वारकरी कीर्तन पद्धती
ह. भ. प. श्री. दीपक महाराज जेवणे
वारकरी कीर्तन पद्धती ही नारदीय कीर्तन पद्धती म्हणजेच हरदासी कीर्तनापेक्षा ती थोडी निराळी आहे. मात्र वारकरी कीर्तनाची पूर्वीची पद्धत आणि आताची पद्धत यामध्ये थोडा फरक पडलेला दिसतो.
मंदिरात जाऊन विट्ठलाचे दर्शन
घेतल्यानंतर देवाला पाठ न
दाखविता भजन करीतच मागे
मागे जात अगदी चंद्रभागेच्या
वाळवंटात यायचे आणि मग
तेथे कीर्तनास प्रारंभ
करायचा अशी जुनी पद्धत
होती. ही पद्धती गावोगावी
अवलंबणे शक्य नसल्यामुळे स्वानंदसुखनिवासी विष्णुबुवा जोगमहाराज यांनी
ती बदलली. त्यांनी पूर्वरंग
(भावार्थ निरूपण) आणि उत्तररंग
(प्रमेय निरूपण) असे दोन
भाग जोगमहाराज यांनी
केले.
नारदीय आणि वारकरी या
दोन्ही प्रकारांमध्ये अभंगावरच
निरूपण केले जाते. पण वारकरी
कीर्तन पद्धतीत मुख्य भाग
तत्त्वनिरूपण हाच असतो. यामुळेही वारकरी
कीर्तनास निरूपण असे संबोधण्याची
पद्धतही रूढ झाली आहे. निरूपण
करताना आधी भावार्थ विशद
करतात आणि नंतर अभंगातील
प्रमेयांची चर्चा करतात. ही चर्चा
करताना दाखले म्हणून संत
अथवा देवदेवतांच्या गोष्टी
प्रसंगोपात्त सांगितल्या जातात.
वारकरी कीर्तन पद्धतीत स्वानंदसुखनिवासी विष्णुबुवा जोगमहाराज यांनी
घालून दिलेली पठडी विशेष
मान्य केली जाते. त्यांच्या पद्धतीचा
विशेष गुण म्हणजे संपूर्ण
अभंग हा एका कल्पनेचा
विकास आहे, असा त्यांचा
दृष्टिकोन होता. सेवेसाठी घेतलेल्या
अभंगातील पहिल्या चरणातूनच दुसरा, दुसर्यातून
तिसरा कसा निर्माण होतो
असे ते सोदाहरण स्पष्ट
करून सांगत. एका कड्यात
दुसरे कडे गुंफावे आणि
क्रमाक्रमाने अनेक कड्यांची साखळी
बनवावी तशा पद्धतीने अनेक
कडव्यांचा अभंग तयार झालेला
आहे असे ते दर्शवून
देत.
आपल्या कीर्तनातून ते
अशाच प्रकारे विषय मांडत
असत.
वारकरी कीर्तनकार कीर्तनास
प्रारंभ करण्यापूर्वी अर्धगोलाकार
रचनेत उभे राहिलेल्या टाळकर्यांचे
मृदंगाच्या साथीवर भजन सुरू
असते. मध्यभागी उभा असलेला
विणेकरी निरनिराळ्या संतांचे
अभंग सांगतो आणि अन्य
वारकरी त्याच्यामागून ते
अभंग म्हणतात.
नंतर कीर्तनकार बुवांचे
आगमन होते. ते विणेकरी
आणि श्रोतेमंडळी यांना
नमस्कार करून आपल्या गळ्यात
विणा घालतात आणि ते
कीर्तनास उभे राहतात.
कीर्तनकार कीर्तनास उभे
राहिल्यावर सर्वप्रथम ‘जय जय
रामकृष्णहरी’ हे भजन घेतात.
या भजनाला जोडून नमनाला
माऊली ज्ञानोबारायांचा ‘रूप पाहता
लोचनी’ हा रूपाचा अभंग
घेतात. अथवा संत तुकोबारायांचा
‘सुंदर ते ध्यान उभे
विटेवरी’ हा अभंग घेतात.
अभंग संपल्याबरोबर पुन्हा
जय जय रामकृष्णहरी हे
भजन घेतात.
त्यानंतर निरुपणाचा मूळ
अभंग घेतात. निरूपणासाठी माऊली
ज्ञानोबाराय ते निळोबारायांपर्यंत वारकरी
संतांचे अभंग घ्यावेत आणि
अन्य अभंग घेऊ नयेत
असा दंडक पाळला जातो.
मूळ अभंग संपल्यावर ‘विठोबा रखुमाई’ हे
भजन होते.
हे भजन संपल्यावर मूळ
अभंगाला चाल लावून साथीदार
त्याचे रागदारीत गायन
करतात.
हे गायन संपल्यावर कीर्तनकार
बुवा आपला वीणा आरंभी
ज्या विणेकर्याकडून घेतला
होता त्याच्याकडे सोपवितात
व विठ्ठल, विठ्ठल हे
भजन करतात. कीर्तनाच्या गादीचा
मान म्हणून वीणा देताना
आणि घेताना बुवा आणि
वीणेकरी एकमेकांच्या पाया
पडतात. वारकरी कीर्तनात वीणेचे
मोठे महत्त्व आहे.
हे भजन सुरू असताना
कीर्तनकार बुवा कंबरेला उपरणे
कसून बांधतात. ‘पुंडलिकवरदा हरी
विट्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज
की जय’ असा गजर
करण्यात येतो.
विठ्ठल विठ्ठल हे भजन
संपल्यावर कीर्तनकार बुवा
मूळ अभंगाचे ओवी पद्धतीने
निवेदन करतात.
यानंतर ‘पांडुरंगा करू प्रथम
नमन,
दुसरे नमन संताचिया ।
संत कृपादाने कथेचा
विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका
॥’
हा संत तुकारामांच्या अभंगातील
चरण म्हटला जातो.
यानंतर अभंगाच्या निरुपणाला
सुरुवात होते. भावार्थ सांगितल्यावर
पूर्वरंग संपतो. पुन्हा ‘जय जय
विठोबा रखुमाई’ असे भजन
होते. कीर्तनकार बुवांना हार
घातला जातो. त्यांच्या भाळी
बुक्का लावला जातो. तसेच मृदंगवादक
आणि वीणेकरी यांनाही हार-बुक्का
दिला जातो.
उत्तररंगात निरुपणाच्या अभंगाचे
सखोल व सविस्तर विवेचन
केले जाते. कीर्तनाचा समारोप
करताना भैरवी रागात मूळ अभंगाचे पुन्हा
गायन होते व ज्ञानेश्वर
माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम
असा गजर करून कीर्तन
संपते.
कीर्तनकारांनी लक्षात घ्यावयाची बाब
अशी आहे की, संतांनी या
साहित्यनिर्मितीत एका प्रकारे
कीर्तनच केले आहे. पण हे
करताना त्यांच्या दृष्टिकोन
‘भाष्यकारांते वाट पुसतु’ आणि ‘काही पाठ
केली संतांची उत्तरे। विश्वासे
आदरे करोनिया।’ असाच राहिला
आहे.
याचा अर्थ असा आहे
की,
आपण कीर्तन करण्याच्या अगोदर
पूर्वीच्या संतांच्या साहित्याचा
अभ्यास केला पाहिजे. ज्ञानेश्वर-तुकारामादि संतांनीही
असा अभ्यास केला. पण त्यांच्या
अभ्यासाला अनुभवाची जोड
होती.
आजही असा अभ्यास करून
आपण कीर्तन करू शकतो. मात्र
अनुभव मिळविणे सोपे नसते. तो
साधनेचा भाग आहे. येथे आपल्याला
अभ्यासासाठी संतांचा अभंग दिला
आहे.
या अभंगाचा आधी सूत्रमय
पद्धतीने विचार करावा. या अभंगातून
संतांनी कोणते सूत्र सांगितले
आहे?
एकापेक्षा अनेक सूत्रे सांगितली
आहेत का? त्या सूत्रांचा
परस्परसंबंध अथवा संगती कशी
आहे?
याचा विचार करावा लागतो.