य आहोत.
गुरूः स्वतःला साधारण समजू नका. तुमच्या मनावर काही पूर्वसंस्कार आहेत. त्यामुळेच
तुम्ही कीर्तनकार बनण्याचे ठरविले आहे. हे सुप्तावस्थेतील पूर्वसंस्कार जागृत केले
तर तुमचे बरेच प्रश्न मिटतील. प्रबोधिनीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कीर्तनाला उभे
राहा. आधी आत्मजागृतीसाठी. लोकजागृती नंतर येते.
शिष्यः आत्मजागृती म्हणजे काय?
गुरूः कीर्तनाला उभे राहून या पवित्र गादीशी समरस झालात तर तुमचे पूर्वसंस्कार
जागृत होतील. आताची साधना आणि पूर्वीची साधना यांची बेरीज होत जाईल. साधना वाढत जाईल
तशी पूर्वसंचिताची दारे उघडी होत जातील. असा एक क्षण येईल की पूर्वीची साधना आणि आताची
साधना यांचा गुणाकार होईल. या जन्मात आत्मजागृतीच काय आत्मज्ञान होईल.
शिष्यः आपण जे सांगत आहात त्याबद्दल मला संशय नाही. पण हे कशावरून सांगत आहात?
गुरूः हे मी नाही. भगवंत अर्जुनाला सांगतात -
'बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥ 4.5॥
या प्रमाणे आपलेही जे अनंत जन्म झाले आहेत ते आपल्या स्मरणात नाहीत. अजून काय सांगू.
म्हणून, 'तस्मादुत्तिष्ठ
शिष्यवर... किर्तनाय कृतनिश्चयः॥'
No comments:
Post a Comment